एकदा एक जण येऊन येशूला म्हणाला, “गुरुजी, आपण किती चांगले आहात! मला शाश्वत जीवन मिळावे, म्हणून मी कोणते चांगले काम केले पाहिजे?”
तो त्याला म्हणाला, “चांगले म्हणजे काय ह्याविषयी मला का विचारतोस? एकट्या परमेश्वराशिवाय कोणीही चांगला नाही. तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ.”
तो त्याला म्हणाला, “कोणत्या?” येशू म्हणाला, “खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, तुझ्या वडिलांचा व तुझ्या आईचा सन्मान कर आणि जशी स्वतःवर तशी तुझ्या शेजाऱ्यावर प्रीती कर.”
तो युवक त्याला म्हणाला, “मी हे सर्व पाळले आहे; माझ्यात अजून काय उणे आहे?”
येशू त्याला म्हणाला, “तू पूर्ण होऊ पाहतोस तर जा. तुझे जे काही असेल ते विकून जे मिळेल ते गोरगरिबांना दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि नंतर येऊन माझा शिष्य हो.”
पण हे ऐकून तो युवक खिन्न होऊन निघून गेला; कारण त्याच्याकडे फार संपत्ती होती.
नंतर येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, स्वर्गाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण असेल! मी पुन्हा तुम्हांला सांगतो, धनवानाने देवाच्या राज्यात जाणे, ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नेढ्यातून जाणे सोपे आहे.”
हे ऐकून शिष्य अत्यंत विस्मित होऊन म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?”
परंतु येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “माणसांना हे अशक्य आहे. देवाला मात्र सर्व काही शक्य आहे.”
पेत्राने उत्तरादाखल त्याला म्हटले, “पाहा, आम्ही सर्व काही सोडून आपल्यामागे आलो आहोत, तर आम्हांला काय मिळेल?”
येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, नव्या उत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल, तेव्हा माझ्यामागे आलेले तुम्हीही बारा राजासनांवर बसून इस्राएलच्या बारा वंशांचा न्यायनिवाडा कराल. तसेच ज्याने घरे, भाऊ, बहिणी, वडील, आई, पत्नी, मुले किंवा शेते माझ्या नावाकरता सोडली आहेत, त्याला शंभरपटीने मिळून शाश्वत जीवन वतन म्हणून प्राप्त होईल. तरी आता जे पहिले आहेत त्यांच्यापैकी पुष्कळ शेवटचे व आता जे शेवटचे आहेत त्यांच्यापैकी पुष्कळ पहिले होतील.