तेव्हा याकोब उठला आणि त्याने आपल्या स्त्रिया व मुलांना उंटांवर बसवले. तो आपली सर्व गुरेढोरे आणि आपण मिळवलेले सर्व धन, म्हणजे जे गुरांढोरांचे कळप त्याने पदन-अरामात मिळवले होते, ते घेऊन आपला बाप इसहाक याच्याकडे कनान देशास जाण्यास निघाला. त्याच वेळी लाबान आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यास गेला होता. तेव्हा राहेलने आपल्या वडिलाच्या कुलदेवतांच्या मूर्ती चोरल्या. याकोबानेही अरामी लाबानाला फसवले. आपण येथून सोडून जात आहो हे त्यास सांगितले नाही. याकोब आपली बायकामुले व सर्व चीजवस्तू घेऊन ताबडतोब पळाला. त्यांनी फरात नदी ओलांडली आणि ते गिलाद डोंगराळ प्रदेशाकडे निघाले.
तीन दिवसानंतर याकोब पळून गेल्याचे लाबानास कळाले. तेव्हा त्याने आपले नातलग एकत्र जमवले आणि याकोबाचा पाठलाग सुरू केला. सात दिवसानंतर गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाजवळ त्यास याकोब सापडला. त्या रात्री देव अरामी लाबानाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “तू याकोबाला बरे किंवा वाईट बोलू नये म्हणून काळजी घे.” लाबानाने याकोबाला गाठले. याकोबाने डोंगराळ प्रदेशात तळ दिला होता. लाबानानेही आपल्या बरोबरच्या नातलगासह गिलादाच्या डोंगराळ भागात तळ दिला. लाबान याकोबाला म्हणाला, “तू मला हे काय केले? तू मला फसवलेस. आणि युद्धकैदी केलेल्या स्त्रियांप्रमाणे तू माझ्या मुलींना का घेऊन आलास? तू मला न सांगता का पळून गेलास? मला का फसवले? तू मला सांगितले नाही. मी तर उत्सव करून आणि गाणी, डफ व वीणा वाजवून तुला पाठवले असते. तू मला माझ्या नातवांचा व माझ्या मुलींचा निरोप घेण्याची किंवा त्यांची चुंबने घेण्याची संधी दिली नाहीस. आता हा तू मूर्खपणा केला आहे. खरे तर अपाय करण्याची माझ्यात ताकद आहे, परंतु काल रात्री तुझ्या बापाचा देव माझ्या स्वप्नात बोलला आणि म्हणाला, ‘तू याकोबाला बरे किंवा वाईट बोलू नको म्हणून काळजी घे.’ तुला तुझ्या वडिलाच्या घरी जायचे आहे हे मला माहीत आहे आणि म्हणूनच तू जाण्यास निघालास, परंतु तू माझ्या घरातील कुलदेवता का चोरल्यास?” याकोबाने उत्तर दिले आणि लाबानास म्हणाला, “मी गुप्तपणे निघालो कारण मला भीती वाटली, आणि मी विचार केला की, तुम्ही तुमच्या मुली माझ्यापासून हिसकावून घ्याल. ज्या कोणी तुमच्या कुलदेवता चोरल्या आहेत तर तो जगणार नाही. तुमच्या नातलगासमोर माझ्याबरोबर जे काही तुमचे आहे ते तुम्ही आपले ओळखा आणि ते घ्या.” राहेलीने त्या मूर्ती चोरल्या होत्या ते याकोबास माहीत नव्हते. लाबान याकोबाच्या तंबूत गेला, लेआच्या तंबूत गेला आणि दासींच्या तंबूत गेला परंतु त्यास त्या सापडल्या नाहीत. त्यानंतर तो राहेलीच्या तंबूत गेला. राहेलीने त्या कुलदेवता उंटाच्या खोगिरात लपवून ठेवल्या होत्या आणि ती त्यांच्यावर बसली होती. लाबानाने सगळा तंबू शोधला परंतु त्या सापडल्या नाहीत. ती आपल्या पित्यास म्हणाली, “मी आपल्यासमोर उभी राहू शकत नाही म्हणून माझ्यावर रागावू नका, कारण माझी मासिकपाळी आली आहे.” अशा रीतीने त्याने शोध केला परंतु त्यास कुलदेवता सापडल्या नाहीत. मग याकोबाला राग आला आणि त्याने लाबानाशी वाद केला, तो त्यास म्हणाला, “माझा गुन्हा काय आहे? माझे पाप कोणते आहे, म्हणून तुम्ही माझा रागाने पाठलाग केलात? माझ्या मालकीच्या सर्व चीजवस्तू तुम्ही शोधून पाहिल्या आहेत. तुम्हास तुमच्या मालकीची एकतरी चीजवस्तू आढळली का? जर तुम्हास तुमचे