लूक 9:1-36
लूक 9:1-36 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग त्याने बारा प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना सर्व भुते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला; आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यास व रोग्यांना बरे करण्यास पाठवले. त्याने त्यांना सांगितले, “वाटेसाठी काही घेऊ नका. काठी, झोळी, भाकरी किंवा पैका घेऊ नका; अंगरखेही दोन-दोन घेऊ नका. ज्या कोणत्या घरात तुम्ही जाल, तेथेच राहा व तेथूनच निघून जा. जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या गावातून निघतेवेळेस आपल्या पायांची धूळ झाडून टाका.” मग ते निघून सर्वत्र सुवार्ता सांगत व रोग बरे करत गावोगावी फिरू लागले. तेव्हा घडत असलेल्या सर्व गोष्टींविषयी मांडलिक हेरोदाने ऐकले; आणि तो मोठ्या घोटाळ्यात पडला, कारण योहान मेलेल्यातून उठला आहे असे कित्येक जण म्हणत होते; कित्येक ‘एलीया प्रकट झाला आहे’ असे म्हणत होते व कित्येक ‘प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे’ असे म्हणत होते. पण हेरोद म्हणाला, “मी योहानाचा शिरच्छेद केला, तर मग ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे, तो कोण?” म्हणून त्याला पाहण्याची तो संधी पाहत होता. नंतर प्रेषितांनी परत येऊन आपण जे जे केले होते ते ते त्याला सविस्तर सांगितले; तेव्हा तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या गावाकडे एकान्त स्थळी गेला. हे समजल्यावर लोकसमुदाय त्याच्यामागून गेले; तेव्हा त्यांचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता, आणि ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना तो बरे करत होता. दिवस उतरू लागला तेव्हा ते बारा प्रेषित जवळ येऊन त्याला म्हणाले, “लोकसमुदायाला निरोप द्या, म्हणजे ते भोवतालच्या गावांत व शेतामळ्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहोत.” पण तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन ह्या लोकांसाठी अन्न विकत आणले नाही तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आमच्याजवळ काही नाही.” कारण ते सुमारे पाच हजार पुरुष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “सुमारे पन्नास-पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यांना बसवा.” त्यांनी त्याप्रमाणे करून सर्वांना बसवले. तेव्हा त्याने त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले. तेव्हा सर्व जण जेवून तृप्त झाले, आणि उरलेले बारा टोपल्या तुकडे त्यांनी उचलून घेतले. नंतर असे झाले की, तो एकान्तात प्रार्थना करत असता शिष्य त्याच्याबरोबर होते. तेव्हा त्याने त्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात?” त्यांनी उत्तर दिले, “बाप्तिस्मा करणारा योहान; पण कित्येक म्हणतात एलीया; आणि कित्येक म्हणतात की, प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे.” त्याने त्यांना म्हटले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “देवाचा ख्रिस्त.” मग हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली; आणि म्हटले, “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:खे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे, आणि तिसर्या दिवशी पुन्हा उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे.” त्याने सर्वांना म्हटले, “जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल; परंतु जो कोणी माझ्याकरता आपल्या जिवास मुकेल तो त्याला वाचवील. कारण जर कोणा मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो त्याची लाज मनुष्याचा पुत्र स्वत:च्या व पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील. मी तुम्हांला खरे सांगतो की, येथे उभे असणार्यांत कोणी असे आहेत की, ते देवाचे राज्य पाहीपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.” ह्या बोलण्यानंतर असे झाले की, सुमारे आठ दिवसांनी पेत्र, योहान व याकोब