YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 112:1-9

स्तोत्रसंहिता 112:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वराची स्तुती करा. जो मनुष्य परमेश्वराच्या आज्ञा पाळतो, जो त्याच्या आज्ञेत मोठा आनंद करतो, तो आशीर्वादित आहे. त्याचे वंशज पृथ्वीवर शक्तीमान होतील; धार्मिक आशीर्वादित होतील. धन व श्रीमंती त्यांच्या घरात आहेत; त्यांचे नितीमत्व सर्वकाळ टिकते. धार्मिक मनुष्यांसाठी अंधकारात प्रकाश चमकवतो; तो दयाळू, कृपाळू आणि न्यायी आहे. जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो, जो प्रामाणिकपणे वागून आपला व्यापार करतो त्याचे चांगले होते. कारण तो मनुष्य कधीही हलणार नाही; नितीमान मनुष्याची आठवण सर्वकाळ राहील. तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचा परमेश्वरावर भरवसा असून त्यास खात्री आहे. त्याचे हृदय निश्चल आहे, आपल्या शत्रूवर विजय मिळालेला पाहीपर्यंत तो भिणार नाही. तो गरीबांना उदारपणे देतो; त्याचे नितीमत्व सर्वकाळ राहील; तो सन्मानाने उंचविला जाईल.

स्तोत्रसंहिता 112:1-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

याहवेहचे स्तवन करा. याहवेहचे भय बाळगणारे, आणि त्यांच्या आज्ञापालनामध्ये आनंद मानणारे आशीर्वादित आहेत. त्यांची संतती पृथ्वीवर अतिथोर होईल; नीतिमानाची पिढी आशीर्वादित होईल. संपत्ती व समृद्धी त्यांच्या घरात वास करतील, आणि त्यांची धार्मिकता चिरकाल टिकून राहील. सात्विकासाठी अंधकारातही प्रकाश उदय पावतो; ते कृपावान, दयाळू व नीतिमान असतात. ज्यांचे अंतःकरण उदार असून ते मुक्तपणे उसने देतात त्यांचे भले होते, जे आपला व्यवहार न्यायाने करतात. निश्चितच, नीतिमान कधीही पथभ्रष्ट होणार नाही; त्यांना सर्वकाळ स्मरणात ठेवले जाईल. वाईट बातमी त्यांना भयभीत करणार नाही; याहवेहवर पूर्ण भरवसा असल्याने त्यांचे मन स्थिर असते. यामुळेच त्यांचे अंतःकरण सुरक्षित असते, ते भयग्रस्त होत नाहीत; शेवटी तेच आपल्या शत्रूंवर विजयान्वित दृष्टी टाकतील. गरजवंतांना ते उदारहस्ते दानधर्म करतात, त्यांची नीतिमत्ता चिरकाळ टिकते; गौरवाने त्यांचे शिंग उंचावले जाईल.

स्तोत्रसंहिता 112:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परमेशाचे स्तवन करा!1 जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य! त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल; सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल. धनसंपदा त्याच्या घरी असते; त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ टिकते. सरळ जनांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. त्याच्या ठायी कृपा, दया व न्याय ही आहेत. जो मनुष्य दया करतो व उसने देतो त्याचे कल्याण होते; तो न्यायाने आपले व्यवसाय करील. तो कधीही ढळणार नाही; नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील. तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते. त्याचे मन स्थिर असते, आपल्या शत्रूंची गत आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो भिणार नाही. त्याने सढळ हाताने गरिबांना दान दिले आहे; त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहील. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल2