दानीएल 3:14-22
दानीएल 3:14-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नबुखद्नेस्सर त्यांना म्हणाला, “काय तुम्ही शद्रख, मेशख, अबेदनगो आपल्या मनाची तयारी केली? की तुम्ही माझ्या स्थपलेल्या सुवर्ण पुतळयास नमन करून त्यास दंडवत करणार नाही? आता जर तुम्ही तयार आहात तर, जेव्हा तुम्ही शिंग, बासरी, सतार, सारंगी, विणा, पुंगी आणि इतर वाद्ययांचा आवाज ऐकाल तेव्हा तुम्ही या पुतळयापुढे उपडे पडून दंडवत कराल तर बरे; पण जर तुम्ही नमन करणार नाही, तर तुम्हास त्वरीत तप्त अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल. तुम्हास माझ्या हातातून सोडविणारा असा कोण देव आहे?” शद्रख, मेशख, अबेदनगो यांनी राजाला उत्तर दिले की, “हे नबुखद्नेस्सरा, या बाबतीत उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन नाही. जर काही उत्तर आहे, तर ते हे की, ज्या देवाची आम्ही सेवा करतो तो आम्हास तप्त आग्नीच्या भट्टीतून काढण्यास समर्थ आहे, आणि महाराज तो आम्हास आपल्या हातून सोडवील. पण जर नाही तर महाराज हे आपणास माहित असावे की, आम्ही तुमच्या देवाची उपासना करणार नाही, आणि त्याच्या पुढे आम्ही पालथे पडून त्यास दंडवत करणार नाही.” नबुखद्नेस्सर रागाने संतप्त झाला, त्याची शद्रख, मेशख, अबेदनगो विरूद्ध त्याची मुद्रा पालटली. त्याने आज्ञा केली की, भट्टी नेहमीपेक्षा सातपटीने तप्त करण्यात यावी. नंतर त्याने आपल्या सैनिकातील काही बलवान पुरुषास आज्ञा केली की, शद्रख, मेशख, अबेदनगो यांना बांधा आणि तप्त भट्टीत टाका. ते बांधलेले असताना त्यांनी आपले पायमोजे, सदरे झगे आणि इतर वस्त्र घातले होते आणि त्यांना तप्त भट्टीत टाकण्यात आले. राजाची आज्ञा सक्त असल्याने ती भट्टी फारच तप्त केलेली होती. शद्रख, मेशख, अबेदनगो यांना ज्यांनी भट्टीत टाकले ते सैनिक तिच्या ज्वालेने मरण पावले.
दानीएल 3:14-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नबुखद्नेस्सर त्यांना म्हणाला, “शद्रख, मेशख आणि अबेदनगो, तुम्ही माझ्या दैवतांची सेवा व मी स्थापन केलेल्या सुवर्ण पुतळ्याची उपासना करीत नाही, हे खरे आहे काय? मग आता जेव्हा तुम्ही शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पावा आणि सर्वप्रकारच्या वाद्यांचा गजर ऐकताच मी तयार केलेल्या पुतळ्याला तुम्ही नमन केले आणि उपासना केली तर उत्तम. परंतु जर तुम्ही उपासना नाही केली तर त्याच घटकेस तुम्हाला अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात येईल. मग माझ्या हातून कोणता देव तुम्हाला सोडवितो ते पाहूया?” शद्रख, मेशख व अबेदनगो यांनी त्याला उत्तर दिले, “नबुखद्नेस्सर महाराज, याबद्दल तुमच्यासमोर आमचा बचाव करण्याची आम्हाला गरज नाही. जर आम्हाला धगधगत्या भट्टीत टाकले, तर आमचे परमेश्वर ज्यांची आम्ही सेवा करतो ते आम्हाला तिच्यातून सोडविण्यास समर्थ आहे आणि महाराज, तेच आम्हाला आपल्या हातून सोडवतील. परंतु असे जरी झाले नाही, तरीही महाराज तुम्हाला हे कळावे की आम्ही तुझ्या दैवतांची सेवा करणार नाही किंवा आपण स्थापन केलेल्या या सुवर्ण पुतळ्याला नमनही करणार नाही.” तेव्हा नबुखद्नेस्सर हा शद्रख, मेशख आणि अबेदनगो यांच्यावर रागाने संतप्त झाला आणि त्याची त्यांच्याबद्दलीची भावना बदलली. नेहमीपेक्षा भट्टी सातपट तापवावी असा त्याने हुकूम सोडला, आणि शद्रख, मेशख आणि अबेदनगो यांना बांधून भट्टीत फेकण्यासाठी त्याने आपल्या सैन्यातील बलदंड वीरांना बोलाविले. तेव्हा त्या पुरुषांना त्यांचे पायमोजे, अंगरखे, झगे वगैरे वस्त्रासह बांधण्यात आले आणि धगधगत्या भट्टीत फेकण्यात आले. राजाची आज्ञा कडक होती आणि भट्टी अतिशय तापली होती यामुळे ज्या सैनिकांनी शद्रख, मेशख आणि अबेदनगो यांना भट्टीत टाकण्यासाठी उचलले होते, त्यांनाच अग्नीच्या ज्वालांनी ठार केले
दानीएल 3:14-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नबुखद्नेस्सर त्यांना म्हणाला, “अहो शद्रख, मेशख, अबेद्नगो, तुम्ही माझ्या देवांची उपासना करीत नाही व मी स्थापलेल्या सुवर्णमूर्तीची पूजा करीत नाही, असे तुम्ही मुद्दाम करता काय? आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे; नाही घातले तर तुम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल; माझ्या हातांतून तुम्हांला सोडवील असा कोणता देव आहे?” शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांनी राजाला उत्तर दिले की, “महाराज, ह्या बाबतीत आपणांला उत्तर देण्याचे आम्हांला प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे; महाराज, तो आम्हांला आपल्या हातातून सोडवील. ते कसेही असो, पण महाराज, हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्णमूर्तीला दंडवत घालणार नाही.” हे ऐकून नबुखद्नेस्सर संतापला; शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांच्यासंबंधाने त्याची मुद्रा पालटली आणि त्याने आज्ञा केली की, ‘भट्टी नेहमीपेक्षा सातपट तप्त करा.’ मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ठ पुरुषांना आज्ञा केली की, ‘शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांच्या मुसक्या बांधून त्यांना त्या तप्त अग्नीच्या भट्टीत टाका.’ तेव्हा त्या पुरुषांना त्यांचे पायमोजे, अंगरखे, झगे वगैरे वस्त्रांसहित बांधून धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकले. राजाचा हुकूम अगदी सक्त असल्यामुळे ती भट्टी फारच तप्त केली होती; म्हणून ज्या पुरुषांनी शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांना तिच्यावर नेले ते ज्वालांनी भाजून मेले.