तिबिर्य कैसराच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी—ज्यावेळी पिलात यहूदीयाचा राज्यपाल होता, हेरोद गालील प्रांताचा, त्याचा भाऊ फिलिप्प इतुरीया व त्राखोनीतीचा आणि लूसनिया अबिलेनेचा शासक होता. हन्ना व कयफा हे महायाजक पदावर होते. यावेळी जखर्याहचा पुत्र योहानास अरण्यात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. आणि तो यार्देनेच्या आसपासच्या सर्व प्रदेशात, पापक्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याचा संदेश देत फिरला. यशायाह संदेष्ट्याच्या शब्दांच्या पुस्तकात लिहिले आहे:
“अरण्यात घोषणा करणार्या एकाची वाणी झाली,
‘प्रभूसाठी मार्ग तयार करा,
त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.
प्रत्येक दरी भरून जाईल,
प्रत्येक डोंगर आणि टेकडी समान होतील,
वाकड्या वाटा सरळ होतील,
खडतर रस्ते सुरळीत होतील.
आणि सर्व लोक परमेश्वराचे तारण पाहतील.’ ”
त्याच्याकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी आलेल्या समुदायास योहान म्हणाला, “अहो सापांच्या पिलांनो, येणार्या क्रोधापासून पळून जाण्यास तुम्हाला कोणी सावध केले? पश्चात्तापाला साजेल अशी फळे द्या. ‘आमचा पिता तर अब्राहाम आहे,’ असे आपल्या मनात म्हणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वर या दगडांपासून देखील अब्राहामासाठी संतती निर्माण करण्यास समर्थ आहे. कुर्हाड आधीच झाडांच्या मुळावर ठेवलेली आहे आणि प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल आणि अग्नीत टाकण्यात येईल.”
यावर समुदायाने त्याला विचारले, “तर मग आम्ही काय करावे?”
यावर योहानाने उत्तर दिले, “तुमच्याजवळ दोन अंगरखे असतील, तर ज्याच्याजवळ एकही नाही त्याला द्यावा, तुमच्याजवळ अन्न असेल, तर त्यांनीही तसेच करावे.”
जकातदारही बाप्तिस्मा घेण्यासाठी आले आणि त्यांनी त्याला विचारले, “गुरुजी, आम्ही काय करावे?”
योहानाने उत्तर दिले, “जे जमा करावयाचे आहे, त्यापेक्षा अधिक घेऊ नका.”
काही शिपायांनी विचारले, “आम्ही काय करावे?” योहानाने उत्तर दिले.
“धमक्या देऊन किंवा खोटे आरोप रचून पैसा उकळू नका आणि आपल्या वेतनात संतुष्ट राहा.”
लोक अपेक्षेने वाट पाहत होते आणि त्यांच्या मनात आश्चर्य करीत होते की कदाचित योहानच ख्रिस्त असले पाहिजे. योहानाने त्या सर्वांना उत्तर दिले, “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो. परंतु जे माझ्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेत ते येतील, त्यांचा गुलाम होऊन त्यांच्या पादत्राणाचे बंद सोडण्याचीही माझी योग्यता नाही. ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करतील. खळे स्वच्छ करण्यास त्यांच्या हातात धान्य पाखडण्याचे सूप आहे, ते गहू कोठारात साठवतील आणि न विझणार्या अग्नीमध्ये भुसा जाळून टाकतील.” दुसर्या अनेक शब्दांनी योहानाने लोकांना बोध केला आणि जाहीरपणे शुभवार्ता सांगितली.