पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा येशू यार्देन नदीवरून परतला आणि आत्म्याने त्याला चाळीस दिवस रानात नेले. तेथे सैतानाने चाळीस दिवस त्याची परीक्षा घेतली. त्या दिवसांत त्याने काही खाल्ले नाही म्हणून ते दिवस संपल्यावर त्याला भूक लागली.
सैतान त्याला म्हणाला, “तू देवाचा पुत्र असलास, तर ह्या धोंड्याला ‘भाकर हो’ अशी आज्ञा कर.”
येशूने उत्तर दिले, “‘मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही’, असे लिहिले आहे.”
त्यानंतर सैतानाने त्याला उंच ठिकाणी नेऊन जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली आणि त्याला म्हटले, “ह्यांचे वैभव व हा सर्व अधिकार मी तुला देईन कारण हे माझ्या स्वाधीन करण्यात आले आहे आणि माझ्या मनास येईल त्याला मी ते देतो. म्हणून तू मला नमन करशील, तर हे सर्व तुझे होईल.”
येशूने त्याला उत्तर दिले, “‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याला नमन कर व त्याचीच आराधना कर’, असे धर्मशास्त्रात लिहिले आहे.”
नंतर त्याने त्याला यरुशलेममध्ये नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले व त्याला म्हटले, “तू देवाचा पुत्र असलास तर येथून खाली उडी टाक कारण धर्मशास्त्रात असे लिहिले आहे की, तुझे रक्षण करण्यासाठी तो आपल्या दूतांना आज्ञा देईल आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील.”
येशूने त्याला उत्तर दिले, “‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याची परीक्षा पाहू नकोस’, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.”
येशूची सर्व प्रकारे परीक्षा पाहण्याचे संपवून सैतान योग्य वेळ येईपर्यंत त्याला सोडून गेला.
येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालीलमध्ये परत आला व त्याच्याविषयीचे वृत्त चहूकडील प्रदेशांत पसरले. तो त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देऊ लागला आणि सर्व जण त्याची प्रशंसा करू लागले.
ज्या नासरेथमध्ये तो लहानाचा मोठा झाला होता, तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे साबाथ दिवशी सभास्थानात जाऊन वाचायला उभा राहिला. तेव्हा यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जो उतारा काढला त्यात असे लिहिले होते:
प्रभूचा आत्मा माझ्यामध्ये आला आहे, कारण गरिबांना शुभवर्तमान सांगण्यासाठी
त्याने मला अभिषिक्त केले आहे.
धरून नेलेल्यांची सुटका
व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ
ह्यांची मी घोषणा करावी,
तसेच जे ठेचले जात आहेत
त्यांची सुटका करावी
व प्रभूच्या अनुग्रहाचे वर्ष आले आहे
हे जगजाहीर करावे
म्हणून मला पाठविण्यात आले आहे.
मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकास परत देऊन तो खाली बसला. सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. तो त्यांना म्हणू लागला, “हा धर्मशास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे.”
सर्व त्याची वाहवा करू लागले. जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्यांविषयी ते आश्चर्य करू लागले. ते म्हणू लागले, “हा योसेफचा मुलगा ना?”
त्याने त्यांना म्हटले, “खरोखर तुम्ही मला ही म्हण लागू कराल की, हे वैद्या, तू स्वतःला बरे कर. ‘कफर्णहूम या ठिकाणी ज्या गोष्टी तू केल्या असे आम्ही ऐकले, त्या येथेही आपल्या गावी कर.’” पुढे तो म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, कोणताही संदेष्टा स्वतःच्या देशात स्वीकारला जात नाही.
परंतु सत्य हे आहे की, एलियाच्या काळी साडेतीन वर्षे पाऊस न पडता सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता, त्या काळी इस्राएलमध्ये पुष्कळ विधवा होत्या, तरी त्यांतील एकीच्याकडेही एलियाला पाठवले नव्हते, तर सिदोन प्रदेशातील सारफथ येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. तसेच अलिशा संदेष्ट्याच्या काळी इस्राएलमध्ये पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणीही बरा झाला नाही, तर सूरियाचा नामान मात्र बरा झाला.”
हे ऐकत असताना सभास्थानातील सर्व लोक संतापले. त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्यांचे गाव वसले होते, त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तेथवर नेले. पण तो त्यांच्यामधून निघून गेला.