त्यादिवशी येशू घरातून निघून सरोवराच्या किनार्याशी जाऊन बसला तेव्हा लोकांचे समुदाय त्याच्याजवळ जमले; म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनार्यावर उभे राहिले. मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या तो म्हणाला “पाहा, पेरणारा पेरणी करावयास निघाला; आणि तो पेरणी करीत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळ जमिनीवर पडले, तेथे फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले; आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्यास मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले; मग काटेरी झाडानी वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, असे पीक आले. ज्याला कान आहेत तो ऐको.”
मग शिष्य जवळ येऊन त्यास म्हणाले, आपण त्याच्याबरोबर दाखल्यानी का बोलता? त्याने त्यास उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची गुपीते जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. कारण ज्या कोणाजवळ आहे त्यास दिले जाईल व त्यास भरपूर होईल; ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. यास्तव मी त्याच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो; कारण ते पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही. यशयाचा संदेश त्याच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की,
तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हास समजणारच नाही,
व पाहाल तर खरे, परंतु तुम्हास दिसणारच नाही;
कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे,
ते कानानी मंद ऐकतात आणि त्यांनी डोळे मिटून घेतले आहेत;
यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये,
कानांनी ऐकू नये,
अंतःकरणाने समजून नये
आणि वळू नये
आणि मी त्यांना बरे करू नये.
पण तुमचे डोळे धन्य आहेत, कारण ते पाहत आहे; आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हास खरे सांगतो की, तुम्ही जे पाहत आहात ते पाहावयास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही; आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकावयास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही.”
आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. वाटेवर पेरलेला तो हा आहे की, कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्यास समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो; खडकावरील पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो व ते लगेच आनंदाने स्वीकारतो; परंतु त्यास मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो; तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो.
येशूने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला. “कोणी एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा शत्रू येऊन गव्हामध्ये निदण पेरून निघून गेला; पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निदण ही दिसले. तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्यास म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यामध्ये निदण कोठून आले? तो त्यांना म्हणाला हे काम कोणा शत्रूचे आहे. दासांनी त्यास म्हटले, तर आम्ही जाऊन ते काढून टाकावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही. तुम्ही निदण गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहू ही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की, पहिल्याने निदण गोळा करा आणि जाळण्यासाठी त्याच्या पेढ्या बांधा; परंतु गहू माझ्या कोठारात साठवा.”