नंतर तो मंदिरात जाऊन शिक्षण देत असता मुख्य याजक व लोकांचे वडील जन त्याच्याजवळ येऊन म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करता? तुम्हांला हा अधिकार कोणी दिला?”
येशूने त्यांना उत्तर दिले, “मीही तुम्हांला एक गोष्ट विचारतो, ती मला सांगाल तर कोणत्या अधिकाराने मी हे करतो ते मीही तुम्हांला सांगेन.
योहानाचा बाप्तिस्मा कोठून होता? स्वर्गापासून किंवा माणसांपासून?” तेव्हा ते आपसांत विचार करू लागले की, “‘स्वर्गापासून’ म्हणावे तर हा आपल्याला म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’
बरे, ‘माणसांपासून’ म्हणावे तर आपल्याला लोकांची भीती वाटते, कारण सर्व लोक योहानाला संदेष्टा मानतात.”
तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला ठाऊक नाही.” तो त्यांना म्हणाला, “तर मग कोणत्या अधिकाराने मी हे करत आहे ते मीही तुम्हांला सांगत नाही.
तुम्हांला काय वाटते ते सांगा बरे! एका मनुष्याला दोन मुलगे होते; तो पहिल्याकडे जाऊन म्हणाला, ‘मुला, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर.’
त्याने उत्तर दिले, ‘जातो महाराज;’ पण तो गेला नाही.
मग दुसर्याकडे जाऊन त्याने तसेच म्हटले. पण तो म्हणाला, ‘मी नाही जात.’ तरी नंतर त्याला पस्तावा होऊन तो गेला.
ह्या दोघांतून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले?” ते म्हणाले, “दुसर्या मुलाने.” येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, जकातदार व कसबिणी तुमच्याआधी देवाच्या राज्यात जातात.
कारण योहान नीतीच्या मार्गाने तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही; जकातदार व कसबिणी ह्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला; पण हे पाहून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा असा नंतरही तुम्हांला पस्तावा झाला नाही.
आणखी एक दाखला ऐकून घ्या : कोणीएक गृहस्थ होता, ‘त्याने द्राक्षमळा लावला, त्याभोवती कुंपण घातले, त्यामध्ये द्राक्षारसासाठी कुंड खणले व माळा बांधला’ आणि तो माळ्यांना खंडाने लावून देऊन आपण परदेशी गेला.
नंतर फळांचा हंगाम आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरता आपल्या दासांना माळ्यांकडे पाठवले.
तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला ठोक दिला, कोणाला जिवे मारले व कोणाला धोंडमार केला.
त्याने पुन्हा पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठवले; त्यांच्याशीही ते तसेच वागले.
शेवटी ‘माझ्या मुलाचा ते मान राखतील’ असे म्हणून त्याने आपल्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले.
परंतु माळी मुलाला पाहून आपसांत म्हणाले, ‘हा वारस आहे; चला, आपण ह्याला जिवे मारू व ह्याचे वतन घेऊ.’
तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून जिवे मारले.
तर मग द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या माळ्यांचे काय करील?”
ते त्याला म्हणाले, “तो त्या दुष्टांचे हालहाल करून त्यांचा नाश करील आणि जे माळी हंगामी त्याला फळ देतील अशा दुसर्यांकडे तो द्राक्षमळा खंडाने लावून देईल.”
येशू त्यांना म्हणाला,
‘जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला,
तोच कोनशिला झाला; हे परमेश्वराकडून झाले,
आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे’,
असे शास्त्रात तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?
म्हणून मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य तुमच्यापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल.
[जो ह्या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल, परंतु ज्या कोणावर हा पडेल त्याचा हा भुगाभुगा करून टाकील.]”
मुख्य याजक व परूशी त्याचे दाखले ऐकून, हा आमच्याविषयी बोलत आहे असे समजले.
ते त्याला धरण्यास पाहत होते, परंतु त्यांना लोकसमुदायाची भीती वाटली; कारण ते त्याला संदेष्टा मानत होते.