YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 13:1-22

लूक 13:1-22 MRCV

त्या सुमारास तिथे जे हजर होते, त्यांनी असे वृत्त येशूंना सांगितले की, गालील येथील रहिवाशांचे रक्त पिलाताने त्यांच्या बलिदानांमध्ये मिश्रित केले होते. येशूंनी उत्तर दिले, “गालीलातील लोक इतर लोकांपेक्षा अधिक पापी होते म्हणून त्यांनी दुःख सोसले असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो, तसे मुळीच नाही. जर तुम्हीही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा नाश होईल. किंवा शिलोआमाचा बुरूज जेव्हा त्या अठरा लोकांवर पडला आणि ते मरण पावले, तर तुम्हाला असे वाटते काय की, यरुशलेममध्ये राहणार्‍या सर्वांपेक्षा ते अधिक दोषी होते? नाही, मुळीच नाही! परंतु तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुमचाही नाश होईल.” नंतर त्यांनी हा दाखला सांगितला: “एका मनुष्याच्या बागेमध्ये अंजिराचे झाड वाढत होते, आणि तो फळ पाहावयास गेला पण त्याला काही सापडले नाही. जो मळ्याची काळजी घेत होता त्यास म्हणाला, ‘तीन वर्षापासून मी या अंजिराच्या झाडावर फळ शोधायला येत आहे आणि मला काहीच मिळाले नाही. ते उपटून टाक! या जागेचा व्यर्थ उपयोग का बरे?’ “त्यावर माळी धन्याला म्हणाला, ‘आणखी एक वर्ष राहू द्या, मी त्याच्याभोवती खोदून खतपाणी घालेन. पुढील वर्षी फळ आले तर ठीक! नाही मिळाले तर उपटून टाका.’ ” एकदा शब्बाथ दिवशी येशू एका सभागृहामध्ये शिक्षण देत होते, तिथे एका स्त्रीला दुरात्म्याने अठरा वर्षे अपंग करून ठेवले होते. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूंनी तिला आपल्याजवळ बोलाविले, आणि ते तिला म्हणाले, “बाई, तू तुझ्या विकारापासून मुक्त झाली आहेस.” त्यांनी तिला स्पर्श केला आणि तत्काळ तिला सरळ उभे राहता आले. तेव्हा ती परमेश्वराची स्तुती करू लागली. येशूंनी शब्बाथ दिवशी बरे केले हे पाहून सभागृहाचा प्रमुख खूपच संतप्त झाला व लोकांना म्हणाला, “काम करण्यासाठी सहा दिवस आहेत; त्या दिवसातच आजारातून बरे होण्यासाठी येत जा; शब्बाथ दिवशी नाही.” प्रभूने त्यांना उत्तर दिले, “ढोंग्यांनो! तुमच्यातील कोणी शब्बाथ दिवशी आपल्या बैलाला किंवा गाढवाला गोठ्यातून बाहेर पाणी पाजण्यास नेत नाहीत काय? ही स्त्री अब्राहामाच्या वंशातील कन्या आहे, तिला सैतानाने अठरा वर्षे कैद करून बंधनात जखडून ठेवले होते, शब्बाथ दिवशी तिला बंधमुक्त करणे योग्य नाही का?” येशूंचे हे उद्गार ऐकून त्याचे सर्व विरोधक लज्जित झाले, पण लोक मात्र ते करीत असलेल्या अद्भुत कृत्यांमुळे हर्षभरित झाले. नंतर येशूंनी विचारले, “परमेश्वराचे राज्य कशाप्रकारचे आहे? त्याची तुलना मी कशाशी करू? एका मनुष्याने आपल्या बागेत पेरलेल्या मोहरीच्या दाण्यासारखे आहे. ते वाढून मोठे झाड होते आणि त्याच्या फांद्यांमध्ये आकाशातील पक्षी विसावा घेतात.” पुन्हा येशूंनी विचारले, “परमेश्वराच्या राज्याची तुलना मी कशाबरोबर करू? ते खमिरासारखे आहे, एका स्त्रीने ते घेतले आणि तीन माप पिठात तोपर्यंत एकत्र केले की त्यामुळे सर्व पीठ चांगले फुगले.” नंतर येशू शहरातून आणि गावातून शिक्षण देत यरुशलेमकडे जाण्यासाठी निघाले.

संबंधित व्हिडिओ