YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 25:1-30

मत्तय 25:1-30 MACLBSI

स्वर्गाचे राज्य दहा कुमारिकांसारखे असेल. त्या त्यांचे दिवे घेऊन वराला सामोऱ्या जायला निघाल्या. त्यांत पाच मूर्ख व पाच शहाण्या होत्या. मूर्ख कुमारिकांनी त्यांचे दिवे घेतले पण त्यांच्याबरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी त्यांचे दिवे घेतले व भांड्यांत तेलही घेतले. वराला विलंब लागला व सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली. मध्यरात्री हाक आली, “पाहा, वर आला आहे. त्याला सामोऱ्या जा.’ त्या सर्व मुली उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. मूर्खांनी शहाण्यांना म्हटले, “तुम्ही आम्हांला तुमच्या तेलातून थोडेसे द्या कारण आमचे दिवे मालवू लागले आहेत.’ शहाण्यांनी उत्तर दिले, “नाही. आम्हांला व तुम्हांला पुरेल एवढे तेल आमच्याकडे नाही. तुम्ही स्वतःकरता तेल विकत घेऊन या.’ त्या तेल विकत घ्यायला गेल्या असता वर आला. तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर लग्नास गेल्या आणि दार बंद झाले. नंतर त्या दुसऱ्या कुमारिकादेखील येऊन म्हणाल्या, “महाशय, आमच्यासाठी दार उघडा.’ त्याने उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मी तुम्हांला ओळखत नाही.’ तुम्ही जागृत राहा कारण तुम्हांला तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. स्वर्गाचे राज्य असे असेल: परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने त्याच्या दासांना बोलावून त्यांच्याकडे त्याची मालमत्ता सोपवून दिली. एकाला त्याने पाच हजार सुवर्ण मोहरा, दुसऱ्याला दोन हजार मोहरा तर तिसऱ्याला एक हजार मोहरा अशा ज्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे दिल्या आणि तो परदेशी गेला. ज्याला पाच हजार मोहरा मिळाल्या होत्या त्याने लगेच जाऊन त्यांच्यावर व्यापार केला व आणखी पाच हजार कमावल्या. तसेच ज्याला दोन हजार मिळाल्या होत्या त्यानेही आणखी दोन हजार मिळवल्या, परंतु ज्याला एक हजार मिळाल्या होत्या त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात त्याच्या धन्याचा पैसा लपवून ठेवला. बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी परत आला व त्यांच्याकडून हिशोब घेऊ लागला. ज्याला पाच हजार मोहरा मिळाल्या होत्या तो आणखी पाच हजार आणून म्हणाला, “महाराज, आपण माझ्याकडे पाच हजार मोहरा सोपवून दिल्या होत्या, पाहा, त्यांच्यावर मी आणखी पाच हजार मिळवल्या आहेत.’ त्याला त्याच्या धन्याने म्हटले, “शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोड्या गोष्टींत विश्वासू राहिलास. मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. तू तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’ त्यानंतर ज्याला दोन हजार मिळाल्या होत्या तोही येऊन म्हणाला, “महाराज, आपण माझ्याकडे दोन हजार मोहरा सोपवून दिल्या होत्या, पाहा, त्यांच्यावर मी आणखी दोन हजार मिळविल्या आहेत.’ त्यालाही त्याच्या धन्याने म्हटले, “शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोड्या गोष्टींत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’ ज्याला एक हजार मोहरा मिळाल्या होत्या तोही येऊन म्हणाला, “महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर आहात. जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता. म्हणून मी भ्यालो व जाऊन तुमच्या हजार मोहरा मी जमिनीत लपवून ठेवल्या होत्या. जे तुमचे आहे ते तुम्हांला परत करत आहे.’ त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, “अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापणी करतो व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो, हे तुला ठाऊक होते ना? तर मग माझे पैसे सावकाराकडे ठेवायचे होते म्हणजे मी आल्यावर ते मला व्याजासकट परत मिळाले असते.’ तो त्याच्या दासांना म्हणाला, “त्या हजार मोहरा त्याच्याकडून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल आणि ज्या कोणाकडे नाही त्याच्याजवळ जे असेल तेदेखील त्याच्याकडून काढून घेतले जाईल आणि हे बघा, ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका. तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल.’