ह्यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला. आणि तो प्रार्थना करत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले. आणि पाहा, मोशे व एलीया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करत होते; ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन यरुशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. तेव्हा पेत्र व त्याचे सोबती झोपेने भारावले होते; पण ते जागे झाले व त्यांना त्याचे तेज व त्याच्याजवळ उभे असलेले दोन पुरुष दिसले. मग असे झाले की, ते त्याच्यापासून निघून जात असताना पेत्राने येशूला म्हटले, “गुरूजी, आपण येथेच असावे हे बरे; तर आम्ही तीन मंडप करू; आपल्यासाठी एक, मोशेसाठी एक व एलीयासाठी एक;” हे जे तो बोलला त्याचे त्याला भान नव्हते. तो हे बोलत असता मेघ उतरून त्यांच्यावर छाया करू लागला; आणि ते मेघात शिरले तेव्हा ते भयभीत झाले. तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा (प्रिय) ‘पुत्र’, ‘माझा निवडलेला आहे; ह्याचे तुम्ही ऐका.”’ ही वाणी झाली तेव्हा येशू एकटाच दिसला. ह्यावर ते गप्प राहिले आणि ज्या गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या त्यांतले काहीच त्या दिवसांत त्यांनी कोणाला सांगितले नाही.
लूक 9:1-36 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग त्याने त्या बारा शिष्यांस एकत्र बोलावून त्यांना सर्व भूतांवर आणि रोग बरे करायला, सामर्थ्य व अधिकार दिला, आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याविषयीचा संदेश जाहीर करायला व रोग्यांना बरे करायला पाठवले. तो त्यांना म्हणाला, “वाटेसाठी काही घेऊ नका; काठी किंवा झोळी किंवा भाकर किंवा पैसा घेऊ नका आणि दोन दोन अंगरखेही घेवू नका. आणि ज्या कोणत्याही घरात तुम्ही जाल, तेथेच राहा व तेथूनच निघून जा. जितके तुम्हास अंगीकारीत नाहीत तितक्यांच्याविरुद्ध साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या नगरातून निघते वेळी आपल्या पायांची धूळ झाडून टाका.” तेव्हा ते निघाले आणि सर्व ठिकाणी सुवार्ता सांगत व रोग बरे करीत गांवोगांवी फिरत गेले. घडत असलेल्या सर्व गोष्टी ऐकून हेरोद राजा फार घोटाळ्यात पडला, कारण “योहान मरण पावलेल्यांमधून उठला आहे.” असे कित्येक म्हणत होते; आणि कित्येक म्हणत होते की “एलीया प्रकट झाला आहे” आणि दुसरे म्हणत होते की “पुरातन संदेष्ट्यातील कोणीएक उठला आहे.” तेव्हा हेरोद म्हणाला, “योहानाचे शीर मी तोडले, पण ज्याच्याविषयी अशा गोष्टी मी ऐकतो तो हा कोण आहे?” आणि तो त्यास भेटायला पाहत होता. मग प्रेषितांनी परत येऊन आपण जे काही केले होते ते त्यास सविस्तर सांगितले. मग तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या नगराकडे एकीकडे गेला. परंतु याविषयी लोकांनी ऐकल्यावर ते त्याच्यामागे गेले. तेव्हा तो त्यांचे स्वागत करून त्यांच्याशी देवाच्या राज्याविषयी बोलू लागला आणि ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना त्याने बरे केले. दिवस संपत आला, तेव्हा बारा जण जवळ येऊन त्यास म्हणाले, “समुदायाला निरोप दे, म्हणजे ते आसपासच्या गावांत व खेड्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहो.” पण तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन या लोकांसाठी अन्न विकत आणले नाही, तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आम्हाजवळ काही नाही.” कारण ते सुमारे पाच हजार पुरूष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “पन्नास पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यास बसवा,” मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे करून सर्वांस बसवले. त्याने त्या पांच भाकरी व ते दोन मासे घेतले आणि वर स्वर्गाकडे पाहून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले. तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले; आणि त्यांनी मोडलेल्या तुकड्यांतले उरले ते बारा टोपल्या भरून त्यांनी उचलून घेतले. आणि असे