हे ऐकताच याकोबाने भीतीने व व्याकूळ होऊन आपले कुटुंबीय, गुरे, शेरडेमेंढरे आणि उंट यांची दोन गटांमध्ये विभागणी केली. त्याने विचार केला, “एसावाने एका गटावर हल्ला केला तर दुसर्या गटाला कदाचित निसटून जाता येईल.”
मग याकोबाने प्रार्थना केली, “हे याहवेह, माझे पिता अब्राहाम, आणि माझे पिता इसहाक यांच्या परमेश्वरा, तुम्ही मला माझ्या देशात आणि नातलगात परत येण्यास सांगितले व मला समृद्ध करण्याचे वचन दिले आहे. तुम्ही मला वचन दिल्याप्रमाणे जी वात्सल्य आणि विश्वसनीयता वारंवार दाखविलीस तिला वास्तविक मी पात्र नाही; मी यार्देनेच्या पलीकडे गेलो तेव्हा माझ्याजवळ एका काठीशिवाय दुसरे काहीही नव्हते आणि आता माझे दोन गट झाले आहेत. तुम्ही माझी विनंती ऐकून, माझा भाऊ एसावच्या हातून मला वाचवा, मला त्याची भीती वाटते की तो येऊन मला आणि त्यांच्या आईसह मुलांनाही मारून टाकेल. परंतु तुम्ही मला समृद्ध करण्याचे आणि माझे वंशज समुद्रातील वाळूप्रमाणे अगणित करण्याचे वचन दिले आहे.”
त्या रात्री याकोब तिथेच राहिला आणि आपल्याजवळ होते त्यातून त्याने आपला भाऊ एसाव याच्यासाठी एक भेट तयार केली: त्यासाठी त्याने दोनशे शेळ्या, वीस बोकड, दोनशे मेंढ्या व वीस एडके, तीस दुभत्या मादी उंट व त्यांची बछडी, चाळीस गाई, दहा बैल, वीस गाढवी, दहा शिंगरे, एवढी जनावरे बाजूला काढली. प्रत्येक जातीच्या जनावरांचे वेगवेगळे कळप करून त्यांना नोकरांकडे सुपूर्द करून सूचना दिली, “माझ्यापुढे चला आणि प्रत्येक कळपामध्ये काही अंतर ठेवा.”
पहिला कळप नेणार्या नोकराला त्याने सांगितले: “जेव्हा माझा भाऊ एसाव तुम्हाला भेटेल आणि त्याने विचारले, ‘तुम्ही कोणाचे चाकर आहात, तुम्ही कुठे चालला आहात, ही जनावरे जी तुझ्यापुढे आहे ती कोणाची आहेत?’ त्याला उत्तर द्या, ‘ही जनावरे तुमचा सेवक याकोब याची आहेत. ही त्याने आपला धनी एसावच्या भेटीदाखल पाठविली आहेत. तो स्वतः आमच्या पाठोपाठ येत आहे.’ ”
याकोबाने दुसर्या, तिसर्या आणि इतर कळप हाकणार्याला सूचना दिली: “एसाव जेव्हा तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्हीही हाच निरोप दिला पाहिजे. हे निश्चित बोला, ‘आपला दास याकोब आमच्या मागून येत आहे.’ ” कारण त्याने विचार केला, “मी एसावाला समोरासमोर भेटण्यापूर्वी त्याला भेटी देऊन संतुष्ट करेन; मग तो जेव्हा मला भेटेल, तेव्हा तो माझा स्वीकार करेल.” म्हणूनच आपल्यापुढे भेटी पाठवली आणि याकोबाने ती रात्र तळावरच घालविली.