आता एक मनुष्य येशूंकडे आला व त्यांना विचारले, “गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळविण्याकरिता मी कोणत्या चांगल्या गोष्टी कराव्या?”
तेव्हा येशूंनी त्याला म्हटले, “तू मला उत्तम काय आहे हे का विचारतोस? फक्त परमेश्वरच खर्या अर्थाने उत्तम आहेत. पण तू आज्ञा पाळ म्हणजे तुला जीवनात प्रवेश मिळेल.”
“कोणत्या आज्ञा?” त्याने विचारले.
येशूंनी उत्तर दिले, “ ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको, तुझ्या आई आणि वडिलांचा मान राख,’ आणि ‘जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा.’ ”
तो तरुण म्हणाला, “या सर्व मी पाळल्या आहेत. मी अजून कशात उणा आहे?”
येशू म्हणाले, “तू परिपूर्ण होऊ इच्छित असल्यास जा, तुझी मालमत्ता विकून टाक आणि गरिबांना वाटून दे आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये व मला अनुसर.”
पण त्या तरुणाने हे ऐकले, तेव्हा तो खिन्न झाला आणि निघून गेला, कारण त्याच्याजवळ पुष्कळ संपत्ती होती.
मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “मी तुम्हाला सत्य सांगतो, श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे कठीण आहे! मी पुन्हा सांगतो की, श्रीमंत मनुष्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.”
येशूंच्या या विधानाने शिष्य गोंधळात पडले व त्यांनी विचारले, “मग कोणाचे तारण होऊ शकेल?”
येशूंनी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटले, “मानवाला हे अशक्य आहे, परंतु परमेश्वराला सर्वगोष्टी शक्य आहेत.”
यावर पेत्र येशूंना म्हणाला, “आपल्याला अनुसरण्यासाठी आम्ही सर्वकाही सोडून दिले आहे; त्याच्या मोबदल्यात आम्हाला काय मिळेल?”
येशूंनी त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला सत्य सांगतो, सर्व गोष्टीचे नूतनीकरण होईल, तेव्हा मानवपुत्र गौरवी सिंहासनावर बसेल आणि जे तुम्ही मला अनुसरता ते तुम्ही सुद्धा बारा सिंहासनावर बसाल व इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय कराल. ज्या कोणी मला अनुसरण्यासाठी आपले घर, भाऊ बहीण, आई, पिता, पत्नी, मुले, मालमत्ता यांचा त्याग केला आहे, त्याला शंभरपट मोबदला तर मिळेलच, पण सार्वकालिक जीवनही मिळेल. पण अनेकजण जे पहिले आहेत, ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे आहेत ते पहिले होतील.”