YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 करिंथकरांस 15:1-32

1 करिंथकरांस 15:1-32 MRCV

आता माझ्या बंधूंनो व भगिनींनो, ज्या शुभवार्तेचा मी तुम्हाला प्रचार केला होता, त्याची तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते, तिचा तुम्ही स्वीकार केला आणि तिच्यामध्ये तुम्ही खंबीरपणे उभे आहात. या शुभवार्तेद्वारे तुमचे तारण झाले, ज्या वचनांचा मी तुम्हाला प्रचार केला त्यावर जर तुम्ही दृढविश्वास ठेवला नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे. प्रथम महत्त्वाचे म्हणजे जे मी स्वीकारले तेच तुम्हाला सांगत आलो आहे आणि ते म्हणजे वचनांनुसार: ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावले. त्यांना पुरण्यात आले आणि तीन दिवसानंतर त्यांना शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे कबरेतून पुन्हा उठविण्यात आले, आणि केफाला त्यांचे पहिल्यांदा दर्शन घडले, आणि नंतर बारा शिष्यांना. त्यानंतर पाचशेपेक्षा अधिक बंधू व भगिनींना एकाच वेळी त्यांचे दर्शन घडले, त्यातील बहुतेक आजही जिवंत असले, तरी काहीजण मरण पावले आहेत. याकोबाला आणि नंतर सर्व प्रेषितांना त्यांचे दर्शन झाले. सर्वात शेवटी, एखाद्या अवेळी जन्मलेल्यासारखे मला त्यांचे दर्शन झाले. कारण सर्व प्रेषितांपेक्षा मी सर्वात कनिष्ठ आहे आणि प्रेषित म्हणून घेण्याच्या किंचितही लायकीचा नाही, कारण मी परमेश्वराच्या मंडळीचा छळ केला. आता मी जो काही आहे, तो परमेश्वराच्या कृपेमुळेच आहे; आणि त्यांची माझ्यावरील कृपा व्यर्थ गेली नाही. कारण इतर सर्वांपेक्षा मी अधिक कष्ट केले; परंतु मी नाही तर परमेश्वराची कृपा माझ्यावर असल्यामुळे हे झाले. प्रचार मी किंवा त्यांनी केला, परंतु संदेश तोच आहे आणि त्यावर तुम्ही विश्वास ठेवला. परंतु जर ख्रिस्त मरणातून पुन्हा उठविले गेले असा आम्ही प्रचार करतो, तर मग मेलेल्यांचे पुनरुत्थान होणार नाही, असे तुमच्यापैकी काहीजण का म्हणतात? जर मेलेल्यांचे पुनरुत्थान होत नाही, तर ख्रिस्तही अजून उठविले गेले नाही. आणि ख्रिस्त अजून उठविले गेले नाही, तर आमचा प्रचार आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे. यापेक्षा अधिक, म्हणजे आम्ही परमेश्वराविषयी खोटी साक्ष देणारे आढळलो, कारण परमेश्वराने ख्रिस्ताला मृतांतून उठविले अशी साक्ष आम्ही देतो. मृत झालेले पुन्हा उठविले जाणार नाहीत, तर त्यांनी त्याला मृतांतून उठविलेच नाही. जर मेलेले जिवंत होत नाही, तर मग ख्रिस्तही अजून जिवंत झालेले नाही; आणि ख्रिस्त मरणातून जिवंत झाले नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे. तुम्ही अजूनही तुमच्या पापातच आहात. आणि तर जे ख्रिस्तामध्ये मरण पावले आहेत, त्यांचाही नाश झाला आहे. जर ख्रिस्तामध्ये आपली आशा फक्त या पृथ्वीवरील जीवनासाठी असेल, तर सर्व मनुष्यांमध्ये आपली स्थिती अधिक दयनीय ठरेल. परंतु निश्चित ख्रिस्त मेलेल्यातून उठविले गेले आहेत; जे निद्रा पावलेले आहेत त्यातील ते प्रथमफळ आहे. कारण जसा एका मनुष्याद्वारे मृत्यू आला, तसाच या एका मनुष्याद्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले आहे. कारण आदामामध्ये सर्व मरण पावतात, तसेच ख्रिस्तामुळे सर्व जिवंत करण्यात येतील प्रत्येकजण आपआपल्या क्रमाप्रमाणे उठेल: प्रथमफळ ख्रिस्त; नंतर जेव्हा ते येतील तेव्हा जे त्यांचे आहेत ते उठतील. नंतर शेवट होईल, त्यांनी सर्व सत्ता, अधिकार आणि सामर्थ्य नष्ट केल्यावर ख्रिस्त आपले राज्य परमेश्वर पित्याला सोपवून देतील. कारण त्यांचे सर्व शत्रू पायाखाली ठेवीपर्यंत त्यांना राज्य करणे भाग आहे. शेवटचा शत्रू जो मृत्यू, त्याचाही नाश केला जाईल. कारण त्यांनी “सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या आहेत.” आता जेव्हा असे म्हटले आहे की, “सर्वकाही” त्यांच्या अधिकाराखाली ठेवले आहे, यावरून स्पष्ट होते की ज्यांनी “सर्वकाही” ख्रिस्ताच्या अधीन केले आहे आणि त्या सर्वकाहीमध्ये परमेश्वराचा समावेश नाही. हे सर्व त्यांनी केल्यानंतर, पुत्र स्वतः त्यांच्या अधीन होईल ज्या परमेश्वराने सर्वकाही त्यांच्या स्वाधीन केले आहे, यासाठी की परमेश्वराने सर्वात सर्वकाही व्हावे. जर पुनरुत्थान नाही, तर काहीजणांनी मृतांच्यावतीने बाप्तिस्मा घेतला आहे त्यांनी काय करावे? जर मृत झालेले पुन्हा कधीच जिवंत होणार नसतील तर लोकांनी त्यांच्याबद्दल बाप्तिस्मा घेण्याची काय गरज आहे? आणि प्रत्येक वेळेस आम्ही तरी आमचे प्राण धोक्यात का घालावे? निश्चित, मी दररोज मृत्यूला तोंड देतो. मला ख्रिस्त येशू आपला प्रभू यामध्ये तुम्हा सर्वांचा अभिमान वाटतो. जर पृथ्वीवरील आशेने इफिस येथील हिंस्र पशूंशी मनुष्यांसारखे लढण्यात आले तर मला काय लाभ झाला? जर मेलेले पुन्हा जिवंत होणार नाही तर, “चला, आपण खाऊ आणि पिऊ, कारण उद्या आपण मरणार आहोत.”