त्या वेळी एका शब्बाथ दिवशी येशू शेतामधून गेला; तेव्हा त्याच्या शिष्यांना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले.
हे पाहून परूशी त्याला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत.”
त्याने त्यांना म्हटले, “दावीद व त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्याने काय केले?
म्हणजे तो देवाच्या मंदिरात कसा गेला, आणि ज्या ‘समर्पित भाकरी’ त्याने व त्याच्याबरोबरच्या माणसांनी खाऊ नयेत, तर याजकांनी मात्र खाव्यात, त्या त्यांनी कशा खाल्ल्या, हे तुम्ही वाचले नाही काय?
किंवा याजक मंदिरात शब्बाथ दिवशी शब्बाथ मोडून निर्दोष असतात, हे नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय?
तरीपण मी तुम्हांला सांगतो की, मंदिरापेक्षा थोर असा कोणीएक येथे आहे.
‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’, ह्याचा अर्थ तुम्हांला समजला असता तर तुम्ही निर्दोष्यांना दोष लावला नसता.
कारण मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा धनी आहे.”
नंतर तो तेथून निघून त्यांच्या सभास्थानात गेला.
आणि पाहा, तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता; तेव्हा त्यांनी त्याला दोष लावावा म्हणून त्याला विचारले, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?”
तो त्यांना म्हणाला, “तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की ज्याचे एकच मेंढरू असून ते शब्बाथ दिवशी खाचेत पडले तर तो त्याला उचलून बाहेर काढणार नाही?
तर मेंढरापेक्षा माणसाचे मोल किती मोठे आहे! ह्यास्तव शब्बाथ दिवशी सत्कृत्य करणे योग्य आहे.”
मग त्याने त्या माणसाला म्हटले, “तुझा हात लांब कर.” तेव्हा त्याने तो लांब केला आणि तो बरा होऊन दुसर्या हातासारखा झाला.
नंतर परूश्यांनी बाहेर जाऊन त्याचा घात कसा करावा अशी त्याच्याविरुद्ध मसलत केली.
पण हे ओळखून येशू तेथून निघाला; तेव्हा बरेच लोक त्याच्यामागे चालले व त्या सर्वांना त्याने बरे केले;
आणि मला प्रकट करू नका अशी त्यांना ताकीद दिली.
ह्यासाठी की, यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की,
“पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे;
तो मला परमप्रिय आहे;
त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे;
त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन,
तो परराष्ट्रीयांना न्याय कळवील.
तो भांडणार नाही व ओरडणार नाही,
व रस्त्यांवर त्याची वाणी कोणाला
ऐकू येणार नाही.
चेपलेला बोरू तो मोडणार नाही, व
मिणमिणती वात तो विझवणार नाही;
तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल,
आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील.”
मग आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले; आणि त्याने त्याला बरे केले, तेव्हा तो मुका बोलू व पाहू लागला.
तेव्हा सर्व लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हा दाविदाचा पुत्र असेल काय?”