काही मिळाले असेल तर ते आपल्या नातलगासमोर ठेवा. यासाठी की ते आपल्या दोघांचा न्याय करतील. मी वीस वर्षे तुमच्याबरोबर होतो. त्या सर्व काळात एकही करडू किंवा कोकरू मरण पावलेले जन्मले नाही आणि तुमच्या कळपातील एकही बकरा मी खाल्ला नाही. जनावरांनी फाडलेले ते मी तुमच्याकडे आणले नाही. त्याऐवजी ते नुकसान मी भरून दिले. दिवसा किंवा रात्री चोरी गेलेले, प्रत्येक हरवलेले जनावर ते तुम्ही नेहमी माझ्या हातून भरून घेत होता. दिवसा उन्हाच्या तापाने व रात्री गारठ्यामुळे मला त्रास होई. आणि माझ्या डोळ्यावरून झोप उडून जाई, अशी माझी स्थिती होती. वीस वर्षे मी तुमच्या घरी राहिलो; पहिली चौदा वर्षे तुमच्या दोन मुलींसाठी आणि सहा वर्षे तुमच्या कळपांसाठी. दहा वेळा तुम्ही माझ्या वेतनात फेरबदल केला. परंतु माझ्या पूर्वजांचा देव; अब्राहामाचा देव आणि इसहाकाचा देव ज्याचे मी भय धरतो, तो माझ्या बरोबर होता. तो जर माझ्याबरोबर नसता तर तुम्ही मला नक्कीच रिकामे पाठवले असते. देवाने माझ्यावर झालेला जुलूम पाहिला आणि मी कष्टाने केलेले काम पाहिले आणि काल रात्री त्याने तुम्हास धमकावले.”
लाबानाने उत्तर दिले आणि तो याकोबाला म्हणाला, “या मुली माझ्या मुली आहेत आणि ही नातवंडे माझी नातवंडे आहेत आणि हे कळप माझे कळप आहेत. जे काही तू पाहतोस ते सर्व माझे आहे. परंतु आज मी या मुलींसाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी ज्यांना त्यांनी जन्म दिला त्यांना मी काय करू शकतो? म्हणून मी व तू आता आपण करार करू आणि तो माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये साक्षी होवो.” तेव्हा याकोबाने मोठा दगड घेऊन स्मारकस्तंभ उभा केला. याकोब त्याच्या नातलगांना म्हणाला की, “दगड गोळा करा.” मग त्यांनी दगड गोळा करून त्याची रास केली. नंतर त्या दगडांच्या राशीशेजारी बसून ते जेवले. लाबानाने त्या राशीला यगर-सहादूथा असे नाव ठेवले. परंतु याकोबाने त्या जागेचे नाव गलेद ठेवले. लाबान म्हणाला, “ही दगडांची रास आज माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये साक्षी आहे.” म्हणून त्याचे नाव गलेद ठेवले. मग लाबान म्हणाला, “आपण एकमेकापासून दूर होत असताना परमेश्वर माझ्यावर व तुझ्यावर लक्ष ठेवो.” म्हणून त्या जागेचे नाव मिस्पा ठेवण्यात आले. जर का तू माझ्या मुलींना दुःख देशील किंवा माझ्या मुलींशिवाय दुसऱ्या स्त्रिया करून घेशील. तर पाहा, “जरी आमच्याबरोबर कोणी नाही पण तुझ्यात व माझ्यात देव साक्षी आहे.” लाबान याकोबास म्हणाला, या राशीकडे पाहा आणि स्मारकस्तंभाकडे पाहा, जो मी तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये ठेवला आहे. ही रास व हा स्तंभ ही दोन्ही आपल्यातील कराराची साक्ष होवो, की हानी करायला मी तुझ्याकडे ही रास ओलांडून येणार नाही आणि तू ही माझ्याविरुद्ध ही रास ओलांडून कधीही येऊ नये. अब्राहामाचा देव, नाहोराचा देव आणि त्यांच्या वडिलांचा देव आमचा न्याय करो. याकोबाने त्याचा बाप इसहाक, ज्या देवाचे भय धरत असे त्याची शपथ घेतली. मग याकोबाने त्या डोंगरावर यज्ञ केला आणि त्याने आपल्या सर्व नातलगांना भोजनासाठी आमंत्रण दिले. भोजन संपल्यावर त्यांनी ती रात्र डोंगरावरच घालवली. दुसऱ्या दिवशी लाबान पहाटेस उठला. त्याने आपल्या मुली व आपली नातवंडे यांची चुंबने घेऊन त्यांचा निरोप घेतला. त्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि मग तो आपल्या घरी परत गेला.