प्रेषितांची कृत्ये 13:1-52
प्रेषितांची कृत्ये 13:1-52 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते, ते पुढीलप्रमाणेः बर्णबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, मनाएन (जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला होता) आणि शौल. ही सर्व माणसे परमेश्वराची आराधना करीत व उपवास करीत असता, पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौलाला ह्यांना ज्या कामासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करा.” म्हणून मंडळीने उपवास व प्रार्थना केल्या, त्यांनी बर्णबा व शौल यांच्या डोक्यांवर हात ठेवून प्रार्थना केली, मग त्यांना पाठवून दिले. पवित्र आत्म्याच्याद्वारे बर्णबा व शौल यांना पाठविण्यात आले, ते सलुकीयात गेले, नंतर तेथून समुद्रमार्गे कुप्र बेटावर गेले. ते जेव्हा सलमी शहरात आले, तेव्हा त्यांनी देवाचे वचनाची यहूदी लोकांच्या सभास्थानात घोषणा केली मार्क म्हटलेला योहान हाही त्यांच्या मदतीला होता. ते संपूर्ण बेट पार करून पफे शहरास गेले, पफे येथे त्यांना एक यहूदी मनुष्य भेटला, तो जादूच्या करामती करीत असे, त्याचे नाव बर्येशू होते, तो खोटा संदेष्टा होता. बर्येशू नेहमी सिर्ग्य पौल याच्या निकट राहण्याचा प्रयत्न करायचा, सिर्ग्य पौल राज्यपाल होता व तो हुशार होता, त्याने बर्णबा व शौल यांना आपणाकडे बोलावले, त्यास त्यांच्याकडून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दाखवली. परंतु अलीम “जादूगार” (त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे) हा बर्णबा व शौल यांच्याविरुद्ध होता, राज्यपालाने विश्वास ठेवू नये म्हणून अलीमने त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण शौल, ज्याला पौलहि म्हणत, तो पवित्र आत्म्याने भरला होता, पौलाने त्याच्याकडे रोखून पाहिले व म्हणाला. “सैतानाच्या पुत्रा तू दुष्टाईने व खोटेपणाने भरलेला आहेस, अवघ्या नीतिमानाच्या वैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय? तर आता पाहा, प्रभूचा हात तुझ्यावर आहे, तू आंधळा होशील व काही वेळपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही,” मग लागलेच अलीमावर धुके व अंधार पडला आणि तो आपल्याला कोणी हाती धरून चालवावे म्हणून इकडेतिकडे फिरुन मनुष्यांचा शोध करू लागला. तेव्हा जे झाले ते पाहून राज्यपालाने विश्वास ठेवला, प्रभूच्या शिक्षणाने तो चकित झाला. पौल व जे त्याचे मित्र त्याच्याबरोबर होते ते पफेकडून समुद्रमार्गे निघाले, ते पंफुलियातील पिर्गा गावी आले, परंतु योहान त्यांना सोडून परत यरूशलेमे शहरास गेला. पौल व त्याच्या मित्रांनी त्यांचा प्रवास पुढे चालू ठेवला, पिर्गापासून पुढे ते पिसिदीयांतील अंत्युखियास गेले आणि शब्बाथ दिवशी ते सभास्थानात गेले आणि तेथे बसले. तेव्हा नियमशास्त्र आणि संदेष्टयांच्या लेखाचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी पौल व बर्णबाला निरोप पाठविला, “बंधुनो, येथील लोकांस काही मदत होईल असे काही बोधवचने सांगा.” पौल उभा राहिला आणि आपला हात उंचावून म्हणाला, “अहो इस्राएल लोकांनो व देवाचे भय धरणाऱ्यांनो, ऐका. या इस्राएल लोकांच्या देवाने आपल्या वाडवडिलांची निवड केली आणि ते ज्या काळात मिसरमध्ये परकी म्हणून राहत होते, त्या काळात देवाने त्यांना अगणित केले आणि उभारलेल्या बाहूने त्यांना तेथून बाहेर आणले. आणि देवाने अरण्यातील चाळीस वर्षात त्यांना सहनशीलता दाखविली. देवाने कनानच्या प्रदेशातील सात राष्ट्रांना नाश केला, देवाने त्यांच्या जमिनी त्याच्या लोकांस दिल्या. हे सर्व साधारणपणे चारशेपन्नास वर्षात घडले, त्यानंतर देवाने शमुवेल संदेष्ट्यापर्यंत आपल्या लोकांस न्यायाधीश नेमून दिले. मग लोकांनी राजाची मागणी केली, देवाने त्यांना किशाचा पुत्र शौल याला दिले, शौल हा बन्यामिनाच्या वंशातील होता, तो चाळीस वर्षापर्यंत राजा होता. नंतर देवाने शौलाला काढून टाकले, देवाने दावीदाला त्यांचा राजा केले, दावीदाविषयी देव असे बोलला इशायाचा पुत्र, दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझी सर्व इच्छा पूर्ण करील. याच दाविदाच्या वंशजातून देवाने इस्राएल लोकांचा तारणारा आणिला, तो वंशज येशू आहे, देवाने हे करण्याचे अभिवचन दिले होते. येशू येण्यापूर्वी सर्व इस्राएली लोकांस योहानाने उपदेश केला, त्यांच्या अंतःकरणात बदल व्हावा म्हणून योहानाने लोकांस सांगितले की, त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे. जेव्हा योहान आपले काम संपवत होता, तेव्हा तो म्हणाला, ‘मी कोण आहे असे तुम्हास वाटते? मी ख्रिस्त नाही, तो नंतर येत आहे, त्याच्या वहाणांचे बंद सोडण्याची सुद्धा माझी लायकी नाही.’ माझ्या बंधुनो, अब्राहामच्या कुटुंबातील पुत्रांनो आणि तुम्ही यहूदी नसलेले पण खऱ्या देवाची उपासना करणारे, ऐका! या तारणाची बातमी आम्हास सांगितली गेली. यरूशलेम शहरामध्ये राहतात ते यहूदी व त्यांचे अधिकारी यांनी त्यास ओळखले नाही, येशू हा तारणारा होता, येशूविषयी जे शब्द संदेष्ट्यानी लिहिले ते यहूदी लोकांसाठी प्रत्येक शब्बाथाच्या वारी वाचले गेले, परंतु त्यांना ते समजले नाही, यहूदी लोकांनी येशूला दोषी ठरवल्याने त्यांनी ते भविष्यावाद्यांचे शब्द खरे ठरवले. येशूने का मरावे याचे खरे कारण ते शोधू शकले नाहीत, पण त्यांनी पिलाताला सांगितले की त्यास जिवे मारावे. शास्त्रामध्ये येशूच्याबद्दल या गोष्टी लिहिल्या होत्या की, जे वाईट ते त्याच्याबाबतीत घडणारे होते, ते सर्व या यहूदी लोकांनी येशूला केले, मग त्यांनी येशूला वधस्तंभावरुन खाली घेतले व त्यास कबरेत ठेवले. पण देवाने त्यास मरणातून उठवले. यानंतर, पुष्कळ दिवसांपर्यंत जे त्याच्याबरोबर होते, त्यांना गालील प्रांतापासून यरूशलेम शहरापर्यंत येशूने दर्शन दिले, ते लोक आता त्याचे साक्षीदार म्हणून लोकांसमोर आहेत. आम्ही तुम्हास देवाने जे अभिवचन आमच्या वाडवडिलांना दिले त्याविषयी सुवार्ता सांगतो. आम्ही त्यांची लेकरे आहोत आणि देवाने हे अभिवचन आमच्या बाबतीत खरे करून दाखविले, देवाने हे येशूला मरणातून पुन्हा उठविण्याद्वारे केले, आम्ही याविषयी स्तोत्रसंहितेमध्येसुद्धा वाचतोः ‘तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे.’ शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून त्याने त्यास मरणातून उठवले, याविषयी त्याने असे सांगितले आहे की, ‘दाविदाला देण्यात आलेली पवित्र व निश्चित आशीर्वाद तुम्हास देईन.’ म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतोः ‘तू तुझ्या पवित्र पुरुषाला कबरेत कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.’ कारण दावीद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून मरण पावला, आपल्या वाडवडिलांशेजारी त्यास पुरले आणि कबरेत त्याचे शरीर कुजले. पण ज्याला देवाने मरणातून पुन्हा उठवले, त्यास कुजण्याचा अनुभव आला नाही. बंधुनो, आम्ही जी घोषणा करीत आहोत ते तुम्ही समजून घेतले पाहिजेः या एकाकडूनच तुमच्या पापांची क्षमा तुम्हास मिळू शकते. मोशेचे नियमशास्त्र तुम्हास तुमच्या पापांपासून मुक्त करणार नाही, पण प्रत्येक व्यक्ती जी त्याच्यावर विश्वास ठेवते, ती त्याच्याद्वारे त्या सर्वांविषयी न्यायी ठरविली जाते. संदेष्टयांनी सांगितलेल्या काही गोष्टी घडतील, सावध राहा! या गोष्टी तुमच्याबाबत होऊ नयेत म्हणून जपा. अहो धिक्कार करणाऱ्यांनो, पाहा, आश्चर्य करा व नाहीसे व्हा, कारण तुमच्या काळामध्ये मी एक कार्य करतो, ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही कोणी ते स्पष्ट करून सांगितले तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही.” जेव्हा पौल व बर्णबा जाऊ लागले, तेव्हा लोक म्हणाले की, पुढील शब्बाथाच्या दिवशी परत या आणि आम्हास याविषयी अधिक सांगा. सभास्थानातील बैठक संपल्यावर अनेक यहूदी लोक आणि यहूदी मतानुसारी चालणारे इतर धार्मिक लोक पौल व बर्णबा यांच्यामागे गेले, पौल व बर्णबा यांनी त्या लोकांस देवाच्या कृपेत टिकून राहण्यास कळकळीची विनंती केली. पुढील शब्बाथवारी शहरातील जवळ जवळ सर्व लोक परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी एकत्र जमले. यहूदी लोकांनी त्या सर्वांना तेथे पाहिले, त्यामुळे यहूदी लोकांस मत्सर वाटू लागला, तेही काही फार वाईट गोष्टी बोलले आणि जे पौल बोलला त्याविरुद्ध वाद उपस्थित केला. पण पौल व बर्णबा फार धैर्याने बोलले, ते म्हणाले, “देवाचे वचन तुम्हा यहूद्यांना प्रथम आम्हास सांगितलेच पाहिजे, पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात, तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करून घेत आहात व अनंतकाळचे जीवन प्राप्त करून घेण्यासाठी अपात्र ठरत आहात! म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशांतील परराष्ट्रीय लोकांकडे जाऊ. प्रभूने आम्हास आज्ञा दिली आहे की, ‘परराष्ट्रीयांसाठी मी तुम्हास प्रकाश असे केले यासाठी की, तुम्ही पृथ्वीवरील सर्व लोकांस तारणाचा मार्ग दाखवू शकाल.’ जेव्हा यहूदी नसलेल्यांनी पौलाला असे बोलताना ऐकले तेव्हा ते फार आनंदित झाले, परमेश्वराच्या वचनाला त्यांनी गौरव दिले आणि त्या लोकांपैकी पुष्कळांनी वचनावर विश्वास ठेवला, कारण ते अनंतकाळच्या जीवनासाठी निवडले गेले होते. आणि परमेश्वराचा संदेश संपूर्ण देशात सांगितला गेला.” तेव्हा यहूदी लोकांनी शहरातील काही धार्मिक स्त्रिया व पुढारी यांना भडकावून दिले, त्या लोकांनी पौल व बर्णबा यांच्याविरुद्ध अनेक वाईट गोष्टी केल्या आणि त्यांना शहराबाहेर घालवून दिले. मग पौल व बर्णबा यांनी आपल्या पायाची धूळ झटकली व ते इकुन्या शहराला गेले. इकडे येशूचे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.
प्रेषितांची कृत्ये 13:1-52 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता अंत्युखिया येथील मंडळीत संदेष्टे व शिक्षक होते: बर्णबा, शिमोन, ज्याला निगेर देखील म्हणत, कुरेनेचा लूक्य, मनायेन ज्याचे संगोपन मांडलिक हेरोद राजाकडून झाले होते आणि शौल. हे सर्वजण प्रभूची आराधना आणि उपास करीत असताना, पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौल यांना ज्या कामासाठी मी पाचारण केले आहे त्यासाठी त्यांना वेगळे करा.” तेव्हा उपास आणि प्रार्थना केल्यावर त्यांनी आपले हात त्यांच्यावर ठेवले व त्यांना निरोप दिला. पवित्र आत्म्याने त्या दोघांना त्यांच्या मार्गावर पाठविले, ते खाली सलुकीयाला गेले आणि तारवात बसून सायप्रस बेटावर उतरले. सलमीस या शहरात आल्यानंतर, ते यहूदी लोकांच्या सभागृहांमध्ये गेले व त्यांनी परमेश्वराचे वचन जाहीर केले. योहान त्यांच्याबरोबर मदतनीस म्हणून गेला होता. त्या संपूर्ण बेटावर प्रवास करीत ते पाफोस येथे जाऊन पोहोचले. तिथे त्यांना यहूदी बार-येशू नावाचा जादूगार व खोटा संदेष्टे भेटला. सेर्गियोस पौलुस नावाच्या राज्यपालाचा तो एक सेवक होता. सेर्गियोस पौलुस हा बुद्धिमान व ज्ञानी मनुष्य होता. या राज्यपालाने बर्णबा व शौलना बोलाविले, कारण परमेश्वराचे वचन ऐकण्याची त्याची इच्छा होती. परंतु अलीम जादूगार (असा त्याच्या नावाचा अर्थ आहे) त्याने त्यांना विरोध केला आणि विश्वास ठेवण्यापासून राज्यपालाला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केला. मग पवित्र आत्म्याने भरलेला शौल, ज्याला पौल देखील म्हणत असत, त्याने अलीमाकडे रोखून पाहात म्हटले, “तू सैतानाचा पुत्र आहेस आणि सर्व चांगुलपणाचा वैरी आहेस! तू सर्वप्रकारच्या कपटाने व चातुर्याने भरलेला आहेस. प्रभूच्या चांगल्या मार्गाला भ्रष्ट करण्याचे तू कधीच सोडणार नाहीस काय? तर पाहा, आताच प्रभूचा हात तुझ्याविरुद्ध उठला आहे. तू आंधळा होशील आणि काही वेळ तुला सूर्याचा प्रकाश सुद्धा दिसणार नाही.” तत्काळ धुके व अंधकार यांनी तो ग्रासल्यासारखा झाला आणि आपल्याला हाती धरून न्यावे, म्हणून तो इकडे तिकडे कोणाचा तरी चाचपडत शोध करू लागला. राज्यपालाने जे घडले ते पाहिले, तेव्हा त्याने विश्वास ठेवला आणि प्रभूच्या शिक्षणाविषयी तो आश्चर्यचकित झाला. आता पौल आणि त्याचे सहकारी यांनी पाफोस शहर सोडले व ते तारवात बसून पंफुल्यातील पेर्गा येथे आले, या ठिकाणी योहानाने त्यांचा निरोप घेतला व तो यरुशलेमला परतला. ते पेर्गापासून पुढे पिसिदिया प्रांतातील अंत्युखियास गेले. शब्बाथ दिवशी ते सभागृहात गेले आणि तिथे खाली जाऊन बसले. नेहमीप्रमाणे नियमशास्त्र व संदेष्ट्यांच्या ग्रंथातून वाचल्यानंतर, सभागृहातील पुढार्यांनी त्यांना म्हटले: “बंधूंनो, आपल्याजवळ लोकांसाठी काही उत्तेजनपर वचन असेल तर कृपा करून आम्हास सांगा.” पौल उठून उभा राहिला व त्याने हाताने खुणावले आणि म्हणाला: “अहो इस्राएली लोकहो आणि परमेश्वराची उपासना करणारे गैरयहूदी, माझे ऐका! या इस्राएली राष्ट्राच्या परमेश्वराने आपल्या पूर्वजांना निवडून घेतले आणि इजिप्तमध्ये राहत असताना त्यांना फलद्रूप केले. परमेश्वराने आपल्या महान बलाने त्यांना त्या देशातून व गुलामगिरीतून बाहेर आणले; रानात अंदाजे चाळीस वर्षे त्यांनी त्यांचे गैरवर्तन सहन केले; त्यांनी कनानातील सात राष्ट्रांना उलथवून टाकले व त्यांची भूमी वतन म्हणून त्यांच्या लोकांना दिली. हे सर्व घडून येण्यास सुमारे चारशे पन्नास वर्षे लागली. “त्यानंतर, परमेश्वराने त्यांना शमुवेल संदेष्टा येईपर्यंत न्यायाधीश नेमून दिले. यानंतर लोकांनी राजा मागितला आणि परमेश्वराने त्यांना बन्यामीन वंशातील कीशाचा पुत्र शौलाला राजा म्हणून दिले, त्याने चाळीस वर्षे राज्य केले. शौलाला दूर केल्यानंतर, दावीदाला त्यांचा राजा म्हणून नेमले. या दावीदाबद्दल परमेश्वराने साक्ष दिली: ‘माझ्या मनासारखा मनुष्य इशायाचा पुत्र दावीद मला मिळाला आहे; माझ्या इच्छेप्रमाणे असणार्या प्रत्येक गोष्टी तो करेल.’ “परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे, याच मनुष्याच्या वंशामधून येशूंना इस्राएली लोकांसाठी त्यांचा तारणारा म्हणून आणले आहे. येशू येण्यापूर्वी, योहानाने सर्व इस्राएली लोकांना पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याचा उपदेश केला. योहानाचे कार्य संपत आलेले असताना, योहानाने विचारले: ‘मी कोण आहे असे तुम्हाला वाटते? तुम्ही ज्याची वाट पाहता तो मी नाही. परंतु जो माझ्यामागून येत आहे, त्याच्या पादत्राणाचे बंद सोडण्याइतकी सुद्धा माझी योग्यता नाही.’ “अब्राहामाची संतान, माझ्या प्रिय भावांनो आणि परमेश्वराचे भय धरणार्या गैरयहूदीयांनो, तारणाचा संदेश आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे. यरुशलेममधील लोकांनी व त्यांच्या शासकांनी येशूंना ओळखले नाही, त्यांना दोषी ठरवून संदेष्ट्यांच्या त्या शब्दांची पूर्तता केली, ज्या शब्दांचे वाचन प्रत्येक शब्बाथ दिवशी त्यांच्यामध्ये केले जात होते. त्यांना जिवे मारण्यासाठी एकही योग्य पुरावा त्यांना सापडला नाही, तरी त्यांना मृत्युदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी पिलाताकडे केली. त्यांच्याबद्दलची सर्व भविष्ये पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्यांना क्रूसावरून खाली उतरविले व कबरेत ठेवले. परंतु परमेश्वराने त्यांना मृतांतून उठविले, जे गालीलाहून प्रवास करीत यरुशलेमला त्यांच्याबरोबर आले होते, त्यांना पुष्कळ दिवस ते प्रकट झाले. तेच आता आपल्या लोकांस त्यांचे साक्षीदार आहेत. “यासाठी, आम्ही तुम्हाला शुभवार्ता सांगतो की: परमेश्वराने ते वचन त्यांनी येशूंना मरणातून उठवून आमच्यासाठी म्हणजे त्यांच्या संतानासाठी पूर्ण केले आहे. त्याप्रमाणे दुसर्या स्तोत्रसंहितेमध्ये असे लिहिले आहे: “ ‘तू माझा पुत्र आहे आज मी तुझा पिता झालो आहे.’ त्यांना कुजण्याचा अनुभव कधीही येऊ नये म्हणून परमेश्वराने त्यांना मरणातून जिवंत केले. परमेश्वर असे म्हणाले, “ ‘दावीद राजाला पवित्र व निश्चित आशीर्वाद देण्याचे वचन मी दिले होते.’ म्हणून दुसर्या एका ठिकाणीही असे लिहिले आहे, “ ‘तू तुझ्या पवित्रजनाला कुजणे पाहू देणार नाहीस.’ “दावीदाने परमेश्वराच्या उद्देशाप्रमाणे आपल्या पिढीची सेवा केल्यानंतर तो मरण पावला; त्याला त्याच्या पूर्वजांबरोबर पुरले आणि त्याचे शरीर कुजले. परंतु ज्याला परमेश्वराने मृतातून उठविले आणि त्याचे शरीर कुजले नाही. “यासाठी माझ्या मित्रांनो, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे समजून घ्यावे की, येशूंच्याद्वारे पापक्षमेची घोषणा ही तुमच्यासाठी केली आहे. जो प्रत्येकजण विश्वास ठेवतो, तो त्यांच्याद्वारे सर्व पापांपासून मुक्त होतो, मोशेच्या नियमशास्त्राच्या आधारे ही गोष्ट पटवून देणे तुम्हाला शक्य झाले नव्हते. यास्तव सावध राहा, संदेष्ट्यांनी जे सांगितले ते तुमच्याबाबतीत होऊ नये: “ ‘निंदा करणार्यांनो, पाहा, विस्मित होऊन नष्ट व्हा, कारण आता मी तुमच्या काळात जे कार्य करणार आहे, त्याबद्दल तुम्हाला कोणी सांगितले तरी त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.’” पौल व बर्णबा सभागृह सोडून जात होते त्यावेळी पुढील शब्बाथ दिवशी या गोष्टींबद्दल त्यांनी अधिक माहिती द्यावी, अशी लोकांनी त्यांना विनंती केली. मग सभा संपल्यावर अनेक यहूदी आणि यहूद्यांच्या संस्कृतीप्रमाणे धर्मांतर करून आलेले भक्त पौल व बर्णबा यांच्यामागे गेले व त्यांच्याबरोबर बोलणे केले. त्यांनी परमेश्वराच्या कृपेमध्ये सतत वाढत राहावे असे पौल आणि बर्णबाने त्यांना उत्तेजन दिले. पुढील शब्बाथाच्या दिवशी शहरातील जवळपास सर्वच लोक प्रभूचे वचन ऐकण्यासाठी एकत्रित झाले. परंतु यहूद्यांनी समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना हेवा वाटला आणि पौल जे बोलत होता त्याला विरोध करून त्यांनी त्याची निंदानालस्ती केली. मग पौल आणि बर्णबा हे निर्भयपणे बोलले: “हे परमेश्वराचे वचन प्रथम तुम्हाला देण्याचे अगत्य होते. ज्याअर्थी तुम्ही ते नाकारले आहे आणि सार्वकालिक जीवनाकरिता तुम्ही स्वतः योग्य नाहीत असे दाखविले आहे, त्याअर्थी आम्ही गैरयहूदीयांकडे वळतो. यासाठी प्रभूने आम्हाला ही आज्ञा दिली आहे: “ ‘पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तुमच्याद्वारे मिळणारे तारण लाभावे, म्हणून मी तुला गैरयहूदीयांसाठी त्यांचा प्रकाश केले आहे.’ ” गैरयहूदीयांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा ते आनंदित झाले आणि त्यांनी प्रभूच्या वचनाचा सन्मान केला व आणि ज्यांना सार्वकालिक जीवनासाठी नियुक्त करण्यात आले होते त्या सर्वांनी विश्वास ठेवला. प्रभूचे वचन सर्व प्रांतात पसरले. परंतु यहूदी पुढार्यांनी शहरातील उच्च वर्गातील धार्मिक स्त्रियांना व प्रमुख व्यक्तींना चिथविले. त्यांनी पौल व बर्णबा यांचा छळ करून त्यांना त्यांच्या प्रांतातून हाकलून दिले. तेव्हा त्यांनी इशारा म्हणून त्या शहराची धूळ तिथेच झटकून टाकली आणि ते इकुन्यास गेले. आणि शिष्य आनंदाने आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले.
प्रेषितांची कृत्ये 13:1-52 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अंत्युखियाच्या मंडळीत बर्णबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, जो बाळपणापासून मांडलिक हेरोद राजाबरोबर वाढला होता तो मनाएन व शौल हे संदेष्टे व शिक्षक होते. ते प्रभूची सेवा व उपास करत असता पवित्र आत्मा म्हणाला की, “बर्णबा व शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करून ठेवा.” तेव्हा त्यांनी उपास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. ह्याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकीयात येऊन तारवातून कुप्रास गेले. मग ते सलमीनात असता त्यांनी यहूद्यांच्या सभास्थानामध्ये देवाच्या वचनाची घोषणा केली; आणि योहान हाही त्यांचा सहायक होता. पुढे ते सबंध बेटातून चालून पफेस गेल्यावर बर्येशू नावाचा कोणीएक यहूदी जादूगार व खोटा संदेष्टा त्यांना आढळला. तो तेथील सुभेदार सिर्ग्य पौल ह्या बुद्धिमान मनुष्याच्या पदरी होता. ह्या सुभेदाराने बर्णबा व शौल ह्यांना बोलावून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शवली. परंतु अलीम जादूगार (त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे) ह्याने त्यांना अडवून सुभेदाराला विश्वासापासून फितवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शौल, ज्याला पौलही म्हणत, तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, “अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा, अवघ्या नीतिमत्त्वाच्या वैर्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय? तर पाहा, आता प्रभूचा हात तुला प्रतिकूल आहे, तू आंधळा होशील, व काही वेळपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही.” तत्क्षणीच त्याच्यावर धुके पडल्यासारखे होऊन त्याच्या डोळ्यांना अंधारी आली; तेव्हा आपल्याला कोणीतरी हात धरून न्यावे म्हणून तो इकडे तिकडे माणसांचा शोध करू लागला. तेव्हा जे झाले ते पाहून त्या सुभेदाराने प्रभूच्या शिक्षणावरून आश्चर्य करून विश्वास ठेवला. मग पौल व त्याच्या सोबतीचे लोक पफेहून तारवातून पंफुल्यातील पिर्गा येथे गेले, आणि योहान त्यांना सोडून यरुशलेमेस परत गेला. नंतर ते पिर्गा येथून निघून फिरत फिरत पिसिदियातील अंत्युखियास पोहचले; आणि शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन बसले. तेव्हा नियमशास्त्राचे व संदेष्ट्यांच्या ग्रंथांचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकार्यांनी त्यांना सांगून पाठवले की, “बंधुजनहो, तुमच्याजवळ लोकांकरता काही बोधवचन असेल तर सांगा.” तेव्हा पौल उभा राहून हाताने खुणावून म्हणाला : “अहो इस्राएल लोकांनो, व देवाचे भय बाळगणार्यांनो, ऐका. ह्या इस्राएल लोकांच्या देवाने आमच्या पूर्वजांना निवडून घेतले, ते लोक मिसर देशात उपरे असताना त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी भुजाने त्यांना तेथून काढले. पुढे सुमारे चाळीस वर्षेपर्यंत ते रानात असता त्याने त्यांचे गैरवर्तन सहन केले. नंतर त्याने कनान देशातील सात राष्ट्रांचा विध्वंस करून तेथील भूमी त्यांना सुमारे साडेचारशे वर्षेपर्यंत वतन अशी दिली. त्यानंतर त्याने शमुवेल संदेष्ट्यापर्यंत त्यांना न्यायाधीश नेमून दिले. मग त्यांनी राजा मागितला; तेव्हा देवाने बन्यामिन वंशातील कीशाचा पुत्र शौल हा चाळीस वर्षेपर्यंत त्यांना दिला. नंतर त्याने त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की, ‘इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल.’ ह्या मनुष्याच्या वंशजांतून देवाने त्याच्या वचनाप्रमाणे इस्राएलासाठी येशू हा तारणारा उदयास आणला. तो प्रकट होण्यापूर्वी योहानाने पुढे येऊन पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी सर्व इस्राएल लोकांमध्ये घोषणा केली होती. योहान आपले कार्य पूर्ण करत असता म्हणाला, ‘मी कोण आहे म्हणून तुम्हांला वाटते? मी तो नव्हे, तर पाहा, ज्याच्या पायांतील वहाणा सोडण्यास मी योग्य नाही असा कोणी माझ्यामागून येत आहे.’ अहो बंधुजनहो, अब्राहामाच्या वंशातील पुत्रांनो, व तुमच्यापैकी देवाचे भय बाळगणार्यांनो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठवलेली आहे. कारण यरुशलेमवासीयांनी व त्यांच्या अधिकार्यांनी त्याला न ओळखता आणि दर शब्बाथ दिवशी वाचून दाखवण्यात येणारे संदेष्ट्यांचे शब्दही न समजता, त्याला दोषी ठरवून ते शब्द पूर्ण केले. आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा अशी त्यांनी पिलातास विनंती केली. मग त्याच्याविषयी लिहिलेले सर्वकाही पूर्ण करून त्यांनी त्याला खांबावरून खाली काढून कबरेमध्ये ठेवले. पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले. त्याच्याबरोबर जे गालीलाहून यरुशलेमेत आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे; ते आता लोकांना त्याचे साक्षी आहेत. आपल्या पूर्वजांना जे वचन देण्यात आले होते त्याची सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगतो. देवाने येशूला पुन्हा उठवून ते वचन तुमच्याआमच्या मुलाबाळांकरता पूर्ण केले आहे; स्तोत्र दुसरे ह्यातही असे लिहिले आहे की, ‘तू माझा पुत्र आहेस; आज मी तुला जन्म दिला आहे.’ शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून त्याने त्याला मेलेल्यांतून उठवले; ह्याविषयी त्याने असे म्हटले आहे की, ‘दाविदाला दिलेले जे पवित्र व विश्वसनीय दान ते तुम्हांला’ देईन. म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतो, ‘तू आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.’ कारण दावीद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून झोपी गेला, आणि पूर्वजांबरोबर मिळून त्याला कुजण्याचा अनुभव आला; परंतु ज्याला देवाने उठवले तो कुजला नाही. म्हणून बंधुजनहो, तुम्हांला हे ठाऊक असो की, ह्याच्या द्वारे तुम्हांला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे; आणि ज्याविषयी मोशेच्या नियमशास्त्राने तुम्ही नीतिमान ठरत नाही त्या सर्वांविषयी ह्याच्याकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा नीतिमान ठरतो. म्हणून सावध राहा, नाहीतर संदेष्ट्याच्या ग्रंथात जे सांगितलेले आहे ते तुमच्यावर येईल : ‘अहो धिक्कार करणार्यांनो, पाहा, आश्चर्य करा व नाहीसे व्हा; कारण तुमच्या काळात मी एक कार्य करतो, ते कार्य असे की, त्याविषयी तुम्हांला कोणी सविस्तर सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवणारच नाही.”’ ते बाहेर जात असता लोकांनी विनंती केली की, आम्हांला पुढल्या शब्बाथ दिवशी ह्या गोष्टी सांगाव्यात. आणि सभा उठल्यावर, यहूद्यांतील व भक्तिमान यहूदीयमतानुसारी ह्यांच्यातील पुष्कळ जण पौल व बर्णबा ह्यांच्यामागे गेले; त्या दोघांनी त्यांच्याबरोबर बोलून देवाच्या कृपेत टिकून राहण्यास त्यांचे मन वळवले. पुढल्या शब्बाथ दिवशी बहुतेक सर्व नगर देवाचे वचन ऐकायला जमले. पण लोकसमुदायांना पाहून यहूदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले. तेव्हा पौल व बर्णबा हे निर्भीडपणे म्हणाले, “देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगण्याचे अगत्य होते; तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता व आपणांला सार्वकालिक जीवनाकरता अयोग्य ठरवता त्या अर्थी पाहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो. कारण प्रभूने आम्हांला आज्ञा दिली आहे की, ‘मी तुला परराष्ट्रीयांसाठी प्रकाश करून ठेवले आहे, ह्यासाठी की पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण व्हावेस.”’ हे ऐकून परराष्ट्रीय आनंदित झाले आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णन केला; तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास ठेवला. आणि प्रभूचे वचन त्या सर्व प्रांतात पसरत गेले. तेव्हा यहूदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील मुख्य पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालवून दिले. त्यामुळे ते आपल्या पायांची धूळ त्यांच्यावर झटकून इकुन्यास गेले. इकडे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.
प्रेषितांची कृत्ये 13:1-52 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
अंत्युखिया येथील ख्रिस्तमंडळीत बर्णबा, निग्र म्हटलेला शिमोन, लूक्य कुरेनेकर, हेरोद राज्यपालाच्या सहवासात वाढलेला मनाएन व शौल हे संदेष्टे व शिक्षक होते. ते प्रभूची सेवा व उपवास करत असता पवित्र आत्मा म्हणाला, “बर्णबा व शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करून ठेवा.” त्यांनी उपवास व प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवून प्रार्थना केली व त्यांची रवानगी केली. ह्याप्रमाणे पवित्र आत्म्याद्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकीयात येऊन तारवातून कुप्र येथे गेले. ते सलमीना या ठिकाणी आल्यावर त्यांनी देवाच्या वचनाची यहुदी लोकांच्या सभास्थानांमध्ये घोषणा केली. योहान ऊर्फ मार्क हा त्यांचा सेवक त्यांच्याबरोबर होता. पुढे ते सबंध बेट चालून पफे या ठिकाणी गेल्यावर बर्येशू नावाचा कोणी एक यहुदी जादूगार व खोटा संदेष्टा त्यांना आढळला. तो तेथील राज्यपाल सिर्ग्य पौल ह्या बुद्धिमान माणसाचा मित्र होता. ह्या राज्यपालाने बर्णबा व शौल ह्यांना बोलावून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शविली, परंतु अलीम (त्या नावाचा अर्थ जादूगार असा आहे) ह्याने त्यांना अडवून राज्यपालाला विश्वासापासून फितविण्याचा प्रयत्न केला. शौल, ज्याला पौल देखील म्हणत, पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, “अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा, अवघ्या चांगुलपणाच्या वैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय? आता प्रभूचा हात तुला प्रतिकूल आहे. तू आंधळा होशील, व काही वेळेपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही.” तत्क्षणीच त्याच्यावर धुके पडल्यासारखे होऊन त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. आपणाला कोणीतरी हाताला धरून न्यावे म्हणून तो आजूबाजूला माणसाचा शोध घेऊ लागला. जे झाले ते पाहून त्या राज्यपालाने प्रभूच्या संदेशाविषयी आश्चर्य व्यक्त करून विश्वास ठेवला. पौल व त्याचे सहकारी पफेहून तारवातून पंफुल्यातील पिर्गा येथे गेले. योहान ऊर्फ मार्क त्यांना सोडून यरुशलेम येथे परत गेला. ते पिर्गा येथून निघून पिसिदियांतील अंत्युखियास पोहचले. साबाथ दिवशी ते सभास्थानात जाऊन बसले. नियमशास्त्राचे व संदेष्ट्याच्या ग्रंथाचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना संदेश पाठवला, “बंधुजनहो, तमुच्याजवळ लोकांकरता काही बोधवचन असेल तर सांगा.” पौल उभा राहून हाताने खुणावून म्हणाला, “अहो इस्राएली लोकांनो व देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, ऐका. इस्राएली लोकांच्या ह्या देवाने आमच्या पूर्वजांना निवडून घेतले. ते लोक मिसर देशात उपरी असता त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी हाताने त्यांना तेथून काढले. पुढे सुमारे चाळीस वर्षेपर्यंत ते रानात असता, त्याने त्यांचे गैरवर्तन सहन केले. त्याने कनान देशातील सात राष्ट्रांचा विध्वंस करून तेथील भूमी त्यांना सुमारे साडे चारशे वर्षेपर्यंत वतन म्हणून दिली. त्यानंतर त्याने शमुवेल संदेष्ट्यापर्यंत त्यांना न्यायाधीश नेमून दिले. मग त्यांनी राजा मागितला, तेव्हा देवाने बन्यामीन वंशातील किशचा पुत्र शौल हा चाळीस वर्षेपर्यंत त्यांना राजा म्हणून दिला. नंतर त्याने त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले, ‘इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल.’ ह्या मनुष्याच्या वंशजांतून देवाने स्वतः दिलेल्या वचनानुसार इस्राएलला तारण्यासाठी येशू आला आहे. त्याच्या प्रकट होण्यापूर्वी, योहानने पुढे येऊन पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा सर्व इस्रायली लोकांमध्ये केली होती. योहान आपले कार्य पूर्ण करीत असता म्हणाला, ‘मी कोण आहे म्हणून तुम्हांला वाटते? मी तो नव्हे, तर पाहा, ज्याच्या पायातील वहाणा काढावयासही मी पात्र नाही, असा कोणी माझ्या मागून येत आहे.’ अहो बंधुजनहो, अब्राहामच्या वंशांतील पुत्रांनो व देवाचे भय बाळगणाऱ्या यहुदीतरांनो, आपल्याला ह्या तारणाचे वर्तमान पाठवलेले आहे! कारण यरुशलेमवासीयांनी व त्यांच्या अधिकाऱ्यांनी येशूला न ओळखता आणि दर साबाथ दिवशी वाचून दाखविण्यात येणारे संदेष्ट्यांचे शब्दही न समजता, त्याला दोषी ठरवून त्यांनी संदेष्ट्यांचे शब्द पूर्ण केले आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा, अशी विनंती त्यांनी पिलातला केली. त्याच्याविषयी लिहिलेले सर्व काही पूर्ण करून त्यांनी त्याला क्रुसावरून खाली काढून कबरीमध्ये ठेवले. पण देवाने त्याला मरणातून उठवले. त्याच्याबरोबर जे गालीलहून यरुशलेम येथे आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे, ते आता इस्राएली लोकांसाठी त्याचे साक्षीदार आहेत. आपल्या पूर्वजांना जे वचन देण्यात आले होते, त्याचे शुभवर्तमान आम्ही तुम्हांला सांगतो. देवाने येशूला पुन्हा उठवून त्याचे वचन आपल्याकरता पूर्ण केले आहे. दुसऱ्या स्तोत्रात असे लिहिले आहे, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले, ह्याविषयी त्याने असे म्हटले आहे, दावीदला जे वचन दिले होते त्यानुसार मी तुम्हांला पवित्र व निश्चित असा आशीर्वाद देईन. म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतो, तू आपल्या पवित्र सेवकाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. कारण दावीद त्याच्या स्वतःच्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून निधन पावला आणि पूर्वजांबरोबर मिळून त्याचा मृतदेह कुजला. परंतु ज्याला देवाने उठवले तो कुजला नाही. म्हणून बंधुजनहो, तुम्हांला हे ठाऊक असावे की, ह्याच्याद्वारे तुमच्या पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे. ज्याविषयी मोशेच्या नियमशास्रानुसार तुम्ही नीतिमान ठरत नाही त्या सर्वांविषयी ह्याच्याकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा नीतिमान ठरतो. म्हणून सावध राहा, नाहीतर संदेष्ट्यांच्या ग्रंथात जे सांगितले आहे ते तुमच्यावर ओढवेल, अहो उपहास करणाऱ्यांनो, पाहा, आश्चर्य करा व नाहीसे व्हा, कारण तुमच्या काळात मी एक कार्य करतो, ते कार्य असे की, त्याविषयी तुम्हांला कोणी स्पष्टीकरण देऊन सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवणार नाही. पौल व बर्णबा बाहेर जात असता लोकांनी विनंती केली, “आम्हांला पुढल्या साबाथ दिवशी ह्याविषयी अधिक ऐकायला आवडेल.” सभा संपल्यावर यहुदी लोकांमधील व परिवर्तित यहुदी मतानुसारी ह्यांच्यातील पुष्कळ जण पौल व बर्णबा ह्यांच्या मागे गेले. त्या दोघांनी त्यांच्याबरोबर बोलून देवाच्या कृपेत टिकून राहण्याकरिता त्यांना प्रोत्साहन दिले. पुढच्या साबाथ दिवशी जवळ जवळ सर्व नगर, देवाचे वचन ऐकावयाला जमले. पण लोकसमुदायाला पाहून यहुदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले. परंतु पौल आणि बर्णबा हे निर्भीडपणे म्हणाले, “देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगणे अगत्याचे होते, तरी ज्याअर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता व आपणांस शाश्वत जीवनाकरता अयोग्य ठरवता, त्याअर्थी आम्ही यहुदीतरांकडे वळतो; कारण प्रभूने आम्हांला अशी आज्ञा दिली आहे, मी तुला यहुदीतरांसाठी प्रकाश असे करून ठेवले आहे. ह्यासाठी की, सर्व जगाचे तारण व्हावे.” हे ऐकून यहुदीतर आनंदित झाले, त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णिला आणि जितके शाश्वत जीवनासाठी निवडलेले होते, तितक्यांनी विश्वास ठेवला. प्रभूचे वचन त्या सर्व प्रदेशात पसरत गेले. यहुदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील प्रतिष्ठित पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या प्रदेशाबाहेर घालवून लावले. प्रेषित त्यांचा विरोध दर्शवीत पायांची धूळ झटकून तेथून इकुन्य येथे गेले. अंत्युखियामधील श्रद्धावंत आनंदाने व पवित्र आत्म्याने भरून गेले.