झाले की तो एकांतात प्रार्थना करत असता शिष्य त्याच्याबरोबर होते, तेव्हा त्याने त्यांना विचारून म्हटले, “लोकसमुदाय मला कोण म्हणून म्हणतात?” मग त्यांनी उत्तर देऊन म्हटले, “बाप्तिस्मा करणारा योहान, पण कित्येक म्हणतात ‘एलीया,’ व कित्येक म्हणतात की, पुरातन संदेष्ट्यातील कोणीएक पुन्हा उठला आहे.” त्याने त्यांना म्हटले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” तेव्हा पेत्राने उत्तर देऊन म्हटले, “देवाचा ख्रिस्त.” पण हे कोणाला सांगू नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली. आणि म्हटले, “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावी आणि वडील व मुख्य याजक लोक व नियमशास्त्र शिक्षक यांच्याकडून नाकारले जावे व जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे, याचे अगत्य आहे.” आणि तो सर्वांना म्हणाला, “जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे व दररोज आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे चालावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास वाचवील. कारण मनुष्याने सगळे जग मिळवून स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ होईल? जो कोणी माझ्याविषयीची व माझ्या वचनाविषयी लाज धरील त्यांच्याविषयीची लाज मनुष्याचा पुत्र जेव्हा आपल्या स्वतःच्या, पित्याच्या व पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील. आणि मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे राहणाऱ्यांतले काही असे आहेत की, ते देवाचे राज्य पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.” आणि या गोष्टी सांगितल्यानंतर सुमारे आठ दिवसानी असे झाले की, पेत्र व योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला. तेव्हा तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूप पालटले व त्याचे वस्त्र पांढरे शुभ्र लखलखीत झाले. आणि पाहा, दोन पुरूष त्याच्याशी संभाषण करीत होते; हे मोशे व एलीया होते, ते तेजस्वी दिसत होते आणि जे त्याचे प्रयाण तो यरूशलेम शहरात पूर्ण करणार होता, त्याविषयी ते बोलत होते. तेव्हा पेत्र व त्याच्याबरोबर जे होते ते झोपेने भारावले होते, परंतु ते पूर्णपणे जागे झाले तेव्हा त्यांचे तेज आणि जे दोन पुरूष त्याच्याजवळ उभे राहिले होते त्यांनाही पहिले. मग असे झाले की ते त्याच्यापासून दूर होत असता पेत्राने येशूला म्हटले, “हे गुरु, येथे असणे आम्हास बरे आहे; तर आम्ही तीन मंडप करू, तुझ्यासाठी एक व मोशेसाठी एक व एलीयासाठी एक.” आपण काय बोलत आहोत याचे त्यास भान नव्हते. तो या गोष्टी बोलत असता एक ढग येऊन त्यांच्यावर सावली करू लागला आणि ते ढगांत शिरले तेव्हा ते भ्याले. आणि ढगांतून वाणी आली, ती म्हणाली, “हा माझा निवडलेला पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका.” ही वाणी झाल्यावर येशू एकटाच दिसला आणि ते उगेच राहिले व ज्या गोष्टी त्यांनी पहिल्या होत्या त्यांतले काहीच त्यांनी त्या दिवसांमध्ये कोणाला सांगितले नाही.
लूक 9:1-36 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा येशूंनी त्यांच्या बारा जणांना एकत्र बोलाविले, तेव्हा त्यांना दुरात्म्यांना घालवून देण्याचा आणि प्रत्येक रोग व आजार बरे करण्याचा अधिकार दिला. नंतर त्यांनी आपल्या बारा शिष्यांना परमेश्वराच्या राज्याची घोषणा करण्यास व आजार्यांना बरे करण्यास पाठविले. येशूंनी त्यांना सांगितले, “प्रवासाला जाताना काठी, झोळी, अन्न किंवा पैसे, अतिरिक्त अंगरखा असे काहीही घेऊ नका, एखाद्या घरामध्ये प्रवेश कराल, तेव्हा ते गाव सोडेपर्यंत तिथेच राहा. जर एखाद्या गावातील लोकांनी तुमचे स्वागत केले नाही, तर त्या गावातून बाहेर पडा आणि तुमच्या पायांची धूळ तिथेच झटकून टाका, ही त्यांच्याविरुद्ध साक्ष राहील.” त्याप्रमाणे शिष्य शुभवार्ता गाजवीत आणि सर्वत्र आजार्यांना बरे करीत गावोगाव फिरू लागले. येशूंबद्दल शासक हेरोदाने सर्वकाही ऐकले. तेव्हा तो घोटाळ्यात पडला. कारण काही लोक म्हणत होते, “हा