YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री. 11:20-40

इब्री. 11:20-40 IRVMAR

इसहाकाने, याकोबाला व एसावाला येणार्‍या गोष्टींविषयी विश्वासाने, आशीर्वाद दिला. याकोबाने मरतेवेळी योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने, आशीर्वाद दिला व आपल्या काठीच्या टोकावर टेकून नमन केले. विश्वासाने, योसेफाने, मरतेवेळी, इस्राएलाच्या संतानाच्या निघण्याविषयी सूचना केली व आपल्या अस्थींविषयी आज्ञा दिली. विश्वासाने, मोशे जन्मल्यावर, त्यास त्याच्या आई-वडीलांनी तीन महिने लपवून ठेवले; कारण मूल सुंदर आहे हे त्यांनी बघितले व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही. मोशेने, विश्वासाने, तो मोठा झाल्यावर फारोच्या कन्येचा मुलगा म्हणवण्याचे नाकबूल केले. पापांची क्षणिक सुखे भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे त्याने पसंत केले, आणि ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे हे मिसरातील भांडारापेक्षा मोठे धन मानले; कारण श्रमांबद्दल मिळणाऱ्या वेतनावर त्याची दृष्टी होती. विश्वासाने राजाच्या क्रोधाला न भिता त्याने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्य आहे त्यास पाहत असल्याप्रमाणे तो ठाम राहिला. विश्वासाने त्याने वल्हांडण व रक्तसिंचन हे विधी पाळले, ते ह्यासाठी की, प्रथम जन्मलेल्यांना मारणार्‍याने त्यांना शिवू नये. विश्वासाने ते तांबड्या समुद्रामधून, कोरड्या जमिनीवरून गेल्याप्रमाणे गेले व मिसरी तसे करण्याच्या प्रयत्नात बुडून मरण पावले. विश्वासाने, त्यांनी सात दिवस, यरीहोच्या तटासभोवती फेऱ्या घातल्यावर ते तट पडले. विश्वासाने राहाब वेश्या ही अवज्ञा करणार्‍या इतरांबरोबर नाश पावली नाही; कारण तिने शांतीने हेरांचे स्वागत केले होते. आता मी अधिक काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन आणि इफ्ताह, तसेच दावीद व शमुवेल आणि संदेष्टे यांच्याविषयी मी सांगू लागलो तर मला वेळ अपुरा पडेल. विश्वासाने त्यांनी राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरली, वचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली. त्यांनी अग्नीची शक्ती संपवली, तलवारीच्या धारेपासून ते निभावले, अशक्तपणात सशक्त झाले, युद्धात पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली. कित्येक स्त्रियांना त्यांचे मरण पावलेले, पुन्हा जिवंत होऊन, परत मिळाले आणि कित्येकांनी अधिक चांगले पुनरुत्थान मिळवण्यास आपली सुटका न पतकरल्यामुळे त्यांचे हाल हाल करण्यात आले. आणखी दुसर्‍यांनी टवाळक्यांचा व तसाच फटक्यांचा, शिवाय बेड्यांचा व बंदिवासाचा अनुभव घेतला. त्यांना दगडमार केला गेला, त्यांना करवतीने कापले, त्यांची परीक्षा केली गेली, ते तलवारीने मारले गेले आणि दुरावलेले, नाडलेले व पीडलेले होऊन ते मेंढरांची व शेरड्यांची कातडी पांघरून भटकले. जग त्यांच्यासाठी लायक नव्हते ते रानांमधून, डोंगरांमधून, गुहांमधून व जमिनीमधील खंदकामधून फिरत राहिले. या सर्वांनी विश्वासाद्वारे साक्ष मिळवली असे असता त्यांना वचन प्राप्त झाले नाही. कारण ते आपल्याशिवाय पूर्ण केले जाऊ नयेत अशी देवाच्या दृष्टीपुढे आपल्यासाठी अधिक चांगली गोष्ट होती.