विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे. विश्वासाच्या बाबतीत आमच्या पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली. विश्वासाने आपल्याला समजते की, देवाच्या शब्दाने विश्व निर्माण झाले; म्हणजे ज्या गोष्टी दिसतात त्या दृश्य गोष्टींपासून झाल्या नाहीत.
विश्वासाने, हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगले बलिदान देवाला अर्पण केले; त्याद्वारे तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली कारण देवाने त्याच्या अर्पणाविषयी साक्ष दिली आणि त्याद्वारे तो मरण पावला असताही अजूनही बोलतो.
हनोखाला मरणाचा अनुभव घेऊ नये म्हणून, त्यास विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले; आणि तो कोठे सापडला नाही, कारण देवाने त्यास नेले. त्यास लोकांतरी नेण्यापूर्वी त्याच्याविषयी अशी साक्ष देण्यात आली की, तो देवाला संतोषवीत असे. पण विश्वासाशिवाय त्यास संतोषवणे अशक्य आहे, कारण जो त्याच्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे आणि जे त्यास झटून शोधतात त्यांना प्रतिफळ देणारा आहे.
विश्वासाने, नोहाने, पूर्वी कधी न दिसलेल्या गोष्टींविषयी त्यास सूचना मिळाल्याप्रमाणे, आदराने भय धरून, आपले कुटुंब तारण्यासाठी विश्वासाने तारू बांधले; आणि त्याद्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणार्या नीतिमत्त्वाचा तो वारीस झाला.
विश्वासाने, अब्राहामाने, त्यास जे ठिकाण वतन मिळणार होते तिकडे जाण्यास त्यास बोलवण्यात आले तेव्हा आज्ञा मानली. तो कोठे जाणार होता हे त्यास माहीत नसताना तो निघाला.
विश्वासाने, तो वचनदत्त देशात, जणू परदेशात प्रवासी म्हणून राहिला; आणि त्याच वतनात त्याचे जोडीचे वारीस इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर तो डेर्यात वस्ती होती. कारण, ज्याचा योजणारा व बांधणारा देव आहे अशा नगराची अब्राहाम वाट पाहत होता.
विश्वासाने, सारेलाही, ती स्वतः वयातीत झाली असता गर्भधारणेची क्षमता मिळाली; कारण ज्याने वचन दिले त्यास तिने विश्वसनीय मानले. म्हणून केवळ एकापासून आणि अशा मृतवत झालेल्या पासून संख्येने आकाशातील तार्यांप्रमाणे, समुद्राच्या किनार्यावरील वाळूप्रमाणे असंख्य संतती निर्माण झाली.
हे सगळे विश्वासात टिकून मरण पावले; त्यांना वचनांची प्राप्ती झाली नव्हती. पण त्यांनी ती दुरून बघून त्यांना वंदन केले आणि त्यांनी मानले की, आपण पृथ्वीवर परके आणि प्रवासी आहोत. कारण, असे जे म्हणतात ते स्वतःचा देश मिळवू पाहत आहेत हे ते दाखवतात. आणि खरोखर, ते ज्या देशातून निघाले होते त्याचा ते विचार करीत असते, तर तिकडे परत जाण्याची संधी त्यांना मिळाली असती. पण आता, ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची इच्छा धरतात, ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणून घेण्यास देवाला त्यांची लाज वाटत नाही कारण त्याने त्यांच्यासाठी एक नगर तयार केले आहे.
अब्राहामाने, त्याची परीक्षा केली जात असता विश्वासाने, इसहाकाचे अर्पण केले; म्हणजे, ज्याने वचने स्वीकारली होती तो आपला एकुलता एक मुलगा अर्पिला. त्याच्याविषयी हे म्हणले होते की, ‘इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील.’ तरी, देव त्यास मरण पावलेल्यातून उठवायलादेखील समर्थ आहे असे त्याने मानले. तो त्यास तेथून, जणू लाक्षणिक अर्थाने, परतही मिळाला.