बाप्तिस्मा करणारा योहान पुन्हा जिवंत झाला आहे.” आणखी दुसरे म्हणत होते की एलीयाह प्रकट झाला आहे, तर आणखी काही प्राचीन संदेष्ट्यांपैकी एक संदेष्टा मृतातून उठून उदय पावला आहे असे म्हणत होते. पण हेरोद म्हणाला, “मी तर योहानाचा शिरच्छेद केला होता, मग हा मनुष्य कोण ज्याच्याबद्दल मी ऐकत आहे?” आणि तो येशूंना भेटण्याचा प्रयत्न करू लागला. नंतर प्रेषित परत आले आणि आपण काय केले याचा सर्व वृतांत त्यांनी सादर केला, येशू त्यांना घेऊन बेथसैदा या शहराकडे एकांतस्थळी गेले. परंतु समुदायाला हे कळले व ते त्यांच्यामागे गेले. येशूंनी त्यांचे स्वागत केले व त्यांना परमेश्वराच्या राज्याविषयी शिक्षण दिले आणि बरे होण्याची ज्यांना गरज होती त्यांना बरे केले. दुपार टळल्यानंतर बारा शिष्य त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, “लोकांना पाठवून द्या म्हणजे ते आजूबाजूच्या खेड्यांमध्ये व गावांमध्ये जातील आणि त्यांच्या खाण्याची व राहण्याची व्यवस्था करतील, कारण आपण येथे निर्जन ठिकाणी आहोत.” त्यांनी उत्तर दिले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.” यावर ते म्हणाले, “आमच्याजवळ केवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत—या सर्व लोकांस पुरेल इतके अन्न आम्ही जाऊन विकत आणले तरच हे शक्य आहे” तिथे पुरुषांचीच संख्या अंदाजे पाच हजार होती. येशू शिष्यांना म्हणाले, “अंदाजे पन्नास लोक अशाप्रकारे गटागटाने त्यांना खाली बसावयास सांगा.” तेव्हा शिष्यांनी त्याप्रमाणे केले आणि सर्व लोक खाली बसले. येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले आणि स्वर्गाकडे पाहून आभार मानले आणि त्या भाकरीचे तुकडे केले. नंतर त्यांनी ते शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले. ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले आणि शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या बारा टोपल्या उचलल्या. एकदा येशू एकटेच प्रार्थना करीत होते आणि त्यांचे शिष्य जवळच होते. येशूंनी त्यांना विचारले, “मी कोण आहे म्हणून लोकसमुदाय मला ओळखतात?” ते म्हणाले, “काही म्हणतात बाप्तिस्मा करणारा योहान; काही एलीयाह; आणखी काहीजण म्हणतात, आपण मरणातून उठलेले प्राचीन काळातील संदेष्ट्यांपैकी एक आहात.” “परंतु तुमचे मत काय?” येशूंनी विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही परमेश्वराचे ख्रिस्त आहात.” येशूंनी त्यांना निक्षून आज्ञा केली की हे कोणालाही सांगू नका. ते म्हणाले, “मानवपुत्राला पुष्कळ दुःखे सहन करावी आणि वडीलजन व मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून नाकारले जाऊन जिवे मारले जावे आणि तिसर्या दिवशी पुन्हा जिवंत होणे याचे अगत्य आहे.” नंतर ते सर्वांना म्हणाले, “जर कोणी माझा शिष्य होऊ पाहतो तर त्याने स्वतःस नाकारावे, दररोज त्याचा क्रूसखांब उचलावा आणि माझ्यामागे यावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवेल तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आपल्या जीवाला गमावेल, तो त्याचा जीव वाचवेल. कोणी सारे जग मिळविले आणि आपल्या स्वतःला गमाविले व नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? ज्या कोणाला माझी व माझ्या वचनाची लाज वाटेल, तर जेव्हा मानवपुत्र पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईन तेव्हा त्यालाही त्याची लाज वाटेल. “मी तुम्हाला निश्चित सांगतो, येथे उभे असणारे काहीजण परमेश्वराचे राज्य पाहीपर्यंत, त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही.” या गोष्टी सांगितल्यानंतर सुमारे आठ दिवसांनी पेत्र, याकोब आणि योहान यांना येशूंनी बरोबर घेतले आणि ते प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले. येशू प्रार्थना करीत असताना त्यांच्या मुखाचे रूपांतर झाले आणि त्यांची वस्त्रे विजेसारखी लखलखीत झाली. मग दोन पुरुष म्हणजे स्वतः मोशे आणि एलीयाह तिथे प्रकट झाले आणि येशूंबरोबर संवाद करू लागले. आणि ते त्यांच्याबरोबर परमेश्वराच्या