तेव्हा याकोब फार भ्याला व चिंतेत पडला. आणि आपल्याबरोबर असलेले लोक, शेरडेमेंढरे, गुरे व उंट ह्यांच्या त्याने दोन टोळ्या केल्या.
तो म्हणाला, “एसावाने येऊन एका टोळीचा नाश केला तर दुसरी टोळी निभावेल.”
मग याकोब म्हणाला, “हे परमेश्वरा, माझे वडील अब्राहाम व इसहाक ह्यांच्या देवा, तू मला सांगितलेस की, तू आपल्या देशास, आपल्या भाऊबंदांत परत जा; मी तुझे कल्याण करीन.
तू करुणा व सत्यता दाखवून आपल्या दासासाठी जे काही केले आहेस त्याला मी पात्र नाही. मी फक्त आपली काठी घेऊन ही यार्देन उतरून गेलो होतो, आणि आता माझ्या दोन टोळ्या झाल्या आहेत.
मला माझा भाऊ एसाव ह्याच्या हातातून सोडव अशी मी प्रार्थना करतो; मला भीती वाटते की, तो येऊन मला व मायलेकरांना मारून टाकेल.
तू मला वचन दिले आहेस की, मी तुझे निश्चित कल्याण करीन, आणि तुझी संतती समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अगणित करीन.”
त्या रात्री तो तेथेच राहिला; आणि आपल्याजवळ जे होते त्यातून त्याने आपला भाऊ एसाव ह्याच्यासाठी भेट तयार केली;
दोनशे शेळ्या व वीस बोकड, दोनशे मेंढ्या व वीस एडके,
तीस दुभत्या सांडणी व त्यांची पोरे, चाळीस गाई व दहा खोंड, वीस गाढवी व दहा शिंगरे,
ह्या एवढ्यांचे त्याने वेगवेगळे कळप केले आणि एकेक आपल्या चाकरांच्या स्वाधीन करून त्यांना सांगितले, “तुम्ही कळपाकळपांत अंतर ठेवून माझ्यापुढे चालू लागा.”
त्याने सर्वांत पुढच्या चाकराला सांगितले की, “माझा भाऊ एसाव तुला भेटेल व विचारील की तू कोणाचा? कोठे चाललास? आणि ही हाकून नेत आहेस ती कोणाची?”
तेव्हा त्याला सांग की, आपला सेवक याकोब ह्याची ही आहेत; ही त्याने आपला स्वामी एसाव ह्याला भेट म्हणून पाठवली आहेत; पाहा, तोही मागाहून येत आहे.”
मग दुसर्याला, तिसर्याला आणि इतर सर्व कळप हाकून नेणार्यांना अशीच आज्ञा करून त्याने म्हटले की, “तुम्हांला एसाव भेटला तर असेच बोला,
आणि सांगा, तुझा दास याकोब हाही मागाहून येत आहे.” याकोबाला वाटले की, पुढे भेट पाठवून त्याला शांत केले व मागाहून त्याचे दर्शन घेतले तर तो आपला अंगीकार करील.
ह्याप्रमाणे त्याची ती भेट पुढे गेली व तो त्या रात्री तळावर राहिला.