YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 11:1-18

रोमकरांस पत्र 11:1-18 MARVBSI

तर मी विचारतो, ‘देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय?’ कधीच नाही! कारण मीही इस्राएली, अब्राहामाच्या कुळातला, बन्यामिनाच्या वंशातला आहे. देवाला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ‘त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही.’ एलीयाच्या बाबतीत शास्त्र काय म्हणते हे तुम्हांला ठाऊक नाही काय? इस्राएलाविरुद्ध देवाजवळ त्याने अशी विनंती केली की, “हे प्रभू, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना जिवे मारले, तुझ्या वेद्या खणून पाडल्या; आणि मी एकटाच राहिलो आहे आणि माझा प्राण घेण्यास ते पाहतात.” परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? “ज्यांनी बआल दैवतापुढे गुडघे टेकले नाहीत अशी सात हजार माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत.” तसेच हल्लीच्या काळीसुद्धा कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे; आणि जर हे कृपेने राहिले असेल तर ते कर्मांनी नाही; नाहीतर कृपा ही कृपा असणार नाही. [पण जर ते कर्माने असेल तर मग कृपा नाही, असली तर कर्म हे मग कर्म नाही.] तर मग काय? जे मिळवण्यासाठी इस्राएल जोराचा प्रयत्न करत आहे ते त्याला मिळाले नाही; पण निवडलेल्या लोकांना मिळाले; आणि बाकीचे कोडगे झाले. “आजच्या दिवसापर्यंत देवाने त्यांना मंद बुद्धी, पाहता येऊ नये असे डोळे, व ऐकता येऊ नये असे कान दिले,” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे झाले. दावीदही म्हणतो, “त्यांचे मेज त्यांना फास व सापळा, अडखळण व प्रतिफळ असे होवो. त्यांना दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत, आणि तू त्यांची पाठ नेहमी वाकव.” तर मी विचारतो, त्यांचे पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? कधीच नाही! तर त्यांच्या ठायी ‘ईर्ष्या निर्माण होण्यासाठी’ त्यांच्या अपराधाने परराष्ट्रीयांचे तारण झाले आहे. आता त्यांचा अपराध ही जर जगाची संपत्ती आणि त्यांचा र्‍हास ही जर परराष्ट्रीयांची सधनता आहे, तर त्यांची भरती झाल्यास ती सधनता कितीतरी अधिक होईल! पण आता तुम्हा परराष्ट्रीयांना मी हे सांगतो. ज्या अर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो; ह्यात माझा उद्देश हा की, जे माझ्या हाडामांसाचे आहेत त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करून त्यांच्यातील कित्येकांना तारावे. कारण त्यांचा अव्हेर हा जर जगाचा समेट ठरतो तर त्यांचा स्वीकार हा त्यांचे मेलेल्यांतून जिवंत होणे ठरणार ना? कणकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल, आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील. आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून असता त्यांच्या जागी कलमरूपे लावला गेलास व जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास, तर त्या फांद्यांहून मी मोठा आहे अशी बढाई मारू नकोस. मारशील तर हे लक्षात ठेव की, तू मुळाला आधार दिलेला नाहीस, तर मुळाने तुला आधार दिलेला आहे.