त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये, ह्याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला.
तो म्हणाला, “एका नगरात कोणीएक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानत नसे;
आणि त्याच नगरात एक विधवा होती, ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की, ‘माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्यांविरुद्ध न्याय करा.’
पण काही काळपर्यंत तो ते करीना; परंतु नंतर त्याने मनात म्हटले, ‘जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानत नाही,
तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील.”’
तेव्हा प्रभूने म्हटले, “अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका.
तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय?
मी तुम्हांला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील; तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”
आपण नीतिमान आहोत असा जे कित्येक स्वत:विषयी भरवसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते त्यांनाही त्याने दाखला सांगितला, तो असा :
“एक परूशी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले.
परूश्याने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, ‘हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो.
मी आठवड्यातून दोनदा उपास करतो; जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो.’
जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यासदेखील न धजता आपला ऊर बडवत म्हणाला, ‘हे देवा, मज पाप्यावर दया कर.’
मी तुम्हांला सांगतो, त्या दुसर्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला; कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.”
नंतर लोकांनी आपली तान्ही बालकेही त्याने त्यांना स्पर्श करावा म्हणून त्याच्याकडे आणली, परंतु हे पाहून शिष्य त्यांना दटावू लागले.
येशूने तर बालकांना आपणाजवळ बोलावले आणि म्हटले, “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका; कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.
मी तुम्हांला खचीत सांगतो, जो कोणी बालकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा त्यात प्रवेश होणारच नाही.”
कोणाएका अधिकार्याने त्याला विचारले, “अहो उत्तम गुरूजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?”
येशू त्याला म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? एकावाचून म्हणजे देवावाचून कोणी उत्तम नाही.
तुला आज्ञा ठाऊक आहेत : ‘व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर.’
तो म्हणाला, “मी आपल्या तरुणपणापासून ह्या सर्व पाळत आलो आहे.”
हे ऐकून येशूने त्याला म्हटले, “अद्यापि तुझ्यात एक गोष्ट उणी आहे; तुझे असेलनसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये.”
पण हे ऐकून तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता.
तो अतिशय खिन्न झाला हे पाहून येशू म्हणाला, “ज्यांच्याजवळ धन आहे, त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती बरे कठीण आहे!
श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.”
ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?”
तो म्हणाला, “ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.”
तेव्हा पेत्र म्हणाला, “पाहा, आम्ही आपले घरदार सोडून तुम्हांला अनुसरलो आहोत.”
त्याने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, बायको, भाऊ, आईबाप किंवा मुलेबाळे सोडली आहेत,
त्याला ह्या काळात पुष्कळ पटीने, व येणार्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही असा कोणी नाही.”