येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला :
“स्वर्गाचे राज्य कोणाएका राजासारखे आहे; त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली;
आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते, त्यांना बोलावण्याकरता त्याने आपले दास पाठवले; परंतु ते येईनात.
पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यांना म्हटले की, ‘आमंत्रितांना असे सांगा, पाहा, मी जेवण तयार केले आहे; माझे बैल व पुष्ट पशू कापले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीस चला.’
तरी ते मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले,
आणि बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला व त्यांना जिवे मारले.
तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकले.
मग तो आपल्या दासांना म्हणाला, ‘लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते.
म्हणून तुम्ही चवाठ्यांवर जाऊन जितके तुम्हांला आढळतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीस बोलवा.’
मग त्या दासांनी रस्त्यांवर जाऊन बरेवाईट असे जितके त्यांना आढळले त्या सर्वांना एकत्र जमवले आणि लग्नाचा मांडव जेवणार्यांनी भरून गेला.
मग राजा जेवणार्यांना पाहण्यास आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला.
त्याला तो म्हणाला, ‘मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता येथे कसा शिरलास?’ त्याला काही उत्तर देता येईना.
तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, ‘ह्याचे हातपाय बांधून ह्याला घेऊन जा व बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल.’
कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत.”
नंतर परूश्यांनी जाऊन त्याला बोलण्यात कसे पकडावे ह्याविषयी मसलत केली.
त्यांनी आपल्या शिष्यांना हेरोद्यांसह त्याच्याकडे पाठवून म्हटले, “गुरूजी आम्हांला ठाऊक आहे की, आपण खरे आहात, परमेश्वराचा मार्ग खरेपणाने शिकवता व कोणाची भीड धरत नाही; कारण आपण तोंड पाहून बोलत नाही.
आपल्याला काय वाटते हे आम्हांला सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?”
येशू त्यांचे दुष्टपण ओळखून म्हणाला, “अहो ढोंग्यांनो, माझी परीक्षा कशाला पाहता?
कराचे नाणे मला दाखवा.” तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ एक रुपया दिला.
त्याने त्यांना म्हटले, “हा मुखवटा व हा लेख कोणाचा?”
ते म्हणाले, “कैसराचा.” तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरून द्या.”
हे ऐकून ते थक्क झाले व त्याला सोडून गेले.
पुनरुत्थान होत नाही, असे म्हणणार्या सदूक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्याला विचारले,
“गुरूजी, मोशेने सांगितले आहे की, ‘जर एखादा मनुष्य संतान नसता मेला तर त्याच्या भावाने त्याच्या पत्नीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा.’
आमच्यामध्ये सात भाऊ होते; त्यांतला पहिला लग्न करून मेला आणि त्याला संतती नसल्यामुळे त्याची बायको त्याच्या भावाची झाली.
अशा प्रकारे दुसरा व तिसरा असे ते सातही जण मेले.
आणि सर्वांमागून ती स्त्री मेली.
तर पुनरुत्थान झाल्यावर ती त्या सात जणांपैकी कोणाची बायको होईल? कारण ती त्या सर्वांची झाली होती.”
येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला आहात.
कारण पुनरुत्थान झाल्यावर ते लग्न करून घेत नाहीत व त्या लग्नात दिल्या जात नाहीत; तर स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतात.
मृतांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हांला जे सांगितले ते तुमच्या वाचनात आले नाही काय?
ते असे की, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे.’ तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे.”
हे ऐकून लोकसमुदायांना त्याच्या शिकवणीचे आश्चर्य वाटले.