येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनेपासून परतला, आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले;
तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसांत त्याने काही खाल्ले नाही. ते संपल्यावर त्याला भूक लागली.
तेव्हा सैतान त्याला म्हणाला, “तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यास ‘भाकर हो’ असे सांग.”
येशूने त्याला उत्तर दिले : “‘मनुष्य केवळ भाकरीने नाही, तर देवाच्या प्रत्येक वचनाने’ जगेल असे लिहिले आहे.”
मग सैतानाने त्याला उंचावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली;
आणि त्याला म्हटले, “ह्यांच्यावरचा सर्व अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपवून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो.
म्हणून तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल.”
येशूने त्याला उत्तर दिले,
“‘[अरे सैताना, माझ्या मागे हो, कारण,]
परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व
त्याचीच सेवा कर,’ असे शास्त्रात लिहिले आहे.”
नंतर त्याने त्याला यरुशलेमेत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले व त्याला म्हटले, “तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी टाक, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की,
‘तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतांना
तुझ्याविषयी आज्ञा देईल.’
आणि ‘तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून
ते तुला हातांवर झेलून धरतील.”’
येशूने त्याला उत्तर दिले की, “‘परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस’ असे सांगितले आहे.”
मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला.
नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालीलात परत आला व त्याची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली.
तो त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देई आणि सर्व जण त्याचा महिमा वर्णन करीत.
मग ज्या नासरेथात तो लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन वाचन करण्यास उभा राहिला.
तेव्हा यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्याला देण्यात आला; त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले आहे :
“परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे,
कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास,
[भग्नहृदयी जनांस बरे करण्यास]
त्याने मला अभिषेक केला;
त्याने मला पाठवले आहे, ते अशासाठी की,
धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा
दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी,
ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे;
परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी.”
मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकाकडे परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली.
मग तो त्यांना म्हणू लागला की, “हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे.”
तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्यांविषयी आश्चर्य करू लागले; ते म्हणू लागले, “हा योसेफाचा पुत्र ना?”
त्याने त्यांना म्हटले, “खरोखर तुम्ही मला ही म्हण लागू कराल की, ‘हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर; कफर्णहूमात ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले त्या येथेही आपल्या गावी कर.”’
पुढे तो म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही.
आणखी मी तुम्हांला खरे ते सांगतो की, एलीयाच्या दिवसांत साडेतीन वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा इस्राएलात पुष्कळ विधवा होत्या;
तरी त्यांच्यातील एकीच्याहीकडे एलीयाला पाठवले नव्हते; तर ‘सीदोन प्रदेशातील सारफथ येथील एका विधवेकडे’ मात्र त्याला पाठवले होते.
तसेच अलीशा संदेष्ट्याच्या काळात इस्राएलात पुष्कळ कुष्ठरोगी होते; तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही, तर सूरियाचा नामान मात्र शुद्ध झाला.”
हे ऐकून सभास्थानातील सर्व लोक संतापले.
त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले, आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तेथवर नेले.
पण तो त्यांच्यामधून निघून गेला.
तो गालीलातील कफर्णहूम गावी खाली आला. तो शब्बाथ दिवशी त्यांना शिक्षण देत असे.
त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते.