इफ्ताह गिलादी हा एक पराक्रमी वीर होता; तो वेश्यापुत्र असून त्याचा बाप गिलाद होता.
गिलादाच्या बायकोलाही मुलगे झाले; हे तिचे मुलगे मोठे झाल्यावर त्याला म्हणाले, “तू परस्त्रीचा मुलगा असल्यामुळे आमच्या वडिलांच्या घराण्यातील वतनात तुला वाटा मिळणार नाही.” असे म्हणून त्यांनी त्याला हाकून दिले.
तेव्हा इफ्ताह आपल्या बांधवांच्या भीतीने पळून गेला आणि टोब देशात जाऊन राहिला. तेथे रिकामटेकडे लोक त्याला मिळाले आणि ते त्याच्याबरोबर वावरू लागले.
काही दिवसांनी अम्मोनी लोकांनी इस्राएलाशी युद्ध पुकारले.
अम्मोनी लोक इस्राएलाशी लढू लागले तेव्हा गिलाद येथील वडील जन इफ्ताहाला आणण्यासाठी टोब देशी गेले.
ते इफ्ताहाला म्हणाले, “चला, आमचे सेनापती व्हा म्हणजे आपण अम्मोनी लोकांशी युद्ध करू.”
इफ्ताह गिलादाच्या वडील जनांना म्हणाला, “तुम्ही माझा द्वेष करून मला आपल्या बापाच्या घरातून हाकून दिले होते ना? आणि आता कशाला आलात? संकटात पडलात म्हणून?”
गिलादाचे वडील जन इफ्ताहाला म्हणाले, “होय, म्हणून तर आम्ही आता तुमच्याकडे आलो आहोत; तुम्ही आमच्याबरोबर चला, आणि अम्मोनी लोकाशी युद्ध करा, म्हणजे तुम्ही आम्हा सर्व गिलादकरांचे प्रमुख व्हाल.”
गिलादाच्या वडील जनांना इफ्ताह म्हणाला, “अम्मोनी लोकांशी युद्ध करायला तुम्ही मला स्वदेशी परतवले आणि परमेश्वराने त्यांना माझ्या हाती दिले तर मीच तुमचा प्रमुख राहीन काय?”
गिलादाचे वडील जन इफ्ताहाला म्हणाले, “परमेश्वर तुमच्या-आमच्यामध्ये साक्षी आहे; तुम्ही म्हणता तसे आम्ही अवश्य करू.”
मग इफ्ताह गिलादाच्या वडील जनांबरोबर गेला; लोकांनी त्याला आपला प्रमुख व सेनापती नेमले. तेव्हा इफ्ताहाने आपले सगळे म्हणणे मिस्पा येथे परमेश्वरासमक्ष परत बोलून दाखवले.
पुढे इफ्ताहाने अम्मोन्यांच्या राजाकडे जासूद पाठवून विचारले, “माझ्याकडे यायला व माझ्या देशाशी लढायला तुझे आणि माझे कोठे बिनसले आहे?”
अम्मोन्यांच्या राजाने इफ्ताहाच्या जासुदांना म्हटले, “इस्राएल लोक मिसर देशाहून आले तेव्हा आर्णोन नदीपासून यब्बोक व यार्देन ह्या नद्यांपर्यंतचा माझा प्रदेश त्यांनी हिरावून घेतला; आता तो मुकाट्याने परत करा.”
इफ्ताहाने अम्मोन्यांच्या राजाकडे पुन्हा जासुदांच्या हाती निरोप पाठवला, तो असा :
इफ्ताह म्हणतो, “इस्राएलाने मवाबाचा देश घेतला नाही किंवा अम्मोनी लोकांचाही देश घेतला नाही,
पण ते मिसर देशाहून निघाले आणि रानातून कूच करून तांबड्या समुद्रावरून कादेश येथे आले;
तेव्हा त्यांनी जासुदांच्या हाती अदोमाच्या राजाला सांगून पाठवले की, कृपा करून आम्हांला तुझ्या देशातून जाऊ दे; पण अदोमाच्या राजाने आमचे ऐकले नाही; तसेच त्यांनी मवाबाच्या राजाला सांगून पाठवले, पण तोही आमचे ऐकायला तयार नव्हता, म्हणून इस्राएल कादेश येथे वस्ती करून राहिले.
त्यानंतर त्यांनी रानातून फिरत फिरत अदोम व मवाब ह्या देशांना वळसा घालून मवाबाच्या पूर्वेकडून येऊन आर्णोन नदीपलीकडे तळ दिला. पण ते मवाबाच्या हद्दीत शिरले नाहीत; कारण आर्णोन नदी ही मवाबांची सरहद्द होती.
मग अमोर्यांचा राजा, म्हणजे हेशबोनाचा राजा सीहोन, ह्याच्याकडे इस्राएलांनी जासुदांच्या हाती सांगून पाठवले की, ‘कृपा करून आम्हांला तुझ्या देशातून स्वस्थानी जाऊ दे.’
पण सीहोनाला इस्राएलाची खात्री नसल्यामुळे त्याने त्याला आपल्या हद्दीतून जाऊ दिले नाही; उलट त्याने आपले सर्व लोक जमवून याहस येथे तळ देऊन इस्राएलाशी युद्ध केले.
तरीपण इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने सीहोन व त्याचे सर्व लोक इस्राएलाच्या हाती दिले व त्यांनी त्यांचा पराभव केला. अशा प्रकारे त्या देशाचे रहिवासी अमोरी ह्यांचा सारा मुलुख इस्राएलांनी हस्तगत केला.
अर्थात आर्णोन नदीपासून यब्बोक नदीपर्यंतचा आणि रानापासून यार्देन नदीपर्यंतचा अमोर्यांचा सर्व देश त्यांनी आपल्या ताब्यात घेतला.
इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आपली प्रजा इस्राएल हिच्याकरता अमोर्यांना घालवून दिले आणि आता तू त्यांच्या प्रदेशावर हक्क गाजवायला बघतोस काय?
तुझा देव कमोश ह्याने तुला दिलेल्या वतनावरच तू हक्क गाजवू नये काय? आमचा देव परमेश्वर ह्याने ज्यांना आमच्यासाठी हाकून लावले त्यांचे वतन आमचेच राहील.
मवाबाचा राजा सिप्पोर ह्याचा मुलगा बालाक ह्याच्यापेक्षा तू श्रेष्ठ आहेस काय? तो इस्राएलाशी कधी भांडला काय? तो कधी लढला काय?
हेशबोन व त्याची उपनगरे, अरोएर व त्याची उपनगरे आणि आर्णोनतीरीची सर्व नगरे ह्यांत आज तीनशे वर्षे इस्राएल वस्ती करून आहे, तर ह्या अवधीत तुम्ही ती परत का मिळवली नाहीत?
मी तुझा काही गुन्हा केला नाही, तरी माझ्याशी लढून तू माझ्यावर अन्याय करत आहेस, न्यायाधीश परमेश्वर हा इस्राएल लोक व अम्मोनी लोक ह्यांचा आज न्याय करो.”
इफ्ताहाने अम्मोनी लोकांच्या राजाला पाठवलेला हा निरोप त्याने जुमानला नाही.