दुसऱ्या दिवशी येशू आणि त्याचे तीन शिष्य त्या डोंगरावरून खाली आल्यावर पुष्कळ लोक त्याला येऊन भेटले. तेव्हा पाहा, समुदायातून एक मनुष्य ओरडून म्हणाला, “गुरुजी, मी आपणाला विनंती करतो, माझ्या मुलाकडे कृपादृष्टी वळवा. हा माझा एकुलता एक आहे. हे बघा, एक आत्मा ह्याला धरतो तसा हा अचानक ओरडतो. तो ह्याला असा झटका देतो की, ह्याच्या तोंडाला फेस येतो; तो ह्याला पुष्कळ क्लेश देतो व ह्याला सोडता सोडत नाही. त्याला काढून टाकावे म्हणून आपल्या शिष्यांना मी विनंती केली, परंतु त्यांना तो काढता येईना.”
येशूने म्हटले, “अहो विश्वासहीन व व़िकृत मनोवृत्तीच्या लोकांनो, मी कोठवर तुमच्याबरोबर राहू व तुमचे सोसू?” नंतर तो त्या माणसाला म्हणाला, “तुझ्या मुलाला इकडे आण.”
तो जवळ येत आहे, इतक्यात भुताने त्याला आपटले व मूर्च्छित अवस्थेत टाकून दिले, पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला निघून जाण्याचा हुकूम सोडला आणि मुलाला बरे करून त्याच्या वडिलांजवळ परत दिले. अदेवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले!
बयेशूने केलेल्या सर्व कृत्यांवरून सर्व लोक आश्चर्य व्यक्त करीत असता, तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे.” परंतु हे वचन त्यांना समजले नाही. ते त्यांना समजू नये म्हणून त्यांच्यापासून ते गुप्त ठेवण्यात आले होते आणि ह्याविषयी त्याला विचारण्यास ते धजत नव्हते.
आपणांमध्ये मोठा कोण, ह्याविषयी शिष्यांमध्ये आपसात वाद सुरू झाला. येशूने त्यांच्या अंतःकरणातील विचार ओळखून एका लहान मुलाला घेतले आणि त्याला आपणाजवळ उभे केले. आणि त्यांना म्हटले, “जो कोणी ह्या बालकाचा माझ्या नावाने स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो, तो ज्याने मला पाठवले, त्याचा स्वीकार करतो. तुम्हां सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे.”
योहानने म्हटले, “गुरुवर्य, आम्ही एका माणसाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मनाई केली कारण तो आपला अनुयायी नव्हता.”
येशूने त्याला म्हटले, “त्याला मनाई करू नका. जो तुम्हांला विरोध करत नाही, तो तुमच्या बाजूचा आहे.”
वर घेतले जाण्याचा त्याचा समय जवळ आला, तेव्हा येशूने यरुशलेमला जाण्याच्या दृढ निश्चयाने आपले तोंड तिकडे वळवले. त्याने आपणापुढे काही जण पाठवले. ते निघून त्याच्यासाठी तयारी करायला शोमरोनी लोकांच्या एका गावात गेले. परंतु तेथील लोकांनी येशूचा स्वीकार केला नाही कारण त्याचा रोख यरुशलेमकडे जाण्याचा होता. हे पाहून त्याचे शिष्य याकोब व योहान म्हणाले, “प्रभो, आकाशातून अग्नी पडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आदेश द्यावा, अशी आपली इच्छा आहे काय?”
त्याने वळून त्यांना खडसावले. नंतर येशू व त्याचे शिष्य दुसऱ्या गावास गेले.
ते वाटेने चालत असता एका माणसाने येशूला म्हटले, “आपण जेथे कोठे जाल, तेथे मी तुमच्या मागे येईन.”
तो त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना बिळे व आकाशातल्या पक्ष्यांना घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला जागा नाही.”
त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, “माझ्यामागे ये”, परंतु तो म्हणाला, “प्रभो, प्रथम मला माझ्या वडिलांना पुरायला जाऊ द्या.”
तो त्याला म्हणाला, “मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे, तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.”
आणखी एकाने म्हटले, “प्रभो, मी आपल्यामागे येईन, परंतु प्रथम मला माझ्या कुटुंबीयांचा निरोप घेऊ द्या.”
येशूने त्याला म्हटले, “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो, तो देवाच्या राज्यासाठी योग्य नाही.”