संकल्पाप्रमाणे नियोजित केलेल्या व यरुशलेममध्ये येशूंना होणार्या प्रयाणासंबंधाने बोलत होते. यावेळी पेत्र आणि इतर दोन शिष्यांना अतिशय झोप आली होती, परंतु जागे झाल्यानंतर त्यांनी येशूंचे वैभव पाहिले आणि दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे असलेले पाहिले. मग मोशे व एलीयाह येशूंना सोडून जात असताना, पेत्र येशूंना म्हणाले, “गुरुजी, आपल्याला येथेच राहता आले, तर फार चांगले होईल! आपण येथे तीन मंडप—एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयाहसाठी बांधू या.” त्याला काय बोलावे हे समजत नव्हते. पण तो हे बोलत असतानाच, मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि त्यात प्रवेश करते वेळी ते भयभीत झाले. मेघातून एक वाणी म्हणाली, “हा माझा पुत्र आहे, मी याला निवडले आहे, याचे तुम्ही ऐका.” ही वाणी झाली, तेव्हा येशू एकटेच त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी काय पाहिले याविषयी शिष्यांनी कोणाला काहीही सांगितले नाही.
लूक 9:1-36 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग त्याने बारा प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना सर्व भुते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला; आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यास व रोग्यांना बरे करण्यास पाठवले. त्याने त्यांना सांगितले, “वाटेसाठी काही घेऊ नका. काठी, झोळी, भाकरी किंवा पैका घेऊ नका; अंगरखेही दोन-दोन घेऊ नका. ज्या कोणत्या घरात तुम्ही जाल, तेथेच राहा व तेथूनच निघून जा. जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या गावातून निघतेवेळेस आपल्या पायांची धूळ झाडून टाका.” मग ते निघून सर्वत्र सुवार्ता सांगत व रोग बरे करत गावोगावी फिरू लागले. तेव्हा घडत असलेल्या सर्व गोष्टींविषयी मांडलिक हेरोदाने ऐकले; आणि तो मोठ्या घोटाळ्यात पडला, कारण योहान मेलेल्यातून उठला आहे असे कित्येक जण म्हणत होते; कित्येक ‘एलीया प्रकट झाला आहे’ असे म्हणत होते व कित्येक ‘प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे’ असे म्हणत होते. पण हेरोद म्हणाला, “मी योहानाचा शिरच्छेद केला, तर मग ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे, तो कोण?” म्हणून त्याला पाहण्याची तो संधी पाहत होता. नंतर प्रेषितांनी परत येऊन आपण जे जे केले होते ते ते त्याला सविस्तर सांगितले; तेव्हा तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या गावाकडे एकान्त स्थळी गेला. हे समजल्यावर लोकसमुदाय त्याच्यामागून गेले; तेव्हा त्यांचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता, आणि ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना तो बरे करत होता. दिवस उतरू लागला तेव्हा ते बारा प्रेषित जवळ येऊन त्याला म्हणाले, “लोकसमुदायाला निरोप द्या, म्हणजे ते भोवतालच्या गावांत व शेतामळ्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहोत.” पण तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन ह्या लोकांसाठी अन्न विकत आणले नाही तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आमच्याजवळ काही नाही.” कारण ते सुमारे पाच हजार पुरुष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “सुमारे पन्नास-पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यांना बसवा.” त्यांनी त्याप्रमाणे करून सर्वांना बसवले. तेव्हा त्याने त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले. तेव्हा सर्व जण जेवून तृप्त झाले, आणि उरलेले बारा टोपल्या तुकडे त्यांनी उचलून घेतले. नंतर असे झाले की, तो एकान्तात प्रार्थना करत असता शिष्य त्याच्याबरोबर होते. तेव्हा त्याने त्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात?” त्यांनी उत्तर दिले, “बाप्तिस्मा करणारा योहान; पण कित्येक म्हणतात एलीया; आणि कित्येक म्हणतात की, प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे.” त्याने त्यांना