YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 11:1-19

मार्क 11:1-19 MARVBSI

ते यरुशलेमेजवळ जैतुनांच्या डोंगरापाशी बेथफगे व बेथानीजवळ येऊन पोहचले, तेव्हा त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना असे सांगितले की, “समोरच्या गावात जा; त्यात जाताच तुम्हांला एक शिंगरू बांधलेले आढळेल. त्याच्यावर कोणी कधीच बसले नाही; ते सोडून आणा. आणि ‘तुम्ही असे का करता?’ असे जर कोणी तुम्हांला विचारले तर असे सांगा की, ‘प्रभूला ह्याची गरज आहे आणि तो लगेचच ते इकडे परत पाठवील.”’ तेव्हा ते निघाले आणि रस्त्यावर दाराशी बाहेर बांधलेले एक शिंगरू त्यांना आढळले, ते त्यांनी सोडले. तेव्हा तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काही जण त्यांना म्हणू लागले, “शिंगरू सोडून तुम्ही काय करीत आहात?” येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांना उत्तर दिले; तेव्हा त्यांनी त्यांना जाऊ दिले. नंतर त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले, त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो त्याच्यावर बसला. तेव्हा पुष्कळ लोकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली; इतर लोकांनी शेतामळ्यांतून डाहळ्या तोडून आणून त्या वाटेवर पसरल्या. आणि पुढे चालणारे व मागून येणारे लोक असा जयघोष करू लागले की, “‘होसान्ना, प्रभूच्या नावाने येत असलेल्याचा धन्यवाद असो;’ आमचा बाप दावीद ह्याचे [प्रभूच्या नावाने] येणारे राज्य धन्यवादित असो; ‘उर्ध्वलोकी होसान्ना.”’ नंतर येशू यरुशलेमेत आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवार सर्वकाही पाहिल्यावर संध्याकाळ झाली, म्हणून तो आपल्या बारा शिष्यांसह बेथानीस निघून गेला. दुसर्‍या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा पानांनी डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले, आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल ह्या अपेक्षेने तो तिकडे गेला; परंतु तेथे गेल्यावर पानांवाचून त्याला काही आढळले नाही; कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, “ह्यापुढे कोणीही तुझे फळ कधीही न खावो.” त्याचे शिष्य हे ऐकत होते. मग ते यरुशलेमेस येऊन पोहचल्यावर येशू मंदिरात गेला व मंदिरात क्रय-विक्रय करणार्‍यांना बाहेर घालवून देऊ लागला. त्याने सराफांचे चौरंग व कबुतरे विकणार्‍यांच्या बैठका उलथून टाकल्या; त्याने कोणालाही कसल्याच भांड्याची मंदिरामधून नेआण करू दिली नाही. मग तो त्यांना शिक्षण देऊ लागला व म्हणाला की, “‘माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर म्हणतील,’ असा शास्त्रलेख आहे ना? परंतु तुम्ही तर ही ‘लुटारूंची गुहा’ करून टाकली आहे.” मुख्य याजकांनी व शास्त्र्यांनी हे ऐकले आणि त्याचा घात कसा करावा ह्याविषयी ते युक्ती योजू लागले; कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणावरून थक्क झाल्याकारणाने ते त्याला भीत होते. रोज संध्याकाळी ते शहराच्या बाहेर जात असत.