हूशाईने सादोक आणि अबीयाथार याजकांना सांगितले, “अहीथोफेलने अबशालोम आणि इस्राएलच्या वडीलजनास अमुक करण्याचा सल्ला दिला होता, परंतु मी त्यांना असे करण्याचा सल्ला दिला आहे. आता लवकर निरोप पाठवा आणि दावीदाला सांगा, ‘आजची रात्र रानाच्या उतारावर घालवू नको; तर लवकर पलीकडे जा, नाहीतर राजा आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व लोक नष्ट केले जातील.’ ”
आपण शहरात जाताना कोणी पाहून धोका देऊ नये, म्हणून योनाथान आणि अहीमाज एन-रोगेल येथे राहत होते. त्यांनी ही सूचना दावीद राजाला द्यावी म्हणून त्यांच्याकडे एक दासी पाठवली गेली. परंतु एका तरुण मनुष्याने त्यांना पाहिले आणि त्याने जाऊन अबशालोमला सांगितले. तेव्हा दोघेजण त्वरित बहूरीम येथे एका माणसाच्या घरी गेले. त्याच्या घराच्या अंगणात एक विहीर होती, तिच्यात ते उतरले. त्याच्या पत्नीने विहिरीच्या तोंडावर एक झाकण टाकले व त्यावर धान्य पसरले. त्याबद्दल कोणालाही काहीही कळले नाही.
अबशालोमाच्या माणसांनी जेव्हा त्या बाईच्या घरी येऊन विचारपूस केली, “अहीमाज व योनाथान कुठे आहेत?”
तिने उत्तर दिले, “ते ओढ्यापलीकडे गेले आहेत.” त्या माणसांनी शोध केला, पण त्यांना ते सापडले नाही. म्हणून ते यरुशलेमास परत गेले.
ते तिथून निघून गेल्यानंतर, दोघेजण विहिरीतून बाहेर आले आणि दावीद राजाला जाऊन सांगितले, ते त्याला म्हणाले, “लवकर निघा आणि नदी पार करा; अहीथोफेलने तुमच्याविरुद्ध अमुक सल्ला दिला आहे.” तेव्हा दावीद आणि त्याच्या बरोबरच्या सर्व लोकांनी यार्देन नदी पार केली. दिवस उजाडेपर्यंत यार्देन पार केली नाही असा कोणीही मागे राहिला नाही.
इकडे अबशालोमने आपल्या सल्ल्यानुसार केले नाही असे अहीथोफेलने पाहिले, तेव्हा त्याने आपल्या गाढवावर खोगीर घातले आणि आपल्या जन्मगावी, आपल्या घराकडे निघून गेला. त्याने आपले घर नीटनेटके करून फाशी घेतली. तो मरण पावला आणि त्याला त्याच्या पित्याच्या कबरेत पुरले.
नंतर दावीद महनाईम येथे गेला आणि अबशालोम सर्व इस्राएली सैन्यासह यार्देन पार करून गेला. अबशालोमने योआबाच्या जागी अमासाची सेनापती म्हणून नेमणूक केली. अमासा हा इथ्रा इश्माएली याचा पुत्र असून, नाहाशाची कन्या, जेरुइयाहची बहीण योआबाची आई अबीगईल हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. अबशालोम व इस्राएली सैन्याने गिलआद देशात तळ दिला.
दावीद जेव्हा महनाईम येथे पोहोचला, तेव्हा अम्मोन्यांच्या राब्बाह येथील नाहाशाचा पुत्र शोबाई आणि लो-देबार येथील अम्मीएलाचा पुत्र माखीर आणि रोगलीम येथील गिलआदी बारजिल्लई यांनी दावीद आणि त्याच्या लोकांसाठी बिछाने आणि पात्रे, मातीची भांडी आणली. त्यांना खाण्यासाठी गहू व जव, पीठ आणि भाजलेली धान्ये, शेंगा व डाळी, मध व दही, मेंढरे आणि गाईच्या दुधाचा खवा, हे सुद्धा आणले. कारण ते म्हणाले, “रानात दावीद आणि त्याचे लोक थकलेले, भुकेले व तहानलेले झाले असतील.”