तो जोरदार वाणीने म्हणाला,
“‘पडली, मोठी बाबेल पडली;’ ती ‘भुतांची वस्ती’
व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय
व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय
अशी झाली आहे.
कारण, ‘तिच्या’ जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी ‘द्राक्षारस
सर्व राष्ट्रे प्याली आहेत;
पृथ्वीवरील राजांनी तिच्याबरोबर जारकर्म’ केले
व पृथ्वीवरील व्यापारी तिने आपल्या विषयभोगास
खर्चलेल्या द्रव्यबळाने धनवान झाले.”
मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली;
ती म्हणाली, “‘माझ्या लोकांनो,’
तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये
आणि तुम्हांला तिच्या पीडांतील कोणतीही पीडा
होऊ नये म्हणून ‘तिच्यामधून निघा.’
कारण तिच्या ‘पापांची रास
स्वर्गापर्यंत पोहचली’ आहे;
आणि तिची अनीती देवाने लक्षात घेतली आहे.
‘जसे तिने दिले तसे तिला द्या,
तिच्या कर्माप्रमाणे’ तिला दुप्पट द्या;
तिने प्याल्यात जितके ओतले त्याच्या दुप्पट
तुम्ही तिच्यासाठी त्यात ओता.
ज्या मानाने तिने आपला गौरव केला व विषयभोग
घेतला, त्या मानाने तिला पीडा व दुःख द्या;
कारण ती ‘आपल्या मनात म्हणते,
मी राणी होऊन बसले आहे; मी काही विधवा नाही;
मी दुःख पाहणारच नाही.’
ह्यामुळे तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख
व दुष्काळ ‘एका दिवशीच येतील,’
आणि ती अग्नीत जाळून टाकली जाईल;
कारण तिचा ‘न्यायनिवाडा करणारा प्रभू’ देव
‘सामर्थ्यवान’ आहे.”
‘पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म’ व विलास ‘केला’ ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील तेव्हा तिच्याकरता ‘रडतील व ऊर बडवून घेतील.’
ते म्हणतील, “अरेरे! ‘बाबेल ही मोठी नगरी होती! बलाढ्य नगरी होती!’ एका घटकेत तुला न्यायदंड झाला आहे.”
पृथ्वीवरील ‘व्यापारी’ तिच्यासाठी ‘रडतात व शोक करतात;’ कारण त्यांचा माल आता कोणी विकत घेत नाही;
सोने, रुपे, मोलवान रत्ने, मोती, तागाचे तलम कापड, जांभळ्या रंगाचे कापड, रेशमी कापड, किरमिजी रंगाचे कापड, सर्व प्रकारची सुगंधी लाकडे, सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, सर्व प्रकारची अति मोलवान लाकडाची, पितळेची, लोखंडाची व संगमरवरी पाषाणाची पात्रे;
दालचिनी, सुगंधी उटणी, धूपद्रव्ये, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षारस, जैतुनाचे तेल, सपीठ, गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम, व ‘मनुष्यांचे जीव’ हा त्यांचा माल कोणी घेत नाही.
“ज्या फळफळावळीची तुझ्या जिवाला
चटक लागली आहे, ती तुझ्यापासून गेली आहे;
आणि मिष्टान्ने व विलासाचे पदार्थ
हे सर्व तुझ्यापासून नाहीसे झाले आहेत;
ते पुढे कोणाला मिळणारच नाहीत!”
तिच्या योगाने धनवान झालेले त्या पदार्थांचे ‘व्यापारी रडत व शोक करत’ तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहतील;
आणि म्हणतील,
“अरेरे! पाहा, ही मोठी नगरी! तागाची बारीक वस्त्रे,
जांभळी व किरमिजी वस्त्रे पांघरलेली,
सोने, मोलवान रत्ने व मोती ह्यांनी शृंगारलेली नगरी!
एका घटकेत ह्या इतक्या संपत्तीची राख झाली.”
सर्व ‘तांडेल’ गलबतांवरून बंदरोबंदरी जाणारे सर्व, आणि ‘खलाशी व समुद्रावर’ जितके उद्योगधंदा करणारे होते तितके दूर ‘उभे राहिले,’