बेखमीर भाकरीचा सण, ज्याला वल्हांडण म्हणतात, तो जवळ आला होता.
तेव्हा मुख्य याजक व शास्त्री हे त्याचा घात कसा करावा ह्याविषयी विचार करत होते; कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती.
तेव्हा बारा प्रेषितांपैकी एक जो यहूदा, ज्याला इस्कर्योत म्हणत, त्याच्यात सैतान शिरला;
तो मुख्य याजक व सरदार ह्यांच्याकडे निघून गेला आणि त्यांच्या हाती त्याला कसे धरून द्यावे ह्याविषयी त्याने त्यांच्याशी बोलणे केले.
तेव्हा त्यांना आनंद झाला व त्यांनी त्याला पैसा देण्याचा करार केला.
त्याला तो मान्य झाला आणि गर्दी नसेल तेव्हा त्यांच्या हाती त्याला धरून देण्याची तो संधी शोधू लागला.
नंतर ज्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला.
तेव्हा त्याने पेत्र व योहान ह्यांना असे सांगून पाठवले की, “आपण वल्हांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा.”
ते त्याला म्हणाले, “आम्ही त्याची तयारी कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे?”
त्याने त्यांना सांगितले, “पाहा, तुम्ही नगरात प्रवेश केल्यावर पाण्याची घागर घेऊन जाणारा एक माणूस तुम्हांला भेटेल; तो ज्या घरात जाईल त्यात त्याच्यामागून जा;
आणि त्या घराच्या धन्याला असे म्हणा, ‘गुरूजी तुम्हांला विचारतात, मला माझ्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करता येईल अशी पाहुण्यांची खोली कोठे आहे?’
मग तो तुम्हांला सज्ज केलेली मोठी माडी दाखवील; तेथे तयारी करा.”
तेव्हा ते गेले व त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले; आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली.
नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवायला बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले.
तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती;
कारण मी तुम्हांला सांगतो की, देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही.”
मग प्याला हातात घेऊन व उपकारस्तुती करून तो म्हणाला, “हा घ्या आणि आपणांमध्ये ह्याची वाटणी करा;
कारण मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज ह्यापुढे मी पिणार नाही.”
मग त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे; ते तुमच्यासाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.”
त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, “हा प्याला माझ्या ‘रक्तात’ नवा ‘करार’ आहे. ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे.
पण पाहा, मला धरून देणार्याचा हात माझ्याबरोबर मेजावर आहे.
मनुष्याचा पुत्र ठरल्याप्रमाणे जातो खरा; परंतु ज्याच्या हातून तो धरून दिला जातो त्या माणसाची केवढी दुर्दशा होणार!”
तेव्हा आपल्यापैकी जो असे करणार आहे तो कोण असावा, ह्याचा ते आपसांत विचार करू लागले.
आणखी, आपणांमध्ये कोण मोठा मानला जात आहे, ह्याविषयीही त्यांच्यामध्ये वाद झाला.
तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभुत्व करतात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवतात त्यांना ते परोपकारी असे म्हणतात;
परंतु तुम्ही तसे नसावे; तर तुमच्यामध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा व जो पुढारी तो सेवा करणार्यासारखा असावा.
मोठा कोण? भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा? भोजनास बसणारा की नाही? मी तर तुमच्यामध्ये सेवा करणार्यासारखा आहे.
माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहात.
जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीही तुम्हांला नेमून देतो.
ह्यासाठी की, तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे, आणि राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्याय करावा.”
मग प्रभू म्हणाला, “शिमोना, शिमोना, पाहा, तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली;
परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे; आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर.”
तो त्याला म्हणाला, “प्रभूजी, मी आपणाबरोबर तुरुंगात जाण्यास व मरण्यासही तयार आहे.”
तो म्हणाला, “पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस हे तीन वेळा नाकारशील तोपर्यंत आज कोंबडा आरवणार नाही.”
आणखी त्याने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला पिशवी, झोळी व पायतणे घेतल्याशिवाय पाठवले तेव्हा तुम्हांला काही उणे पडले का?” ते म्हणाले, “नाही.”
त्याने त्यांना म्हटले, “पण आता तर ज्याच्याजवळ पिशवी आहे त्याने ती घ्यावी; तसेच झोळीही घ्यावी आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपले वस्त्र विकून ती विकत घ्यावी.
मी तुम्हांला सांगतो ‘तो अपराध्यांत गणलेला होता’ असा जो शास्त्रलेख आहे तो माझ्या ठायी पूर्ण झाला पाहिजे कारण माझ्याविषयीच्या गोष्टी पूर्ण होत आहेत.”
ते म्हणाले, “प्रभूजी पाहा, येथे दोन तलवारी आहेत.” तो त्यांना म्हणाला, “पुरे.”
मग तो बाहेर येऊन आपल्या परिपाठाप्रमाणे जैतुनांच्या डोंगराकडे गेला व त्याचे शिष्यही त्याच्या मागोमाग गेले.
त्या ठिकाणी आल्यावर त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.”
मग त्यांच्यापासून सुमारे धोंड्याच्या टप्प्याइतका तो दूर गेला; आणि त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली,
“हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”
तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्ती देताना त्याने पाहिला.
मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता.
प्रार्थना करून उठल्यावर तो शिष्यांजवळ आला तेव्हा ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्याला आढळले.
तो त्यांना म्हणाला, “झोप का घेता? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा.”