YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 22:1-33

मत्तय 22:1-33 MACLBSI

येशू पुन्हा त्यांना दाखले देऊ लागला. तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी द्यायचे ठरवले. लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते, त्यांना बोलावायला त्याने आपले दास पाठवले, परंतु ते येईनात. पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यांना म्हटले की, आमंत्रितांना असे सांगा, “पाहा, मी मेजवानी तयार केली आहे, माझे बैल व पुष्ट पशू कापले आहेत. सर्व काही तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस चला.’ तरी पण हे मनावर न घेता त्यांच्यापैकी कोणी आपल्या शेतात, तर कोणी व्यापाराला गेले. बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला व त्यांना ठार मारले. हे ऐकून राजा संतापला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे शहर जाळून टाकले. त्यानंतर तो आपल्या दासांना म्हणाला, “लग्नाची तयारी झाली आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जा. तेथे जितके लोक तुम्हांला आढळतील, तितक्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा.’ त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरेबाईट असे जितके आढळले, त्या सर्वांना एकत्र जमवले आणि लग्नाचा मंडप लोकांनी भरून गेला. परंतु राजा पाहुण्यांना भेटायला आला तेव्हा लग्नसमारंभास साजेसे कपडे न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तो त्याला म्हणाला, “मित्रा, लग्नाचा पोषाख न घालता तू येथे कसा आलास?’ त्याला काही उत्तर देता येईना. नंतर राजाने नोकरांना सांगितले, “ह्याचे हातपाय बांधून ह्याला बाहेरील अंधारात टाका, तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल.’ बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडे आहेत.” नंतर येशूला बोलण्यात पकडण्याकरता परुश्यांनी मसलत केली. त्यांनी त्यांच्या शिष्यांना व हेरोदच्या पक्षातील काही जणांना त्याच्याकडे पाठवून विचारले, “गुरुजी, आम्हांला ठाऊक आहे की, आपण खरे आहात आणि सत्याला अनुसरून देवाचा मार्ग शिकवता. आपण कोणाची भीड बाळगत नाही आणि व्यक्तीचे तोंड पाहून बोलत नाही. आपल्याला काय वाटते, हे आम्हांला सांगा. कैसरला कर देणे कायदेशीर आहे की नाही?” येशू त्यांचा दुष्टपणा ओळखून म्हणाला, “ढोंग्यांनो, माझी अशी परीक्षा का पाहता? कर भरायचे नाणे मला दाखवा.” तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ एक नाणे दिले. तो त्यांना म्हणाला, “ही मुद्रा व हा लेख कोणाचा?” ते म्हणाले, “कैसरचा.” त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसरचे ते कैसराला व देवाचे ते देवाला द्या.” हे ऐकून ते थक्क झाले व त्याला सोडून निघून गेले. पुनरुत्थान नाही, असे म्हणणाऱ्या सदुकी लोकांनी त्याच दिवशी येशूकडे येऊन त्याला विचारले, “गुरुजी, मोशेने सांगितले आहे की, जर एखादा मनुष्य मूलबाळ नसता निधन पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेबरोबर विवाह करून त्याच्या भावाचा वंश चालवावा. आमच्यामध्ये सात भाऊ होते. त्यातला पहिला भाऊ लग्न करून मरण पावला आणि त्याला संतती नसल्यामुळे त्याची बायको त्याच्या भावाची झाली. अशा प्रकारे दुसऱ्या मागून तिसरा असे ते सातही जण निधन पावले आणि सर्वांच्या शेवटी ती स्त्रीही मरण पावली. तर पुनरुत्थान झाल्यावर ती त्या सात जणांपैकी कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिच्याबरोबर विवाह केला होता.” येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही धर्मशास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे अशी चूक करीत आहात. पुनरुत्थान झाल्यावर कोणी लग्न करत नाहीत किंवा लग्न लावून देत नाहीत, तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात. मृतांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हांला जे सांगितले, ते तुम्ही वाचले नाही काय? ‘मी अब्राहामचा देव, इसहाकचा देव व याकोबचा देव आहे.’ तो मृतांचा नव्हे तर जिवंताचा देव आहे.” हे ऐकून लोकसमुदायाला त्याच्या शिकवणीने विस्मय वाटला.