फसू नका, “कुसंगतीने नीती बिघडते.”
नीतिमत्त्वासंबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका; कारण कित्येकांना देवासंबंधीचे ज्ञान नाही; हे मी तुम्हांला लाजवण्यासाठी बोलतो.
आता कोणी म्हणेल, “मेलेले कसे उठवले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात?”
हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही;
आणि तू पेरतोस ते पुढे आकारित होणारे अंग पेरत नाहीस, तर नुसता दाणा, तो गव्हाचा किंवा दुसर्या कशाचा असेल;
पण देव त्याला आपल्या संकल्पाप्रमाणे अंग देतो. तो बीजातल्या प्रत्येकाला त्याचे अंग देतो.
सर्व देह सारखेच नाहीत; तर माणसांचा देह निराळा, पशूंचा देह निराळा, पक्ष्यांचा देह निराळा व माशांचा देह निराळा.
तशीच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत; पण स्वर्गीयांचे तेज एक आणि पार्थिवांचे एक.
सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे, तार्यांचे तेज निराळे; कारण तार्यातार्यांच्या तेजांत भेद आहे.
तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जे विनाशीपणात पेरले जाते, ते अविनाशीपणात उठवले जाते;
जे अपमानात पेरले जाते, ते गौरवात उठवले जाते, जे अशक्तपणात पेरले जाते, ते सामर्थ्यात उठवले जाते;
प्राणमय1 शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते. जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे.
त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की, “पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला;” शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला.
तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही; प्राणमय ते प्रथम, मग जे आध्यात्मिक ते.
पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य [प्रभू] स्वर्गातून आहे.
तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहेत, आणि तो स्वर्गातला जसा आहे तसेच जे स्वर्गातले तेही आहेत.
आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू.
बंधुजनहो, मी असे म्हणतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही.
पाहा, मी तुम्हांला एक रहस्य सांगतो; आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व जण बदलून जाऊ;
क्षणात, निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा. कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील, आणि आपण बदलून जाऊ.
कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे.
हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल तेव्हा
“मरण विजयात गिळले गेले आहे”
असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल.
“अरे मरणा, तुझा विजय कोठे?
अरे मरणा, तुझी नांगी कोठे?”
मरणाची नांगी पाप, आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे;
परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो.
म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.2