ते त्यास घेऊन जात असताना, कुरेनेकर शिमोन नावाचा कोणीएक शेतावरून येत होता त्यांनी त्यास धरले व त्याने येशूच्या मागे चालून वधस्तंभ वाहावा म्हणून तो त्याच्यावर ठेवला. लोकांचा व स्त्रियांचा मोठा समुदाय त्याच्यामागे चालला, त्या स्त्रिया त्याच्यासाठी ऊर बडवून शोक करीत होत्या. येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “यरूशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलांबाळांसाठी रडा. कारण असे दिवस येत आहेत, जेव्हा लोक म्हणतील, धन्य त्या स्त्रिया ज्या वांझ आहेत आणि धन्य ती गर्भाशये, ज्यांनी जन्मदिले नाहीत व धन्य ती स्तने, ज्यांनी कधी पाजले नाही. तेव्हा ‘ते पर्वतास म्हणतील, आम्हावर पडा आणि ते टेकड्यांस म्हणतील. आम्हास झाका’ ओल्या झाडाला असे करतात तर वाळलेल्यांचे काय?”
आणि दुसरे दोघे जण अपराधी होते त्यांनाही त्यांनी त्याच्याबरोबर जिवे मारण्यास नेले. आणि जेव्हा ते गुन्हेगारांसमवेत “कवटी” म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्यास व त्या अपराध्यांस, एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. नंतर येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले. लोक तेथे पाहत उभे होते आणि पुढारी थट्टा करून म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचवले, जर तो ख्रिस्त, देवाचा निवडलेला असेल तर त्याने स्वतःला वाचवावे! शिपायांनीही त्याची थट्टा केली. ते त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्यास आंब दिली. आणि ते म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा आहेस तर स्वतःला वाचव!”
त्याच्यावर असे लिहिले होते “हा यहूदी लोकांचा राजा आहे.”
तेथे खिळलेल्या एका गुन्हेगाराने त्याची निंदा केली. तो म्हणाला, तू ख्रिस्त नाहीस काय? स्वतःला व आम्हासही वाचव! पण दुसऱ्या गुन्हेगाराने त्यास दटावले आणि म्हणाला, “तुला देवाचे भय नाही का? तुलाही तीच शिक्षा झाली आहे. पण आपली शिक्षा योग्य आहे कारण आपण जे केले त्याचे योग्य फळ आपणास मिळत आहे. पण या मनुष्याने काहीही अयोग्य केले नाही.” नंतर तो म्हणाला, “येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर.” येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.”
त्यावेळी जवळ जवळ दुपारचे बारा वाजले होते आणि तीन वाजेपर्यंत सर्व प्रदेशावर अंधार पडला. त्यादरम्यान सूर्य प्रकाशला नाही. आणि परमेश्वराच्या भवनातील पडदा मधोमध फाटला आणि त्याचे दोन भाग झाले. येशू मोठ्या आवाजात ओरडला, “पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” असे बोलून त्याने प्राण सोडून दिला. जेव्हा रोमी शताधीपतीने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, “खरोखर हा नीतिमान मनुष्य होता.” हे दृष्य पाहण्यासाठी जमलेल्या लोकांनी घडलेल्या गोष्टी पाहिल्या, तेव्हा ते छाती बडवीत परत गेले. परंतु त्याच्या ओळखीचे सर्वजण हे पाहण्यासाठी दूर उभे राहिले. त्यामध्ये गालील प्रांताहून त्याच्यामागे आलेल्या स्त्रियाही होत्या.
तेथे योसेफ नावाचा एक मनुष्य होता. तो यहूदी सभेचा सभासद व चांगला आणि नीतिमान मनुष्य होता. त्याने त्याच्या कामाला व विचारला संमती दिली नव्हती. तो यहूदीया प्रांतातील अरिमथाई नगराचा होता. तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता. हा मनुष्य पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. ते त्याने वधस्तंभावरुन खाली काढले आणि तागाच्या वस्त्रात गुंडाळले. नंतर ते खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. ही कबर अशी होती की, जिच्यात तोपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. तो तयारीचा दिवस होता आणि शब्बाथ सुरु होणार होता. गालील प्रांताहून येशूबरोबर आलेल्या स्त्रिया योसेफाच्या मागे गेल्या. त्यांनी ती कबर व तिच्यामध्ये ते शरीर कसे ठेवले ते पाहिले. नंतर त्या घरी गेल्या व त्यांनी सुगंधी मसाले आणि लेप तयार केला. शब्बाथ दिवशी त्यांनी आज्ञेप्रमाणे विसावा घेतला.