म्हटले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “देवाचा ख्रिस्त.” मग हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली; आणि म्हटले, “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:खे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे, आणि तिसर्या दिवशी पुन्हा उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे.” त्याने सर्वांना म्हटले, “जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल; परंतु जो कोणी माझ्याकरता आपल्या जिवास मुकेल तो त्याला वाचवील. कारण जर कोणा मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो त्याची लाज मनुष्याचा पुत्र स्वत:च्या व पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील. मी तुम्हांला खरे सांगतो की, येथे उभे असणार्यांत कोणी असे आहेत की, ते देवाचे राज्य पाहीपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.” ह्या बोलण्यानंतर असे झाले की, सुमारे आठ दिवसांनी पेत्र, योहान व याकोब ह्यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला. आणि तो प्रार्थना करत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले. आणि पाहा, मोशे व एलीया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करत होते; ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन यरुशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. तेव्हा पेत्र व त्याचे सोबती झोपेने भारावले होते; पण ते जागे झाले व त्यांना त्याचे तेज व त्याच्याजवळ उभे असलेले दोन पुरुष दिसले. मग असे झाले की, ते त्याच्यापासून निघून जात असताना पेत्राने येशूला म्हटले, “गुरूजी, आपण येथेच असावे हे बरे; तर आम्ही तीन मंडप करू; आपल्यासाठी एक, मोशेसाठी एक व एलीयासाठी एक;” हे जे तो बोलला त्याचे त्याला भान नव्हते. तो हे बोलत असता मेघ उतरून त्यांच्यावर छाया करू लागला; आणि ते मेघात शिरले तेव्हा ते भयभीत झाले. तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा (प्रिय) ‘पुत्र’, ‘माझा निवडलेला आहे; ह्याचे तुम्ही ऐका.”’ ही वाणी झाली तेव्हा येशू एकटाच दिसला. ह्यावर ते गप्प राहिले आणि ज्या गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या त्यांतले काहीच त्या दिवसांत त्यांनी कोणाला सांगितले नाही.
लूक 9:1-36 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नंतर येशूने त्याच्या बारा प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना भुते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सर्व सामर्थ्य व अधिकार दिला. देवाच्या राज्याची घोषणा करायला व रोग्यांना बरे करायला पाठवताना त्याने त्यांना सांगितले, “वाटेसाठी काही घेऊ नका. काठी, झोळी, भाकर किंवा पैसे घेऊ नका. दोन दोन अंगरखे घेऊ नका. ज्या घरात तुम्ही जाल, तेथेच राहा. तेथून निघेपर्यंत तिथेच मुक्काम करा. जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध साक्ष म्हणून त्या नगरातून निघते वेळेस तुमच्या पायांची धूळ झटकून टाका.” ते निघून सर्वत्र शुभवर्तमान जाहीर करीत व रोग बरे करीत गावोगावी फिरू लागले. त्या वेळी घडत असलेल्या सर्व गोष्टींविषयी राज्यकर्त्या हेरोदने ऐकले आणि तो फार संभ्रमात पडला; कारण योहान मेलेल्यातून उठला आहे, असे कित्येक लोक म्हणत होते. आणखी काही लोक एलिया प्रकट झाला आहे, असे म्हणत होते व इतर काही लोक प्राचीन संदेष्ट्यांपैकी एखादा पुन्हा उठला आहे, असे म्हणत होते. हेरोद म्हणाला, “मी योहानचा शिरच्छेद केला असताना ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे, तो कोण असावा?” म्हणून त्याला भेटण्याची तो संधी शोधू लागला. प्रेषितांनी परत येऊन आपण जे जे केले होते ते ते येशूला सविस्तर सांगितले. तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या नगरात एकांत स्थळी गेला. हे समजल्यावर लोकसमुदाय त्याच्यामागून गेले. त्यांचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता. ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना तो बरे करत होता. दिवस उतरू लागला, तेव्हा बारा प्रेषित जवळ येऊन त्याला म्हणाले, “लोकांना निरोप द्या, म्हणजे ते भोवतालच्या गावांत व शेतामळ्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे निर्जन ठिकाणी आहोत.” परंतु तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन ह्या सर्व लोकांसाठी अन्न विकत आणले नाही तर पाच भाकरी व दोन मासे ह्यांव्यतिरिक्त आमच्याजवळ काही नाही.” तेथे सुमारे पाच हजार पुरुष होते. त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “सुमारे पन्नास पन्नास जणांचे गट करून त्यांना बसवा.” त्यांनी त्याप्रमाणे सर्वांना बसवले. त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यांना आशीर्वाद दिला. त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले. सर्व जण जेवून तृप्त झाले आणि शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या. तो एकान्ती प्रार्थना करत असता शिष्य त्याच्या बरोबर होते. त्याने त्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात?” त्यांनी उत्तर दिले, “बाप्तिस्मा देणारा योहान, पण कित्येक म्हणतात, एलिया आणि आणखी काही लोक म्हणतात की, प्राचीन संदेष्ट्यांतील एखादा पुन्हा उठला आहे.” त्याने त्यांना म्हटले, “पण तुम्ही मला कोण म्हणून मानता?” पेत्राने उत्तर दिले, “देवाचा मसिहा.” हे कोणाला कळता कामा नये, असा त्याने त्यांना निक्षून आदेश दिला. शिवाय त्याने त्यांना हेदेखील सांगितले की, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःख भोगावे, वडीलजन, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, ठार मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले जावे, हे घडणे क्रमप्राप्त आहे. त्याने सर्वांना म्हटले, “जर कोणी माझे अनुसरण करू पाहत असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व दररोज स्वतःचा क्रूस उचलून घेऊन मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचवू पाहत असेल तो आपल्या जिवाला मुकेल. परंतु जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. जर माणसाने सगळे जग कमावले आणि स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला, तर त्याला काय लाभ? ज्याला माझी व माझ्या वचनांची लाज वाटते, त्याची लाज मनुष्याच्या पुत्राला तो स्वतःच्या, पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या वैभवाने येईल तेव्हा वाटेल. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, येथे उभे असणाऱ्यांत काही जण असे आहेत की, देवाचे राज्य पाहिल्याविना त्यांना मरण येणार नाही.” ह्या निवेदनानंतर सुमारे आठ दिवसांनी पेत्र, योहान व याकोब ह्यांना बरोबर घेऊन येशू प्रार्थना करायला डोंगरावर गेला. तो प्रार्थना करीत असता त्याच्या चेहऱ्याचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र डोळे दिपून टाकण्याइतके पांढरेशुभ्र झाले आणि काय आश्चर्य! अकस्मात मोशे व एलिया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करीत असता त्यांच्या दृष्टीस पडले. ते तेजोमय दिसले. यरुशलेममधील त्याच्या मृत्यूने येशू देवाची योजना कशी पूर्ण करणार होता, ह्याविषयी ते बोलत होते. पेत्र व त्याचे सोबती झोपेने भारावले होते तरीही ते जागे राहिले होते म्हणून त्यांना येशूचे तेज व त्याच्याजवळ उभे असलेले दोघे पुरुष दिसले. ते दोघे येशूपासून निघून जात असताना पेत्राने येशूला म्हटले, “गुरुवर्य, आपण येथेच असावे हे बरे. आम्ही तीन तंबू तयार करतो. आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक.” हे जे तो बोलला, त्याचे त्याला भान नव्हते. तो हे बोलत असता एक ढग उतरून त्यांच्यावर छाया करू लागला. ते मेघात शिरले तेव्हा शिष्य भयभीत झाले. मेघातून अशी वाणी झाली, “हा माझा पुत्र, माझा निवडलेला आहे, ह्याचे तुम्ही ऐका!” ही वाणी झाल्यावर येशू एकटाच दिसला. मात्र शिष्य गप्प राहिले आणि जे काही त्यांनी पाहिले होते, त्यातले त्यांनी त्या दिवसांत कोणाला काहीच सांगितले नाही.