YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 11:20-40

इब्री 11:20-40 MACLBSI

इसहाकने याकोब व एसाव ह्यांना भविष्यासाठी विश्वासाने आशीर्वाद दिला. याकोबने मरते वेळेस योसेफच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाची आराधना केली. योसेफने मरतेवेळेस इस्राएलच्या संतानाच्या निर्गमनाचा उल्लेख विश्वासाने केला व आपल्या अस्थींविषयी निर्देश दिले. मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला तीन महिने लपवून ठेवले; कारण ते मूल गोंडस आहे, असे त्यांनी पाहिले व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही. मोशे प्रौढ झाल्यावर त्याने स्वतःला फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले; पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत केले; ख्रिस्तासाठी विटंबना सोसणे ही इजिप्त देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती, आहे असे त्याने मानले; कारण त्याची दृष्टी भावी फलप्राप्तीवर होती. त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने इजिप्त देश सोडला; कारण अदृश्य देवाला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. त्याने वल्हांडण सण व रक्त लावणे हे विधी विश्वासाने पाळले, ते अशा हेतूने की, इस्राएली लोकांच्या प्रथम जन्मलेल्यांचा नाश करणाऱ्याने त्यांना स्पर्श करू नये. तांबड्या समुद्रातून ते विश्वासाने जणू कोरड्या भूमीवरून जावे त्याप्रमाणे पार गेले; मिसरमधील लोक तसेच प्रयत्न करीत असता बुडून गेले. इस्राएली लोकांनी यरीहोच्या गावकुसाभोवती सात दिवस प्रदक्षिणा घातल्यावर त्यांच्या विश्वासामुळे ते नगर पडले. राहाब वेश्येने स्नेहभावाने व विश्‍वासाने इस्राएली हेरांचा स्वीकार केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्यांबरोबर तिचा नाश झाला नाही. आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफताह, दावीद, शमुवेल व संदेष्टे, ह्यांचे वर्णन करू लागलो, तर वेळ पुरणार नाही. त्यांनी विश्वासाद्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरणात आणले, अभिवचने मिळविली, सिंहाची तोंडे बंद केली, अग्नीची शक्ती नाहीशी केली; ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बल असता सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये धुळीला मिळवली. स्त्रियांना त्यांची मृत माणसे विश्वासामुळे पुनरुत्थान झालेली मिळाली. आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून स्वातंत्र्याचा त्याग करून हालअपेष्टा सोसल्या. काहींना टवाळ्या, मारहाण, बंधने व कैद ह्यांचाही अनुभव आला; त्यांच्यावर दगडफेक केली, त्यांना मोहपाशात टाकले, करवतीने कापले, तलवारीच्या धारेने त्यांचा वध करण्यात आला; ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत; ते लाचार, पीडित व त्रासलेले असे होते; त्यांना जगाचे आकर्षण नव्हते. ते अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून निराश्रित म्हणून भटकत राहत असत. ह्या सर्वांबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष दिली असताही त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही; कारण देवाने आपणासाठी अधिक चांगली योजना आखली होती आणि ती म्हणजे त्यांना आपणासर्वांबरोबर पूर्णत्व प्राप्त व्हावे.