त्याच वेळी तेथे असलेल्या कित्येकांनी त्याला, ज्या गालीलकरांचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञांत मिसळले होते, त्यांच्याविषयी सांगितले.
मग येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “ह्या गालीलकरांनी असे दुःख भोगले ह्यावरून बाकीच्या सर्व गालीलकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हांला वाटते काय?
मी तुम्हांला सांगतो, नव्हते; तरीपण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल.”
किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहातील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेमेत राहणार्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हांला वाटते काय?
मी तुम्हांला सांगतो, नव्हते; पण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल.”
त्याने हा दाखला सांगितला, “कोणाएकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते; त्यावर तो फळ पाहण्यास आला, परंतु त्याला काही आढळले नाही.
तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, ‘पाहा, गेली तीन वर्षे मी ह्या अंजिरावर फळ पाहण्यास येत आहे; परंतु मला काही आढळत नाही; ते तोडून टाक; उगाच त्याने जागा तरी का अडवावी?’
तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, ‘महाराज, एवढे वर्ष असू द्या, म्हणजे मी त्याच्याभोवती खणून खत घालीन.
मग पुढील वर्षी त्याला फळ आले तर बरे; नाहीतर आपण ते तोडून टाकावे.”’
तो शब्बाथ दिवशी एका सभास्थानात शिकवत होता.
तेव्हा पाहा, अठरा वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती; ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते.
येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले, “बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस.”
त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली.
येशूने शब्बाथ दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, “ज्यांत काम केले पाहिजे असे सहा दिवस आहेत; तर त्या दिवसांत येऊन बरे होऊन जात जा, शब्बाथ दिवशी येऊ नका.”
परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले, “अहो ढोंग्यांनो, तुमच्यापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव शब्बाथ दिवशी ठाणावरून सोडून पाण्यावर नेतो ना?
ही तर अब्राहामाची कन्या आहे; पाहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते; शब्बाथ दिवशी हिला ह्या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय?”
तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोधी फजीत झाले आणि जी गौरवयुक्त कृत्ये त्याच्याकडून होत होती त्या सर्वांमुळे सर्व लोकसमुदायाला आनंद झाला.
ह्यावरून तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? मी त्याला कशाची उपमा देऊ?
ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका मनुष्याने घेऊन आपल्या मळ्यात पेरला, मग तो वाढून त्याचे झाड झाले; आणि आकाशातील पाखरे त्याच्या फांद्यांत राहू लागली.”
तो पुन्हा म्हणाला, “मी देवाच्या राज्याला कशाची उपमा देऊ?
ते खमिरासारखे आहे; ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये लपवून ठेवले, तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.”
तो गावोगावी व खेडोपाडी शिक्षण देत देत यरुशलेमेकडे चालला.