रोमकरांस पत्र 9:19-33
रोमकरांस पत्र 9:19-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू ह्यावर म्हणशील की, तो तरीही दोष का लावतो? त्याच्या योजनेला कोणी विरोध केला आहे? पण उलट अरे बंधू, तू जो देवाला उलटून बोलतोस तो तू कोण आहेस? तू मला असे का केलेस, अशी कोणती वस्तू करणार्याला म्हणू शकेल? कुंभाराने एकाच गोळ्यामधून एक पात्र मानासाठी तर दुसरे अपमानासाठी करायला मातीवर अधिकार नाही काय? मग आपण आपला क्रोध व्यक्त करावा आणि आपले सामर्थ्य प्रकट करावे असे जरी देव इच्छीत असला, तरी त्याने जर नाशासाठी तयार केलेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने वागविले, आणि गौरवासाठी आधी योजलेल्या दयेच्या पात्रांवर आपल्या गौरवाच धन प्रकट करावे म्हणून त्याने असे केले तर काय? त्याने ज्यांना केवळ यहूद्यांमधून नाही, पण परराष्ट्रीयामधूनही बोलावले आहे ते आपण ती दयेची पात्रे आहोत. कारण तो होशेयाच्या ग्रंथात असेही म्हणतो की, ‘जे माझी प्रजा नव्हते त्यांना मी माझी प्रजा म्हणेन, आणि जी माझी आवडती नव्हती, तिला मी माझी आवडती म्हणेन. आणि असे होईल की त्यांना ज्याठिकाणी, तुम्ही माझी प्रजा नाही, असे म्हणले होते, तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र म्हणले जाईल.’ यशयादेखील इस्राएलाविषयी ओरडून म्हणतो की, ‘इस्राएलाच्या पुत्रांची संख्या जरी समुद्राच्या वाळूसारखी झाली, तरी एक अवशेष वाचवला जाईल. कारण सर्व संपवून थांबविल्याप्रमाणे प्रभू पृथ्वीवर आपले वचन पूर्ण करील.’ आणि यशयाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे, सैन्यांच्या प्रभूने जर आपल्यासाठी बीज ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे असतो आणि गमोरासारखे झालो असतो. मग आपण काय म्हणावे? तर जे परराष्ट्रीय नीतिमत्त्वाच्या मागे लागले नाहीत त्यांनी नीतिमत्त्व मिळविले आहे, म्हणजे विश्वासाने मिळणारे नीतिमत्त्व मिळविले आहे. पण जे इस्राएल नीतिमत्त्वाच्या नियमाच्या मागे लागले ते त्या नियमापर्यंत पोहोचले नाहीत. आणि का? कारण ते विश्वासाने नाही, पण कृतींनी त्याच्यामागे लागले कारण ते अडखळणाच्या दगडावर अडखळले. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘बघा, मी सियोनात एक अडखळण्याचा दगड, एक अडथळ्याचा खडक ठेवतो. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’
रोमकरांस पत्र 9:19-33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुमच्यापैकी काही मला म्हणतील: “परमेश्वर आम्हाला दोष का लावतात? त्यांच्या इच्छेला विरोध कोण करणार?” मानव असून, परमेश्वराला उलट उत्तर देणारे तुम्ही कोण? “घडलेल्या वस्तूने ती घडविणार्याला, ‘तू मला असे का घडविलेस असे म्हणावे काय?’ ” कुंभाराला एकाच मातीच्या गोळयातून एक पात्र विशेष उद्देशासाठी व काही सामान्य वापरासाठी घडविण्याचा अधिकार नाही काय? परंतु आपला क्रोध दाखवावा आणि आपले सामर्थ्य प्रकट करावे असे परमेश्वराने ठरविले तर, नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांचे फार सहनशीलतेने सहन करतील काय? त्यांनी हे अशासाठी केले की पूर्वीच तयार केलेल्या दयेच्या पात्राला त्यांच्या वैभवाची धनसंपत्ती प्रकट करावी. आम्हाला पण त्यांनी बोलाविले, केवळ यहूदीयातूनच नाही तर गैरयहूदीयातूनही नाही का? होशेयाने म्हटल्याप्रमाणे: “जे माझे लोक नाहीत त्यांना मी ‘माझे लोक’ म्हणेन; आणि जी मला प्रिय नाही तिला मी ‘माझी प्रिया’ असे म्हणेन,” आणि, “ज्या ठिकाणी म्हटले होते, तुम्ही माझे लोक नाहीत, तिथे त्यांना जिवंत परमेश्वराची लेकरे असे म्हणतील.” यशायाह इस्राएलाविषयी उच्च वाणीने म्हणतो: “इस्राएलाची संख्या समुद्राच्या वाळूच्या कणासारखी असली, तरी अवशिष्ट मात्र तारले जातील. कारण प्रभू त्यांचा दंड पृथ्वीवर वेगाने आणि निर्णयात्मक रीतीने अंमलात आणतील,” यशायाहने आधी म्हटल्याप्रमाणे: “सेनाधीश प्रभूने जर आमचे वंशज वाचविले नसते, तर आम्ही सदोमासारखे झालो असतो आणि गमोरासारखी आमची गत झाली असती.” तर मग आपण काय म्हणावे? गैरयहूदी लोक खर्या अर्थाने नीतिमत्वाचा शोध करीत नव्हते, तरी त्यांना विश्वासाद्वारे नीतिमत्व प्राप्त झाले. पण नियमशास्त्राद्वारे नीतिमत्व मिळण्यासाठी प्रयत्न करणारे इस्राएल लोक मात्र ते प्राप्त करू शकले नाहीत. का नाही? कारण विश्वासाने नव्हे तर कर्माने मिळेल म्हणून ते त्याच्यामागे लागले. ते अडखळविणार्या धोंड्याला अडखळले. असे लिहिले आहे: “पाहा, सीयोनात मी लोकांना ठेच लागण्याचा एक दगड व अडखळण्याचा एक खडक ठेवतो ज्यामुळे ते पडतील, पण त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित होणार नाही.”
