नंतर ते शिष्यांजवळ आले तेव्हा त्यांच्याभोवती लोकसमुदाय आहे व त्यांच्याबरोबर शास्त्री वादविवाद करत आहेत असे त्यांना दिसून आले.
त्याला पाहताच सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे धावत जाऊन त्यांनी त्याला प्रणाम केला.
त्याने त्यांना विचारले, “ह्यांच्याशी तुमचा कसला वादविवाद चालला आहे?”
तेव्हा समुदायातील एकाने उत्तर दिले, “गुरूजी, मी माझ्या मुलाला आपल्याकडे घेऊन आलो. ह्याला मुका आत्मा लागला आहे.
तो जेथे जेथे ह्याला धरतो तेथे तेथे तो त्याला खाली आपटतो, मग हा तोंडाला फेस आणून कडकडा दात खातो व निपचित पडतो. त्याला काढावे म्हणून आपल्या शिष्यांना मी सांगितले, परंतु त्यांना तो काढता येईना.”
ह्यावर तो म्हणाला, “हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार? कोठवर तुम्हांला वागवून घेणार? त्याला माझ्याकडे आणा.”
त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला.
तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, “ह्याला असे होऊन किती काळ लोटला?” तो म्हणाला, “बाळपणापासून.
ह्याचा नाश करावा म्हणून त्याने ह्याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले; पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आमच्यावर दया करा व आम्हांला साहाय्य करा.”
येशू त्याला म्हणाला, “शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणार्याला सर्वकाही शक्य आहे.”
लगेचच मुलाचा बाप [डोळ्यांत आसवे आणून] मोठ्याने म्हणाला, “प्रभूजी, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका.”
तेव्हा लोक धावत येत आहेत असे पाहून येशू अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला, “अरे मुक्याबहिर्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो, ह्याच्यातून नीघ व पुन्हा कधी ह्याच्यात शिरू नकोस.”
तेव्हा तो आत्मा ओरडून व त्याला फारच पिळून निघाला, आणि तो मेल्यासारखा झाला म्हणून तो मेला आहे असेच बहुतेक म्हणाले.
पण येशूने त्याला हाताला धरून उठवले व तो उभा राहिला.
मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला एकान्तात विचारले, “आम्हांला तो का काढता आला नाही?”
तो त्यांना म्हणाला, “ही जात प्रार्थनेवाचून1 दुसर्या कशानेही निघणारी नाही.”
नंतर ते तेथून निघून गालीलामधून चालले होते; आणि हे कोणास कळू नये, अशी त्याची इच्छा होती.
कारण तो आपल्या शिष्यांना शिकवत होता; तो त्यांना असे सांगत होता की, “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे; ते त्याला जिवे मारतील; आणि मारला गेल्यानंतर तिसर्या दिवशी तो पुन्हा उठेल.”
परंतु ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही व त्याला विचारण्यास ते भ्याले.
पुढे ते कफर्णहूमात आले; आणि तो घरी असता त्याने त्यांना विचारले, “तुम्ही वाटेत कसली चर्चा करत होता?”
ते गप्प राहिले, कारण सर्वांत मोठा कोण ह्याविषयी त्यांची वाटेत चर्चा चालली होती.
त्याने बसून त्या बारा जणांना बोलावून म्हटले, “जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वांत शेवटला व सर्वांचा सेवक झाले पाहिजे.”
मग त्याने एक बालक घेऊन त्यांच्यामध्ये ठेवले व त्याला कवटाळून त्यांना तो म्हणाला,
“जो कोणी माझ्या नावाने अशा बालकांपैकी एकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो, व जो कोणी मला स्वीकारतो तो मला नाही तर ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो.”
योहान त्याला म्हणाला, “गुरूजी, आपला अनुयायी नसलेल्या कोणाएकाला आम्ही आपल्या नावाने भुते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मना केले, कारण तो आपला अनुयायी नव्हता.”
येशू म्हणाला, “त्याला मना करू नका, कारण जो माझ्या नावाने महत्कृत्ये करून लगेचच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही.
कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे.
तुम्ही ख्रिस्ताचे म्हणून जो कोणी तुम्हांला पेलाभर पाणी पिण्यास देईल तो आपल्या प्रतिफळास मुकणार नाही, हे मी तुम्हांला खचीत सांगतो.
माझ्यावर विश्वास ठेवणार्या ह्या लहानांतील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील, त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे हेच त्याच्या हिताचे आहे.
तुझा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक;
दोन हात असून नरकात म्हणजे न विझणार्या अग्नीत जावे, ह्यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे.
तुझा पाय तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक; दोन पाय असून नरकात टाकले जावे ह्यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे.
तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक; दोन डोळे असून जेथे ‘त्यांचा किडा मरत नाही व अग्नी विझत नाही’ अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा एकडोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे.
कारण प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल, [व प्रत्येक बलिदान मिठाने खारवतील].
मीठ चांगला पदार्थ आहे; परंतु मिठाचा खारटपणा गेला तर त्याला रुची कशाने आणाल? तुम्ही आपल्यामध्ये मीठ असू द्या व एकमेकांबरोबर शांतीने राहा.”