मग त्याने बारा प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना सर्व भुते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला;
आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यास व रोग्यांना बरे करण्यास पाठवले.
त्याने त्यांना सांगितले, “वाटेसाठी काही घेऊ नका. काठी, झोळी, भाकरी किंवा पैका घेऊ नका; अंगरखेही दोन-दोन घेऊ नका.
ज्या कोणत्या घरात तुम्ही जाल, तेथेच राहा व तेथूनच निघून जा.
जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या गावातून निघतेवेळेस आपल्या पायांची धूळ झाडून टाका.”
मग ते निघून सर्वत्र सुवार्ता सांगत व रोग बरे करत गावोगावी फिरू लागले.
तेव्हा घडत असलेल्या सर्व गोष्टींविषयी मांडलिक हेरोदाने ऐकले; आणि तो मोठ्या घोटाळ्यात पडला, कारण योहान मेलेल्यातून उठला आहे असे कित्येक जण म्हणत होते;
कित्येक ‘एलीया प्रकट झाला आहे’ असे म्हणत होते व कित्येक ‘प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे’ असे म्हणत होते.
पण हेरोद म्हणाला, “मी योहानाचा शिरच्छेद केला, तर मग ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे, तो कोण?” म्हणून त्याला पाहण्याची तो संधी पाहत होता.
नंतर प्रेषितांनी परत येऊन आपण जे जे केले होते ते ते त्याला सविस्तर सांगितले; तेव्हा तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या गावाकडे एकान्त स्थळी गेला.
हे समजल्यावर लोकसमुदाय त्याच्यामागून गेले; तेव्हा त्यांचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता, आणि ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना तो बरे करत होता.
दिवस उतरू लागला तेव्हा ते बारा प्रेषित जवळ येऊन त्याला म्हणाले, “लोकसमुदायाला निरोप द्या, म्हणजे ते भोवतालच्या गावांत व शेतामळ्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहोत.”
पण तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन ह्या लोकांसाठी अन्न विकत आणले नाही तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आमच्याजवळ काही नाही.”
कारण ते सुमारे पाच हजार पुरुष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “सुमारे पन्नास-पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यांना बसवा.”
त्यांनी त्याप्रमाणे करून सर्वांना बसवले.
तेव्हा त्याने त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले.
तेव्हा सर्व जण जेवून तृप्त झाले, आणि उरलेले बारा टोपल्या तुकडे त्यांनी उचलून घेतले.
नंतर असे झाले की, तो एकान्तात प्रार्थना करत असता शिष्य त्याच्याबरोबर होते. तेव्हा त्याने त्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात?”
त्यांनी उत्तर दिले, “बाप्तिस्मा करणारा योहान; पण कित्येक म्हणतात एलीया; आणि कित्येक म्हणतात की, प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे.”
त्याने त्यांना म्हटले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “देवाचा ख्रिस्त.”
मग हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली;
आणि म्हटले, “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:खे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे, आणि तिसर्या दिवशी पुन्हा उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे.”
त्याने सर्वांना म्हटले, “जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.
जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल; परंतु जो कोणी माझ्याकरता आपल्या जिवास मुकेल तो त्याला वाचवील.
कारण जर कोणा मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ?
जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो त्याची लाज मनुष्याचा पुत्र स्वत:च्या व पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील.
मी तुम्हांला खरे सांगतो की, येथे उभे असणार्यांत कोणी असे आहेत की, ते देवाचे राज्य पाहीपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”
ह्या बोलण्यानंतर असे झाले की, सुमारे आठ दिवसांनी पेत्र, योहान व याकोब ह्यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला.
आणि तो प्रार्थना करत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले.
आणि पाहा, मोशे व एलीया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करत होते;
ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन यरुशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते.
तेव्हा पेत्र व त्याचे सोबती झोपेने भारावले होते; पण ते जागे झाले व त्यांना त्याचे तेज व त्याच्याजवळ उभे असलेले दोन पुरुष दिसले.
मग असे झाले की, ते त्याच्यापासून निघून जात असताना पेत्राने येशूला म्हटले, “गुरूजी, आपण येथेच असावे हे बरे; तर आम्ही तीन मंडप करू; आपल्यासाठी एक, मोशेसाठी एक व एलीयासाठी एक;” हे जे तो बोलला त्याचे त्याला भान नव्हते.
तो हे बोलत असता मेघ उतरून त्यांच्यावर छाया करू लागला; आणि ते मेघात शिरले तेव्हा ते भयभीत झाले.
तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा (प्रिय) ‘पुत्र’, ‘माझा निवडलेला आहे; ह्याचे तुम्ही ऐका.”’
ही वाणी झाली तेव्हा येशू एकटाच दिसला. ह्यावर ते गप्प राहिले आणि ज्या गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या त्यांतले काहीच त्या दिवसांत त्यांनी कोणाला सांगितले नाही.