रोमकरांस पत्र 9:19-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यावर तू मला म्हणशील, तर मग तो अजून दोष का लावत असतो? कारण त्याच्या संकल्पाला कोण आड आला आहे? हे मानवा, देवाला उलटून बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडवणार्याला, “तू मला असे का केलेस,” असे म्हणेल काय? किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय? आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने जर वागवून घेतले, आणि ज्या आपल्याला केवळ यहूद्यांतून नव्हे तर परराष्ट्रीयांतूनही पाचारण झाले, त्या आपल्याविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी असे त्याला वाटत असले, तर काय? तो होशेयाच्या पुस्तकात हेही म्हणतो की, “जे माझे लोक नव्हत त्यांना मी आपले लोक म्हणेन, आणि जी प्रिय नाही तिला ‘माझी प्रिय’ म्हणेन.” “आणि असे होईल की, ‘तुम्ही माझे लोक नाही’ असे जेथे म्हटले होते तेथे त्यांना ‘जिवंत देवाचे पुत्र’ असे म्हणण्यात येईल.” यशयाही इस्राएलाविषयी असे पुकारतो की, “जरी इस्राएल लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली, तरी अवशेष मात्र तारण पावेल; कारण प्रभू आपले न्यायाचे वचन आटोपते घेऊन व समाप्त करून पृथ्वीवर ते सिद्धीस नेईल.” त्याप्रमाणे यशयाने पूर्वी म्हटले, “जर सेनाधीश प्रभूने आमच्यासाठी बीज राहू दिले नसते, तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, व गमोराप्रमाणे बनलो असतो.” तर मग आपण काय म्हणावे? असे की, जे परराष्ट्रीय नीतिमत्त्वाच्या मागे लागले नव्हते त्यांना नीतिमत्त्व म्हणजे विश्वासाच्या द्वारे मिळणारे नीतिमत्त्व प्राप्त झाले. परंतु इस्राएल लोक नीतिमत्त्वाच्या नियमामागे लागले होते तरी ते त्या नियमापर्यंत जाऊन पोहचले नाहीत. का नाहीत? कारण विश्वासाने नव्हे तर कर्मांनी कार्य होईल असे समजून ते त्याच्यामागे लागले. ‘अडवणुकीच्या धोंड्यावर’ ते ठेचाळले; त्याप्रमाणे शास्त्रात लिहिले आहे, “पाहा, अडवणुकीचा धोंडा व अडखळण्याचा खडक मी सीयोनात ठेवतो; त्याच्यावर जो विश्वास ठेवील तो फजीत होणार नाही.”
रोमकरांस पत्र 9:19-33 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्यावर तू मला म्हणशील, “तर मग तो कुणालाही दोष कसा लावू शकतो? कारण त्याच्या संकल्पाच्या आड कोण येऊ शकतो?” हे मानवा, देवाला उलट बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडविणाऱ्याला, “तू मला असे का केलेस?”, असे म्हणेल काय? किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे, असा कुंभाराचा अधिकार मातीच्या गोळ्यावर नाही काय? आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने जर वागवून घेतले आणि ज्या आपल्याला केवळ यहुदी लोकांतून नव्हे तर यहुदीतरांतूनही पाचारण झाले, त्या आपल्याविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी, असे त्याला वाटत असले, तर काय? होशेयच्या पुस्तकात परमेश्वर हेही म्हणतो: जे माझे लोक नव्हते, त्यांना मी माझे लोक म्हणेन आणि जे राष्ट्र प्रिय नाही त्याला प्रिय म्हणेन आणि असे होईल की, तुम्ही माझे लोक नाही, असे जेथे म्हटले होते, तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र असे म्हणण्यात येईल. यशयासुद्धा इस्राएलविषयी असे म्हणतो: जरी इस्राएली लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली, तरी थोड्याच लोकांचा बचाव केला जाईल; कारण प्रभू पृथ्वीविषयीचा त्याचा न्याय त्वरित आणि निर्णायकरीत्या पूर्ण करील. हे यशयाने पूर्वीच म्हटल्याप्रमाणे आहे: जर सेनाधीश प्रभूने आमच्यांसाठी बीज राहू दिले नसते, तर आम्ही सदोम नगरासारखे झालो असतो व आमची अवस्था गमोर नगराप्रमाणे झाली असती. तर मग आपण असे म्हणावे की, जे यहुदीतर नीतिमत्त्वाच्या मागे लागले नव्हते, त्यांना विश्वासाद्वारे मिळणारे नीतिमत्त्व प्राप्त झाले. परंतु इस्राएली लोक नीतिमत्त्वाच्या नियमशास्त्रामागे लागले होते तरी ते त्या नियमशास्त्रापर्यंत जाऊन पोहोचले नाहीत. का? कारण विश्वासाने नव्हे तर कृत्यांनी कार्य होईल, असे समजून ते त्याच्या मागे लागले. अशा प्रकारे अडथळ्याच्या धोंड्यावर ते ठेचाळले. त्याप्रमाणे धर्मशास्त्रात लिहिले आहे: पाहा, सीयोनमध्ये मी अडथळ्याचा धोंडा, अडखळण्याचा खडक ठेवतो, लोक त्यावर पडतील. परंतु त्याच्यावर जो विश्वास ठेवील, तो फजित होणार नाही.