नंतर ही सर्व वचने लोकांच्या कानी पडल्यावर तो आपले बोलणे समाप्त करून कफर्णहूमास गेला.
तेव्हा कोणाएका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता.
त्याने येशूविषयी ऐकून यहूद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठवले व विनंती केली की, आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे.
त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितले, “आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे;
कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो आणि ह्यानेच आमच्याकरता सभास्थान बांधून दिले आहे.”
तेव्हा येशू त्यांच्याबरोबर गेला; मग तो घराजवळ येताच त्याने त्याच्याकडे आपल्या मित्रांना पाठवून त्याला म्हटले, “प्रभूजी, श्रम घेऊ नका; कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही;
ह्यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही; तर शब्द मात्र बोला1 म्हणजे माझा चाकर बरा होईल.
कारण मीही ताबेदार माणूस असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत; मी एकाला ‘जा’ म्हटले म्हणजे तो जातो, दुसर्याला ‘ये’ म्हटले म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला ‘अमुक कर’ म्हटले म्हणजे तो ते करतो.”
ह्या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले; आणि तो वळून आपल्यामागे चालणार्या लोकसमुदायाला म्हणाला, “मी तुम्हांला सांगतो, एवढा विश्वास मला इस्राएलातही आढळला नाही.”
नंतर ज्यांना पाठवले होते ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला.
नंतर लवकरच असे झाले की, तो नाईन नावाच्या गावास गेला आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्याबरोबर गेला.
तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहचला तेव्हा पाहा, कोणाएका मृत माणसाला बाहेर नेत होते; तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती; आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते.
तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, “रडू नकोस.”
मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला; तेव्हा खांदेकरी उभे राहिले; मग तो म्हणाला, “मुला, मी तुला सांगतो, ऊठ.”
तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले.
तेव्हा सर्वांना भय वाटले व ते देवाला गौरवत म्हणाले, “आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे.”
त्याच्याविषयीची ही बातमी सगळ्या यहूदीयात व चहूकडल्या सर्व प्रदेशात पसरली.
ह्या सर्व गोष्टींविषयी योहानाला त्याच्या शिष्यांनी सांगितले.
मग योहानाने आपल्या शिष्यांतील दोघांना जवळ बोलावून प्रभूकडे असे विचारण्यास पाठवले की, “जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसर्याची वाट पाहावी?”
ती माणसे त्याच्याकडे येऊन म्हणाली, “बाप्तिस्मा करणार्या योहानाने आम्हांला आपल्याकडे असे विचारण्यास पाठवले आहे की, जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसर्याची वाट पाहावी?”
त्याच घटकेस त्याने पुष्कळ लोकांना रोग, पीडा व वाईट आत्मे ह्यांपासून मुक्त केले होते आणि बर्याच आंधळ्यांना दृष्टी दिली होती.
मग त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या योहानाला जाऊन सांगा, ‘आंधळे डोळस होतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.’
जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”
मग योहानाचे निरोप्ये गेल्यावर तो योहानाविषयी लोकसमुदायांना म्हणू लागला, “तुम्ही काय पाहण्यास रानात गेला होता? वार्याने हलवलेला बोरू काय?
तर मग काय पाहण्यास गेला होता? तलम वस्त्रे धारण केलेल्या माणसाला काय? पाहा, उंची पोशाख करणारे व चैन करणारे राजवाड्यात असतात.
तर तुम्ही काय पाहण्यास गेला होता? संदेष्ट्याला काय? मी तुम्हांला सांगतो, होय; संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ त्याला.
‘पाहा, मी आपला निरोप्या तुझ्यापुढे पाठवतो,
तो तुझ्यापुढे’ तुझा ‘मार्ग सिद्ध करील,’
असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो
तोच आहे.
मी तुम्हांला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत योहानापेक्षा मोठा कोणी नाही; तरी देवाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे.”
आणि जकातदारांसह सर्व लोकांनी त्याचे ऐकून देवाच्या नीतिमत्त्वाला मान्यता दिली, कारण त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता.
परंतु परूशी व शास्त्री ह्यांनी आपणासंबंधाने असलेला देवाचा संकल्प व्यर्थ केला, कारण त्यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला नव्हता.
तेव्हा प्रभूने म्हटले, “ह्या पिढीच्या लोकांना मी कोणाची उपमा देऊ? ते कोणासारखे आहेत?
जी मुले बाजारात बसून एकमेकांना हाका मारतात त्यांच्यासारखे ते आहेत; ती म्हणतात,
‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला,
तरी तुम्ही नाचला नाहीत;
आम्ही आक्रोश केला, तरी तुम्ही रडला नाहीत.’
बाप्तिस्मा करणारा योहान भाकरी खात आला नाही की द्राक्षारस पीत आला नाही, आणि तुम्ही म्हणता, त्याला भूत लागले आहे.
मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे, आणि तुम्ही म्हणता, पाहा, हा खादाड व दारुडा, जकातदारांचा व पातक्यांचा मित्र!
परंतु ज्ञान आपल्या सर्व संततीच्या योगे न्यायी ठरते.”