YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 करिंथ 15:1-32

1 करिंथ 15:1-32 MACLBSI

बंधुजनहो, जे शुभवर्तमान मी तुम्हांला घोषित केले, ज्याचा तुम्ही स्वीकार केला, ज्याच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, ज्याच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, त्याच शुभवर्तमानाची मी तुम्हांला आठवण करून देतो. जो संदेश मी तुम्हांला घोषित केला, तो संदेश तुम्ही दृढ धरला असेल. नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. मला जे मिळाले, ते मी अत्यंत महत्त्वाचे समजून तुमच्या सुपूर्त केले, म्हणजेच पवित्र शास्त्रानुसार ख्रिस्त तुमच्या-आमच्या पापांसाठी मरण पावला. तो पुरला गेला आणि धर्मशास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. तो प्रथम पेत्राला व नंतर बारा जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला. त्यांतील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, परंतु काही निधन पावले आहेत. त्यानंतर तो याकोबला व पुढे सर्व प्रेषितांना दिसला आणि जणू काही अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला. कारण प्रेषितांत मी सर्वांत कनिष्ठ आहे. प्रेषित म्हणवून घेण्यास मी पात्र नाही; कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला. तरी जो काही मी आहे, तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे, ती व्यर्थ झाली नाही. उलट त्या सर्वांपेक्षा मी अधिक श्रम केले. ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले. सारांश, मी असो किंवा ते असोत आम्ही अशीच घोषणा करतो आणि तुम्ही असाच विश्वास धरला आहे. आता ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहे, अशी त्याच्याविषयी घोषणा होत असताना मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही, असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात हे कसे? जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्त उठवला गेला नाही आणि ख्रिस्त उठवला गेला नाही, तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ आणि आम्ही देवासंबंधाने खोटे साक्षीदार ठरतो. कारण देवासंबंधाने आम्ही अशी साक्ष दिली की, त्याने ख्रिस्ताला उठवले, पण मेलेले उठवलेच जात नाहीत, तर मग त्याने त्याला उठवले नाही. मेलेले उठवले जात नसतील, तर ख्रिस्तही उठवला गेला नाही आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे आणि तुम्ही अजून तुमच्या पापांतच आहात. तसेच येशूवर श्रद्धा ठेवणारे जे निधन पावले आहेत, त्यांचाही नाश झाला आहे. आपली ख्रिस्तावरील आशा केवळ ह्या जीवनासाठी उपयुक्त असेल आणि पुढे तिचा काहीच फायदा नसेल असे जर आपण समजत असाल, तर सबंध जगात आपल्यासारखे कीव करण्याजोगे आपणच! परंतु वस्तुस्थिती ही आहे की, ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहे. जे मरण पावले आहेत त्यांतला तो प्रथम फळ आहे. खरोखर ज्याअर्थी मरण मनुष्याद्वारे आहे त्याअर्थी मेलेल्यांचे पुनरुत्थान मनुष्याद्वारे आहे. जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे:प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे आहेत, ते त्याच्या आगमनकाळी. नंतर शेवट होईल, त्यावेळी प्रत्येक अधिकार व प्रत्येक सामर्थ्यही तो नष्ट करील व राज्य देवपित्याच्या स्वाधीन करील; कारण त्याच्या पायांखाली सर्व शत्रू आणेपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटचा शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. पवित्र शास्त्रात म्हटले आहे, ‘देवाने सर्व अंकित करून त्याच्या पायांखाली ठेवले.’ परंतु सर्व अंकित केले आहे, असे जेव्हा म्हटले तेव्हा, ज्याने त्याला सर्व अंकित करून दिले त्याचा समावेश होत नाही, हे उघड आहे. त्याच्या अंकित सर्व काही झाले, असे जेव्हा होईल तेव्हा, ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल, अशा हेतूने की, देव सर्वांना सर्व काही होवो. असे नसल्यास मेलेल्यांच्या वतीने जे बाप्तिस्मा घेतात त्यांचे काय? जर मेलेले मुळीच उठवले जात नाहीत, तर त्यांच्या वतीने लोक बाप्तिस्मा का घेतात? आम्हीही घडोघडी जीव धोक्यात का घातला असता? बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधे मला तुमच्याविषयी जो अभिमान वाटतो त्याला स्मरून मी खरोखर सांगतो की, मी रोज मृत्यू स्वीकारतो! जर केवळ मानवी आकांक्षेनुसार इफिस येथे मी श्वापदांना झुंज दिली, तर त्यात मला काय मिळाले? मेलेले उठवले जात नाहीत, तर धर्मशास्त्रानुसार ‘चला, आपण खाऊ, पिऊ, कारण उद्या आपण मरणार.’